जालना,दि.4(जिमाका): शासन सेवेतील कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या
प्रलंबित सेवाविषयक अडचणी तातडीने आणि कार्यक्षमतेने सोडवण्यासाठी विभागीय आयुक्त
जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून संपूर्ण विभागात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या
शुक्रवारी 'कर्मचारी समाधान शिबीर' आयोजित करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जून महिन्यातील जिल्हास्तरीय शिबिराचे आज शुक्रवार, दि. 5 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय,
जालना येथील नियोजन भवनात सकाळी 11 वाजता आयोजन करण्यात आले आहे.
तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हा स्तरावर
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तर विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले
आहे. तसेच जिल्हास्तरावरील अडचणी जिल्हाधिकारी कार्यालयातील तर तालुका स्तरावरील
अडचणी या तहसिल कार्यालयातील आणि विभागीय पातळीवरील अडचणी या विभागीय आयुक्त
कार्यालयातील शिबीरात स्विकारण्यात येणार आहे. अर्जदार अधिकारी / कर्मचारी,
संघटनेचे पदाधिकारी यांना शिबीरास उपस्थित राहून कर्मचाऱ्यांच्या समस्या
मांडण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
अनेकदा कर्मचाऱ्यांना वेतन, पदोन्नती, रजा, निवृत्तीवेतन किंवा सेवापुस्तिका अद्यावत करणे यांसारख्या वैयक्तिक
कामांसाठी प्रशासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागतात. ही बाब लक्षात घेऊन
प्रशासनाने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी विभाग, जिल्हा आणि तालुका
पातळीवर या शिबिरांचे आयोजन करण्याचे आदेश दिले आहेत. जर पहिल्या शुक्रवारी सुट्टी
असेल, तर त्यापुर्वीच्या कामकाजाच्या दिवशी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यालयामध्ये कर्मचारी यांची सेवाविषयक प्रलंबित प्रकरणांची यादी
अद्यावत करून तीचा त्या त्या शिबिरात समावेश करण्यात येणार आहे.
या मोहिमेमुळे कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण होऊन प्रशासकीय
कामात गती येईल. सर्व संबंधित विभाग प्रमुखांना या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे
आदेश देण्यात आले असून, कामात दिरंगाई करणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाणार
असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले
आहे.
*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment