जालना,दि.10(जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ
घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासनाने
महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चालू 2026-27 शैक्षणिक वर्षापासून स्वाधार योजनेचा
लाभ मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी
ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. गुणवत्तेनुसार अथवा जागेअभावी ज्या
विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही, अशा विद्यार्थ्यांनाच
स्वाधार योजनेसाठी पात्र मानण्यात येणार आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह
प्रवेशासाठी अर्जच केलेला नाही, अशा विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ मिळणार
नाही. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी प्रथम वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करावा, असे
आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जालना यांच्या वतीने करण्यात आले
आहे. ज्या तालुक्यांमध्ये शासकीय वसतिगृहाची सुविधा उपलब्ध नाही, तेथे या
नियमामध्ये काही प्रमाणात शिथिलता असली तरी भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी सर्व
पात्र विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. मागील वार्षिक
परीक्षेत किमान 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले अनुसूचित जाती
व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी स्वाधार योजनेसाठी पात्र आहेत.
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत :शालेय अभ्यासक्रमासाठी 30 जून 2026
पर्यंत
इयत्ता 11 वी, 12 वी तसेच
बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी 15 जुलै 2026 पर्यंत निर्धारित मुदतीमध्ये
संबंधित विद्यार्थ्यांचे प्रस्ताव https://hmasnew.mahait.org/ या संकेतस्थळावर
ऑनलाईन पद्धतीने सादर होणे आवश्यक आहे. असे आवाहन श्रीमती डॉ. अनिता राठोड, सहायक
आयुक्त, समाज कल्याण जालना यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment