Thursday, 13 August 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जालना जिल्हा दौरा

 

 

जालना,दि.13 (जिमाका) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी जालना  जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छत्रपती संभाजीनगर येथून जालना येथे सकाळी 11.45 वाजता आगमन व रेशीम कोष बाजारपेठ, नवीन इमारत, सिरसरवाडी रोड, जालना येथील रेशीम कोष बाजारपेठ इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 12.10 वाजता एमआयडीसी फेस वन छत्रपती संभाजीनगर चौफुली-जालनाकडे प्रयाण करतील. दुपारी 12.15 वाजता एमआयडीसी फेस वन छत्रपती संभाजीनगर चौफुली-जालना येथे आगमन व भारतीय जनता पार्टी, जालना जिल्हा कार्यालयाच्या भूमीपूजन समारंभास उपस्थित राहतील. त्यानंतर 01.30 वाजता जालना येथुन छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-

पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

 


 

            जालना,दि.13 (जिमाका):  राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहेत.

पालकमंत्री श्रीमती मुंडे यांचे शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 9.00 वाजता शासकीय विश्रामगृह छत्रपती संभाजीनगर येथून जालनाकडे प्रयाण करतील. सकाळी 10.00 वाजता आगमन व एमआयडीसी फेस वन छत्रपती संभाजीनगर चौफुली- जालना येथील भाजपा जिल्हा कार्यालय नवीन इमारत भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती राहतील. त्यानंतर  सकाळी 11.00 वाजता  रेशीम कोष बाजारपेठ, नवीन इमारत, सिरसरवाडी रोड, जालना येथे रेशीम कोष बाजारपेठ इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थित राहतील. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत, रांजणी,राणी उंचेगाव, पिंपरखेड बु. दुधना काळेगाव, हसनाबाद, शहागड, वाकुळणी येथील  सार्वजनिक आरोग्य  विभाग, जिल्हा परिष्ज्ञद, लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहतील. दुपारी 1.00 वाजता जालना येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील. दुपारी 2.00 वाजता  महात्मा फुले चौक औंरगापुरा छत्रपती संभाजीनगर येथे आगमन व मुख्यमंत्री महोदयांच्या हर घर तिरंगा अभियान रॅलीत सहभागी होतील. सायंकाळी 5.00 वाजता छत्रपती संभाजीनगर येथून जालनाकडे प्रयाण करतील. सायंकाळी 6.00 वाजता शासकीय विश्रामगृह जालना येथे आगमन व राखीव.

            शनिवार, दि. 15 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथील  भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजीत शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी 9.35 वाजता शासकीय वाहनाने परळी वैजनाथ जिल्हा बीडकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-*-

 

जालना जिल्ह्यात 15 ऑगस्टपासून ‘जलसंधारण सप्ताह’ 21 ऑगस्टला महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर; युवकांसाठी रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन स्पर्धा

 


 

जालना,दि.13(जिमाका) : मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार जालना जिल्ह्यात 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2026 या कालावधीत जलसंधारण सप्ताह, तर 15 ऑगस्ट 2026 ते 26 जानेवारी 2027 या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची आठवण म्हणून 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येत असून, या उपक्रमांतून मृद व जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जलसंधारण सप्ताहाचा प्रमुख आकर्षण असलेल्या महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर चे आयोजन 21 ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यात करण्यात येणार आहे. (Save Soil, Save Water, Secure Tomorrow) ही या उपक्रमाची संकल्पना असून, पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा हा संदेश देण्यात येणार आहे. या वॉकेथॉनमध्ये 15 वर्षे व त्यावरील पुरुष व महिला सहभागी होऊ शकतील. जास्तीत जास्त तीन किलोमीटर अंतराची ही वॉकेथॉन असून, सहभागींकडून मृद व जलसंधारणाची शपथही घेण्यात येणार आहे. सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

वॉकेथॉनमध्ये लोकप्रतिनिधी, शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, NCC, NSS, नेहरू युवा केंद्र, स्वयंसेवी संस्था, विविध क्रीडा व सामाजिक संघटना, डॉक्टर, कलाकार, उद्योजक, खेळाडू, व्यापारी संघटना तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी 6 वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी उपस्थिती, 6.15 वाजता वॉर्मअप, 6.45 वाजता मृद व जलसंधारणाची शपथ, 7 वाजता वॉकेथॉनचा प्रारंभ आणि 8 वाजता समारोप होणार आहे. प्रथम पाच विजेत्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

युवकांसाठी रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन स्पर्धा

जलसंधारण सप्ताहादरम्यान 15 ते 30 वर्षे वयोगटातील युवक-युवतींसाठी ‘Reel for Soil and Water Conservation’ ही जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धकांनी 30 ते 60 सेकंदांची Instagram Reel तयार करून स्वतःच्या Public Instagram Account वर पोस्ट करायची असून, संबंधित अधिकृत Instagram Account ला Tag करणे तसेच #SaveSoilSaveWater हा हॅशटॅग वापरणे बंधनकारक आहे.

माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, पावसाचे पाणी संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, पारंपरिक जलसंधारण पद्धती तसेच नाविन्यपूर्ण जलसंवर्धन उपाय यांसारख्या विषयांवर रील तयार करता येणार आहे. Storytelling, Acting, Music, Dance, Animation, AI Creative, Comedy, Short Film, Before-After आणि Drone Visuals अशा विविध माध्यमांचा वापर करता येईल.

स्पर्धेचे परीक्षण विषय व संदेश, कल्पकता, सामाजिक संदेश, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्ता आणि Instagram Engagement या निकषांवर एकूण 100 गुणांमध्ये करण्यात येणार आहे. केवळ Likes किंवा Followersच्या आधारे विजेता निश्चित न करता तज्ज्ञ परीक्षण आणि Social Media Engagement यांचा समतोल साधण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर ‘महाराष्ट्र युवा जलदूत’ या नावाने प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे 25 हजार, 15 हजार आणि 10 हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.

शाळा-महाविद्यालयांत विविध उपक्रम

15 ऑगस्ट ते 26 जानेवारी दरम्यान जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध, चित्रकला व पोस्टर, वाद-विवाद अशा स्पर्धांसह ‘एक शाळा–एक शोषखड्डा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून देणे, जलमित्र किंवा जलदूत घोषित करणे, 21 ऑगस्ट रोजी सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन करणे, मृद व जलसंधारणाची शपथ घेणे तसेच पुरस्कार व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.

अभियानाच्या कालावधीत ग्रामीण व शहरी भागात मृद व जलसंधारणाच्या कामांचे भूमीपूजन व लोकार्पण, अमृत सरोवरांना भेट, वृक्षारोपण, ‘एक पेड मां के नाम’ उपक्रम, लोकसहभागातून नाला, तलाव, विहीर व पाझर तलाव स्वच्छता तसेच शेततळे, शेतबंधारे, CCT व Deep CCT कामांची पाहणी आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

एक रिल... मातीसाठी ! एक रिल... पाण्यासाठी! एक रिल... सुरक्षित भविष्यासाठी ! या संदेशातून युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रिल आणि वॉकेथॉनच्या नोंदणीकरीता https://register.mahaevent.co.in/ या लिंकचा वापर करण्यात आला आहे. जलसंधारण ही केवळ शासकीय जबाबदारी न राहता लोकचळवळ व्हावी, यासाठी जालना जिल्ह्यातील नागरिकांनी या सर्व उपक्रमांत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता एन. पी. कटके यांनी केले आहे.

माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा; जलसमृद्ध महाराष्ट्र घडवा हा संदेश या अभियानाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

-*-*-*-*-*-*-

जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत सीईटीच्या विद्यार्थ्यांना प्रलंबित अर्जामधील त्रुटीपूर्तता करण्याचे आवाहन

 


जालना,दि.13 (जिमाका) : सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात राज्य सामाईक प्रवेश परिक्षेच्या आधारे आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, विजा-अ, भज, इमाव, विमाप्र, एसईबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. त्यामुळे इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतून उर्तीण झालेल्या विद्यार्थ्याच्या अर्जाची पडताळणी करण्याची कार्यवाही जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या स्तरावर सुरु आहे. त्या अनुषंगाने जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी त्रुटी पूर्तता करणेसाठी विशेष मोहिम समिती कार्यालयामार्फत हाती घेण्यात आली आहे.

 

माहे जून 2025 ते जुलै 2026  या कालावधीत समितीकडे एकुण 14 हजार 520 अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी तब्बल 12 हजार 690 इतक्या मोठ्या संख्येने वैधता प्रमाणपत्रे निकाली काढण्यात आली असून ती ऑनलाईन स्वरुपात वितरित करण्यात आली आहेत. यात अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, एसईबीसी, विमाप्र व इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्याचा व लाभार्थ्यांचा समावेश आहे. तसेच चालू आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल 2026 पासून आजतागायत एकुण 4 हजार 300 लाभार्थ्यांना वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. वास्तविकतः जात वैधता प्रमाणपत्रासाठी कागदपत्रांची तपासणी ही अत्यंत वेळेची व गुंतागुंतीची प्रक्रिया असते. मात्र जालना समितीने ऑनलाईन व ऑफलाईन आलेल्या कागदपत्रांची अचूक तपासणी करुन ही प्रक्रिया गतिमान केली आहे. कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असल्यास लाभार्थ्यांना तात्काळ कळविले जाते. लाभार्थ्यांनी त्रुटींची पूर्तता केल्यानंतर, प्रस्तावाला तत्वतः मान्यता देऊन तो अंतिम मंजूरीसाठी समितीसमोर ठेवला जातो. समिती कागदपत्रांची कसून पडताळणी करुन प्रस्तावाला अंतिम मान्यता देते आणि त्यानुसार लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित केले जाते.

 

नवीन अर्ज दाखल करणारे किंवा ज्यांचे अर्ज प्रलंबित आहेत अशा अर्जदारांची फसवणूक व दिशाभूल करण्यासाठी समिती कार्यालयाच्या परिसरात किंवा बाहेर काही असामाजिक तत्व (दलाल) सक्रिय असण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा कोणत्याही व्यक्तिवर अर्जदारांनी विश्वास ठेवू नये अणि आपली फसवणूक टाळावी, असा इशारावजा महत्वाचा इशारा जालना जात पडताळणी समितीकडून देण्यात येत आहे.

-*-*-*-*-*-*-

“पॉश” ची अंमलबजावणी न करणा-या राज्यातील 672 कार्यालयांना कारणे दाखवा नोटीसा

 


     जालना,दि.13 (जिमाका) : पॉश ॲक्ट 2013 मधील तरतुदी व सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या  आदेशानुसार पूर्तता केली नसल्यामुळे राज्यातील शासकीय व खाजगी कार्यालये, संस्था, कंपन्या, त्यांच्या शाखांची राज्याच्या महिला व बाल विकास विभागामार्फत 4,000 पेक्षा जास्त तपासणी अधिका-यांकडुन जुन 2026 पासून तपासणी सुरु केली आहे. सदयस्थितीत राज्यातील 3,579 शासकीय व 3,296 खाजगी कंपन्या /कार्यालयांची अशा एकुण 6,875 तपासण्या करण्यात आली असुन 294 शासकीय व 378 खाजगी कार्यालयांना पूर्तता न केल्याबददल जिल्हा स्तरावरुन राज्यात एकुण 672 कारणे दाखवा नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. नोटीसा दिलेल्या कार्यालयांनी विहीत वेळेत पूर्तता न केल्यास अधिनियमातील तरतुदीनुसार रु 50 हजारा पर्यंत दंड आकारण्याची कारवाई संबंधीत  जिल्हा अधिकारी पॉश ॲक्ट 2013 व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडून करण्यात येत आहेत.

       जालना जिल्हयातील 547 शासकीय व 418 खाजगी कंपन्या/कार्यालयांची तपासणी करण्यात आली असुन 110 शासकीय व 153 खाजगी कार्यालयांना पूर्तता न केल्याबददल जिल्हा स्तरावरुन कारणे दाखवा नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. जिल्हयातील सर्व शासकीय व खाजगी कार्यालये, संस्था, कंपन्या, त्यांच्या शाखांनी Posh Act-2013 मधील तरतुदी व मा. सर्वोच्चा न्यायालय, नवी दिल्ली यांचे आदेशानुसार त्यांचे कार्यालयाची केंद्र शासनाच्या SHE BOX PORTAL वर नोंद, अंतर्गत समितीची स्थापना व नोंद, समितीचे प्रशिक्षण, कर्मचा-यांचे प्रशिक्षण, वार्षिक अहवाल, इ. वरील पोर्टल अदययावत करणे बंधनकारक आहे. तपासणीवेळी पूर्तता केली नसल्याचे आढळून आल्यास संबंधित कार्यालये/संस्था/ कंपन्या यांचेवर अधिनियमातील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल. असे कळविण्यात आले आहे.

                                                      -*-*-*-*-*-

केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांचेकडे पंतप्रधान शिष्यावृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 


            जालना,दि.13 (जिमाका) :  जालना जिल्हयातील माजी सैनिक/सैनिक विधवा/अवलंबित यांना कळविण्यात येते की, शैक्षणीक वर्ष 2026-27 या शैक्षणीक वर्षासाठी पंतप्रधान शिष्यावृत्ती मिळणेसाठीची प्रकरणे ही www.ksb.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन प्रक्रीयेद्वारे सादर करणेची कार्यवाही सुरु झालेली आहे. इयत्ता 12 वी, किंवा पदवीका (Diploma) मध्ये 60% टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मार्कानी उत्तीर्ण झालेल्या व प्रथम किंवा द्वितीय वर्षासाठी व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी दि. 1 एप्रिल ते 15 नोव्हेंबर या कालावधीत प्रवेश घेतलेल्या (कोर्सेची यादी online पहावी )

            Online भरलेल्या अर्जाची हार्डकॉपी व उर्वरित  कागदपत्रांची छांयाकीत प्रत काढुन जिल्हा  सैनिक कल्याण कार्यालयाकडे सादर करावी. सदर Online फॉर्म भरण्याची  कार्यवाही सुरु असुन  शेवटची तारीख 31 डिसेंबर 2026 अशी आहे. सुधारित जोडपत्र 1,2 व 3 (2026-2027) आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची सविस्तर माहिती के.एस.बी. च्या संकेतस्थळावर (www.ksb.gov.in) उपलब्द आहे किंवा अधिक माहितीस्तव या कार्यालयात संपर्क करावा. तरी पात्र व इच्छुक माजी सैनकिांच्या पाल्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी केले आहे.

-*-*-*-*-

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेतंर्गत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

जालना,दि.13 (जिमाका) : सन 2026-27  करीता राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेतंर्गत व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक शासनस्तरावरुन प्राप्त झाले असून पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्ज दि. 12 ऑगस्ट,2026 रोजी पासून उपलब्ध करण्यात आले आहे. जिल्हयातील व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रम करीत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, त्यांनी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर भेट देऊन परिपूर्ण अर्ज सादर करावे व त्याची एक प्रत इतर मागास बहुजन कल्याण, जालना या कार्यालयात सादर करावी असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, जालना यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

पंचायत समिती कार्यालय येथे "जागेवर निवड संधी" प्लेसमेंट ड्राईव्ह 17 ते 20 ऑगस्टपर्यंत आयोजन

 


 

जालना,दि.13 (जिमाका) : दि. 17 ते 20 ऑगस्ट, 2026 रोजी जालना जिल्ह्यामधील तालुक्यातील पंचायत समिती कर्यालय येथे "जागेवर निवड संधी" प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन.नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने,उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांचे कडील रोजगाराच्या संधी आणि मार्गदर्शन उपलब्ध करण्याच्या उद्देशानेरोजगार स्वयंरोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. यानुसार जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांचे मार्फत दि. 17 ते 20 ऑगस्ट, 2026 रोजी जालना जिल्ह्यामधील तालुक्यातील पंचायत समिती कार्यालय येथे "जागेवर निवड संधी" प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन सकाळी 11 ते 3 दरम्यान करण्यात आले आहे.

या करिता कॅपस्टॉन फॅसीलिटीज लिमीटेड संस्था, हैद्राबाद यांचे 8 वी पास, 10 वी पास, 12 वी पास या करिता सुरक्षा जवान चे 500 पदे, तसेच कोणताही पदविधर करिता सेक्युरिटी सुपरवायजर चे 100 पदे अशी एकूण 600 रिक्तपदे प्राप्त झाली असून या करीता नोकरी इच्छुक पात्रताधारक उपस्थित होणा-या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध होणार आहे. जालना जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी य संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in त्याच प्रमाणे केंद्र शासनाच्या www.ncs.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी.

-*-*-*-*-*-*-*-

महिला लोकशाही दिनाचे 17 ऑगस्ट रोजी आयोजन

 


 

       जालना दि. 13 (जिमाका) :-महिला व बाल विकास विभागाने, समस्या व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळण्यासाठी त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या हेतूने  जिल्हा तसेच तालुकास्तरावर महिलांसाठी विशेष लोकशाही दिन पाळण्यात येतो. तालुकास्तरावर प्रत्येक तहसिल कार्यालयात महिन्याचे चौथ्या सोमवार आणि जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याच्या तिस-या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन  करण्यासाठी दि. 17 ऑगस्ट 2026  रोजी सकाळी 11.00 ते 12.00 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.  या महिला लोकशाही दिनात तक्रार दाख करु इच्छिणा-या महिलांनी आपली तक्रार दोन प्रतित महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय जालना येथे दाखल करण्याचे आवाहन केले आहे.

 अर्ज स्वीकृतीचे निकष पुढीलप्रमाणे तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे, तक्रार निवेदन दोन प्रतित सादर करावे, सदरील प्रकरण न्याय प्रविष्ठ नसावे, अर्ज विहित नमुन्यात व आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावा, सेवा व आस्थापना विषयक बाबी विचारात घेतल्या जाणार नाहीत.

    निवडणुक आचार संहिता काळात त्या त्या स्तरावर, विधीमंडळ अधिवेशन काळात राज्यस्तर महिला लोकशाही दिन पाळण्यात येत नाही.

     महिलांनी प्रथम संबंधीत तहसिलदार यांच्याकडे महिला लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी दोन प्रतीत तक्रार दाखल करावी. तालुका महिला लोकशाही दिनात एका महिन्यांचे आत कार्यवाही न झाल्यास संबंधीत महिला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनांत तक्रार दाखल करु शकतील. तालुकास्तरावरील लोकशाही दिनांत अर्जदार महिलेस अंतिम उत्तर  शक्य तितक्या लकर जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत देण्याचे बंधन संबंधित अध्यक्ष तथा तहसिलदार व सदस्य सचिव तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची राहील. महिलांनी तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी तालुकास्तरावर तहसिल कार्यालय व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क करुन या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

 


 

         जालना,दि.13 (जिमाका):  राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहेत.

मंत्री श्री. सावकारे यांचे शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 9.00 वाजता शासकीय विश्रामगृह येथून रेशीम कोष बाजारपेठ, जालना येथील इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमाकरीता शासकीय वाहनाने रवाना. सकाळी 10.00 वाजता जालना येथील रेशीम कोष बाजारपेठ इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रम समारंभास उपस्थित राहतील. सकाळी 11.40 वाजात मा. मुख्यमंत्री यांच्या समवेत जालना येथील विविध कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 1.00 वाजता मा. मुख्यमंत्री यांच्या समवेत जालना येथील विविध कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 1.00 वाजता मा. मुख्यमंत्री यांच्या समवेत छत्रपती संभाजीनगरकडे रवाना व विविध कार्यक्रमास उपस्थित राहतील.

-*-*-*-*-*-*-

‘स्वदेशी एक्स्पो’ची तयारी अंतिम टप्प्यात आज उद्घाटन केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते उद्घाटन केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यम मंत्रालयाच्यावतीने आयोजन

 


 

छत्रपती संभाजीनगर, दि. 13 :- केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यम मंत्रालयाच्यावतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये 14 ते 16 ऑगस्टदरम्यान सागर रिसॉर्ट, एमआयडीसी येथे आयोजित ‘स्वदेशी एक्स्पो 2026’ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. देशभरातून 75 हून अधिक प्रदर्शक यात सहभागी झाले असून नागरिकांसाठी प्रवेश पूर्णपणे मोफत आहे, जास्तीत जास्त नागरिकांना या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन दि.14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

नॅशनल ज्युट बोर्ड, ट्रायफेड यांसारख्या राष्ट्रीय संस्थांचाही या एक्स्पोमध्ये सहभाग असून त्यांचे सहकार्य लाभले आहे. ओडिशाची पट्टाचित्र, राजस्थानची पिचवाई, झारखंडची सोहराई, बिहारची मधुबनी, उत्तराखंडची ऐपण कला तसेच महाराष्ट्राची पैठणी यांसह विविध राज्यांतील पारंपरिक कला व हस्तकला पाहण्यासोबतच त्यांची खरेदी करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.

एक्स्पोमध्ये सहभागी झालेल्या प्रदर्शकांपैकी 75 टक्क्यांहून अधिक महिला उद्योजक व लघुउद्योगांचा समावेश आहे. एक्स्पोदरम्यान फॅशन शोसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे या एक्स्पोला भेट देणार असून, त्यांच्या हस्ते विविध स्पर्धांतील विजेत्यांसह देशभरातून आलेल्या कलाकार व कारागिरांचा गौरव करण्यात येणार आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या स्वदेशी हातमाग व हस्तकला प्रदर्शनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन स्वदेशी उत्पादनांची खरेदी करावी, पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्सनेही एक्स्पोला पाठिंबा दिला असून आगामी दिवाळीनिमित्त भेटवस्तू म्हणून स्वदेशी उत्पादनांची खरेदी करून कारागीर व उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

-*-*-*-*-

Wednesday, 12 August 2026

पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

 


            जालना,दि.12 (जिमाका):  राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहेत.

 

पालकमंत्री श्रीमती मुंडे यांचे शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 9.45 वाजता शासकीय विश्रामगृह छत्रपती संभाजीनगर येथून जालनाकडे प्रयाण करतील. सकाळी 10.45 वाजता आगमन व एमआयडीसी फेस वन छत्रपती संभाजीनगर चौफुली- जालना येथील भाजपा जिल्हा कार्यालय नवीन इमारत भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती राहतील. त्यानंतर दुपारी 1.00 वाजता जालना येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील. दुपारी 2.00 वाजता आगमन व मुख्यमंत्री महोदयांच्या हर घर तिरंगा अभियान रॅलीत सहभागी होतील. सायंकाळी 5.00 वाजता छत्रपती संभाजीनगर येथून जालनाकडे प्रयाण करतील. सायंकाळी 6.00 वाजता शासकीय विश्रामगृह जालना येथे आगमन व राखीव.

            शनिवार, दि. 15 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथील  भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजीत शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी 9.35 वाजता शासकीय वाहनाने परळी वैजनाथ जिल्हा बीडकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-*-

 

‘हर घर तिरंगा’ मोहिमेतंर्गत वंदे मातरम् समूह गायन व योग प्रात्यक्षिकाचे आयोजन

 


जालना,दि.12(जिमाका) : ‘हर घर तिरंगा’ मोहिमेतंर्गत देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रप्रेम तसेच नागरिकांमध्ये आरोग्य व योगाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘वंदे मातरम्’ समूह गायन व ‘योगा फॉर हेल्थ’ योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे दि. 14 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 8.00 ते 9.00 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमामध्ये ‘वंदे मातरम्’ गीताचे सामूहिक गायन तसेच ‘योगा फॉर हेल्थ’ अंतर्गत विविध योगासने व योग प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत. या माध्यमातून नागरिक, विद्यार्थी व युवकांमध्ये देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्यासोबतच नियमित योगाभ्यासाचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील विद्यार्थी, क्रीडा शिक्षक, खेळाडू, अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

विशेष वृत्त पाणलोटातून शाश्वत शेतीकडे; अंबडमध्ये 51.60 हेक्टरवर 23,790 फळझाडांची लागवड PMKSY 2.0 अंतर्गत 65 शेतकरी कुटुंबांना आर्थिक स्थैर्याची नवी दिशा

 






 

 

जालना,दि.12 (जिमाका) : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY 2.0) अंतर्गत पाणलोट विकास घटक (WDC-PMKSY 2.0) मध्ये अंबड प्रकल्प क्रमांक 1 अंतर्गत सन 2024-25  मध्ये राबविण्यात आलेल्या फळबाग लागवड उपक्रमाला चांगले यश मिळाले आहे. या उपक्रमातून 65 शेतकऱ्यांच्या 51.60 हेक्टर क्षेत्रावर तब्बल 23 हजार 790 फळझाडांची लागवड करण्यात आली. या उपक्रमामुळे पारंपरिक शेतीला शाश्वत, अधिक उत्पन्न देणाऱ्या आणि पर्यावरणपूरक शेतीची जोड मिळाली आहे.

रोहिलागड, बदापूर, आवा, अंतरवाला, खेडगाव, चिकनगाव, कौचलवाडी तसेच इतर पाणलोट समिती क्षेत्रातील गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. जलसंधारणाच्या कामांसोबत फळबाग लागवडीची सांगड घातल्याने शेतकऱ्यांना पाण्याचा कार्यक्षम वापर, जमिनीचे संवर्धन, उत्पादनवाढ आणि रोजगारनिर्मितीचा लाभ मिळत आहे. 

5 प्रकारच्या फळझाडांची लागवड

या उपक्रमांतर्गत विविध उच्चमूल्य फळपिकांना प्राधान्य देण्यात आले. त्यामध्ये डाळिंबाची 12 हजार 709, मोसंबीची 5 हजार 942, आंब्याची 3 हजार 920, सीताफळाची 720 आणि पेरूची 499 रोपे असे एकुण 23 हजार 790 रोपांची लागवड करण्यात आली. या फळबागांसाठी योजनेअंतर्गत 43.06 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. पारंपरिक पिकांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना फळपिकांकडे वळण्यासाठी या उपक्रमामुळे प्रोत्साहन मिळत आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला नवी दिशा

डाळिंब, मोसंबी, आंबा, पेरू आणि सीताफळ यांसारख्या उच्चमूल्य फळपिकांमुळे भविष्यात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा आहे. फळबागांची लागवड ही एकदाच होणारी प्रक्रिया नसून तिच्या देखभालीसाठी वर्षभर विविध कामांची आवश्यकता असते. त्यामुळे छाटणी, सिंचन, तणनियंत्रण, खत व्यवस्थापन, औषध फवारणी, काढणी, वर्गीकरण आणि बाजारपेठेपर्यंत माल पोहोचविणे अशा विविध टप्प्यांवर स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

विशेषतः महिलांनाही फळबागांच्या देखभाल व काढणीसारख्या कामांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने ग्रामीण कुटुंबांच्या उत्पन्नाला हातभार लागला आहे. गावातच रोजगार उपलब्ध होण्यास मदत झाल्याने रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी करण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे.

मृद संधारण आणि भूजल पुनर्भरणाला चालना

फळबागांमुळे जमिनीवर कायमस्वरूपी हिरवे आच्छादन तयार होत असल्याने मातीची धूप कमी होण्यास मदत होते. परिणामी सुपीक मातीचे संरक्षण होऊन जमिनीची उत्पादकता टिकविण्यास हातभार लागतो.

पाणलोट विकासाच्या कामांसोबत फळबाग लागवडीची सांगड घातल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होत आहे. त्यामुळे भूजल पुनर्भरणाला चालना मिळून विहिरी व बोअरवेलमधील पाण्याची उपलब्धता सुधारण्यास मदत होत आहे. पाण्याचा काटकसरीने आणि नियोजनबद्ध वापर केल्यास फळबागांमुळे शेतकऱ्यांना दीर्घकालीन लाभ मिळण्याची शक्यता आहे.

23 हजार 790 झाडांमुळे पर्यावरणालाही फायदा

फळबाग लागवडीचा फायदा केवळ शेतकऱ्यांच्या उत्पन्नापुरता मर्यादित राहिलेला नाही. 23 हजार 790 फळझाडांमुळे परिसरातील हरितक्षेत्र वाढण्यास मदत झाली आहे. झाडांमुळे मातीचे संरक्षण, जैवविविधतेला चालना आणि कार्बन शोषणास हातभार लागत आहे. त्यामुळे जलसंधारणाबरोबरच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

जलसंधारणासोबत फळबागेची यशस्वी सांगड

अंबड प्रकल्प क्रमांक 1 मधील हा उपक्रम केवळ फळझाडे लावण्यापुरता मर्यादित नसून जलसंधारण, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, शेतकरी उत्पन्नवाढ, रोजगार निर्मिती आणि पर्यावरण संवर्धन यांना एकत्रितपणे पुढे नेणारा उपक्रम ठरत आहे. पाणलोट क्षेत्रात उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून फळबागांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दीर्घकालीन आणि शाश्वत उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला आहे.

पाणी साठे, झाडे वाढली, उत्पादनवाढीची आशा निर्माण झाली आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीचा नवा मार्ग खुला झाला, अशी या उपक्रमाची वाटचाल आहे. PMKSY 2.0 अंतर्गत अंबड प्रकल्पातील फळबाग लागवड ही जलसंधारण आणि शाश्वत शेतीची प्रभावी सांगड घालणारी यशस्वी वाटचाल ठरत आहे.

 

-*-*-*-*-*-

 

 

 

 

 

 

 

 

Tuesday, 11 August 2026

‘हर घर तिरंगा’ आणि विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 


 

जालना,दि.11(जिमाका) : जिल्ह्यात ‘घरोघरी तिरंगा’ (हर घर तिरंगा) मोहिमे अंतर्गत 9 ते 17 ऑगस्ट, 2026 या कालावधीत तसेच 13 ऑगस्ट 2026 पासुन विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.

‘घरोघरी तिरंगा’ (हर घर तिरंगा) मोहिमे निमित्ताने जिल्ह्यात दि. 12 ऑगस्ट 2026 रोजी तिरंगा पदयात्रा, व्याख्यान आणि चर्चासत्राचे आयोजन करुन विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. तसेच दि. 13 ऑगस्ट 2026 रोजी तिरंगा रॅली, देशभक्तीपर चित्रपट, प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी सांस्कृतिक कार्यक्रम / तिरंगा प्रतिज्ञा / सेल्फी अपलोड जिल्हास्तरीय उपक्रम आणि प्रश्नमंजुषा होणार आहे. दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी प्रभात फेरी, सायकल रॅली, शालेय स्पर्धा, बक्षीस वितरण, तिरंगा प्रतिज्ञा, सेल्फी अपलोड आणि वंदे मातरम् गीत गायन होणार आहे. दि. 16 ऑगस्ट 2026 रोजी देशभक्तपर चित्रपट दाखविण्यात येणार आहे. तर दि. 17  ऑगस्ट 2026 रोजी तिरंगा प्रतिज्ञा / सेल्फी अपलोड करुन कॅन्डल मार्च काढणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

विभाजन विभिषिका स्मृती दिनानिमित्त भारताच्या फाळणीदरम्यान लाखो नागरिकांना वेदना, सहन कराव्या लागल्या होत्या. तसेच विस्थापन आणि संघर्षाच्या आठवणींना उजाळा देत नव्या पिढीला त्या काळातील इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्मृती दिनानिमित्त शालेय-महाविद्यालयीन स्तरावर परिसंवाद, चर्चासत्राचे, व प्रश्नमंजूषाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच वंदे मातरम या गीतास 150 वर्ष पुर्ण झाल्यानिमित्ताने केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

-*-*-*-*-*-*-

 

 

 

 

 

Monday, 10 August 2026

विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 


 

जालना,दि.10(जिमाका) : आगामी 14 ऑगस्ट रोजी विभाजन विभीषिका स्मृती दिन देशभरात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. भारताच्या फाळणीदरम्यान लाखो नागरिकांना सहन कराव्या लागलेल्या वेदना, विस्थापन आणि संघर्षाच्या आठवणींना उजाळा देत नव्या पिढीला त्या काळातील इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी जिल्ह्यात 9 ते 17 ऑगस्ट, 2026 या कालावधीत ‘घराघरी तिरंगा’ (हर घर तिरंगा) मोहिमे अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने जिल्ह्यात  शालेय-महाविद्यालयीन स्तरावर परिसंवाद, चर्चासत्राचे, व प्रश्नमंजूषाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच वंदे मातरम या गितास 150 वर्ष पुर्ण झाल्यानिमित्ताने केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे. देशभक्तीवर गीतांचा कार्यक्रम, घरोघरी तिरंगा अभियान तसेच वंदे मातरम या गीतास 150 पुर्ण झाल्यानिमित्त प्रदर्शन आयोजन करणे, तिरंगा रंगाची रोषणाई, तिरंगा ई-बाईक रॅली, तिरंगा रॅली, सेल्फी विथ तिरंगा रांगोळी स्पर्धा आयोजित केली जाणार आहेत. फाळणीच्या काळातील घटनांवर आधारित छायाचित्रे, दस्तऐवज आणि माहितीपर साहित्याच्या माध्यमातून नागरिकांना त्या काळातील परिस्थितीची माहिती करून देण्यात येणार आहे.

शाळा, महाविद्यालये आणि विविध शैक्षणिक संस्थांमध्ये निबंध स्पर्धा व चर्चासत्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना फाळणीचा इतिहास, त्याचे सामाजिक परिणाम आणि त्यातून मिळणारे धडे याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

-*-*-*-*-*-*-

प्लेसमेंट ड्राईव्हचे 12 ऑगस्ट रोजी आयोजन

 


  जालना,दि.10 (जिमाका) : नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांचेकडील रोजगाराच्या संधी आणि मार्गदर्शन उपलब्ध करण्याच्या उद्देशाने रोजगार स्वयंरोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. यानुसार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांचेमार्फत बुधवार, दि. 12 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 11 ते दूपारी 2 दरम्यान जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, जिल्हाधिकारी कार्यालय दुसरा मजला, जालना येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

  या प्लेसमेंट ड्राईव्हकरिता आयोनेक्स व्हेचर्स प्रा. लि.जालना यांचे बी.कॉम पदवी उत्तीर्ण करिता टेली कॉलरचे 10 पदे, तसेच बी.बी.ए. / एम.बी.ए. मार्केटिंग करिता उत्तीर्ण विक्री समन्वयकचे 2 पदे, एम.बी.ए. उत्तीर्ण करिता विक्री अधिकारीचे 3 पदे, आणि बी.कॉम. पदवी उत्तीर्ण करिता अकाउंटंटचे 1 पद त्याचप्रमाणे भारत फायन्ससियल इन्क्लुजन प्रा. लि.जालना यांची दहावी उत्तीर्ण करिता फिल्ड असिस्टंट ट्रेनी ची 20 पदे, तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर उत्तीर्ण करिता ब्रांच व्यवस्थापक आणि युनिट व्यवस्थापकची 5 पदे अशी एकूण 33 रिक्त पदे प्राप्त झाली असून, याकरीता नोकरी इच्छुक पात्रताधारक उपस्थित होणाऱ्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध होणार आहे.

जालना जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in त्याच प्रमाणे केंद्र शासनाच्या www.ncs.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी. तसेच होम पेजवरील नोकरी साधक ( Job Seekar) लॉगिन मधून आपल्या युजर आयडी व पासवर्ड च्या आधारे लॉगिन करावे. त्यानंतर जागेवर निवड संधी (2025-26) प्लेसमेंट ड्राईव्ह 4 या बटनावर क्लिक करून जालना जिल्हाची निवड करावी. उद्योजक/नियोक्तानिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी Apply करावा. मुलाखतीसाठी बायोडाटा किमान दोन प्रती सोबत ठेवून बुधवार, दि. 12 ऑगस्ट, 2026 रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, जिल्हाधिकारी कार्यालय दुसरा मजला, जालना येथे उपस्थित रहावे असे आवाहन प्र. सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विशाल येवले यांनी केले आ

-*-*-*-*-*-

आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे 12 ऑगस्ट रोजी आयोजन

 


 

जालना,दि.10(जिमाका) : "आंतरराष्ट्रीय युवा दिन" म्हणून 12 ऑगस्ट हा दिवस साजरा केला जातो, यावर्षी युनायटेड संघटनेचे युवा दिना विषयीचे "Different Contexts, Common Aspirations." "वेगवेगळे संदर्भ समान आकांक्षा" असे घोषवाक्य आहे याचा अर्थ असा की, वेगवेगळ्या परिस्थिती किंवा पार्श्वभूमी असतानाही लोकांच्या मनातल्या इच्छा, स्वप्ने किंवा ध्येय एकसारखीच असतात.

 12 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून दरवर्षी आपण साजरा करतो. युवा वर्ग हा अति संवेदनशिल असून युवा पिढीमध्ये एचआयव्ही / एड्स, गुप्तरोग इत्यादी आजाराविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे. याअनुषंगाने जिल्हास्तरावर दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7.30 वाजता रेड रन स्पर्धा व जिल्हास्तरीय रेड रिबन प्रश्न मंजूषा स्पर्धा तर दि. 12 ऑगस्ट, 2026 रोजी जनजागृतीपर प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि. 12 ते 26 ऑगस्ट 2026 या कालावधी मध्ये रेड रिबन क्लब स्थापन असलेल्या महाविद्यालयामध्ये प्रभात फेरी, सोशल मिडीया मोहिम नॅको, रिल मेकिंग स्पर्धा, सोशल मिडीया पोस्ट स्पर्धा तसेच विविध महाविद्यालयामध्ये एचआयव्ही/एड्स विषयी आयसीटीसी समुपदेशकामार्फत एचआयव्ही/एड्स विषयी मुलभूत माहिती, एचआयव्हीमुळे देशाच्या विकासावर होणारा परिणाम,  एचआयव्ही संदर्भात तरुणांची भूमिका व जबाबदारी, एचआयव्ही तपासणी आणि औषधोपचार इत्यादी विषयावर व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. तरी या कार्याक्रमांमध्ये जास्तीत जास्त महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिंनींना सहभाग  नोंदविण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

Friday, 7 August 2026

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा जालना जिल्हा दौरा

 



 

जालना,दि.7 (जिमाका) :  राज्याचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास  महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे शनिवार, दि. 8 ऑगस्ट, 2026 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत.

श्री.  पाटील हे शनिवार, दि. 8 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता  शासकीय विश्रामगृह, जालना येथे महामंडळाचे लाभार्थी व मराठा संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत महामंडळ विषयक बैठकीस उपस्थित राहणार आहेत. तसेच दुपारी 2.00 वाजता बीडकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-*-

 


शिष्यवृत्ती योजनेसाठी महाडीबीटी 2.0 पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

 

 

जालना,दि.7 (जिमाका) : महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील सर्व विद्यार्थी, पालक, शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य/मुख्याध्यापक यांना याद्वारे सूचित करण्यात येते की, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृती योजनांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया महाडिबीटी 2.0 (MahaDBT २.०) या नवीन प्रणालीवर शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता सुरू करण्यात आलेली आहे.

शिष्यवृत्तीच्या लाभाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नीकृत (Aadhaar Seeded) बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याने, अचूक माहिती अर्जामध्ये भरावी. महाडीबीटी 2.0 पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी विद्यार्थी/पालकांना पुढील सूचना देण्यात आल्या आहेत.

यामध्ये महाआयडी (Maha (D) नव्याने तयार करणे सर्व विद्यार्थ्यांसाठी महाआयडी (Maha ID) नव्याने तयार करणे बंधनकारक आहे. मागील पोर्टलवरील युझर आयडी/पासवर्डची आता गरज नाही. आधार आधारित नोंदणी विद्यार्थ्यांनी आपला आधार क्रमांक वापरून नवीन महाआयडी बनवावा. आधार पोर्टलवर आपली सर्व माहिती (पत्ता, मोबाइल, ई-मेल आणि बैंक खाते) अचूक व अद्यावत ठेवावी. दस्तऐवज संकलनः आवश्यक सर्व कागदपत्रे (जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, शैक्षणिक गुणपत्रके इ.) स्पष्ट PDF स्वरूपात अपलोड करावीत. नवीन व नूतनीकरण अर्ज: नवीन (Fresh) व नूतनीकरण (Renewal) अशा दोन्ही अर्जासाठी नवीन महाआयडी/आधार लॉगिन करणे आवश्यक आहे. नूतनीकरणाच्या विद्यार्थ्यांनी लॉगिन नंतर "माझा अर्ज नूतनीकरण करावा" ही विशिष्ट टॅब निवडावी. भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्जदारांकडून संबंधित महाविद्यालय शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस शिक्षण शुल्क घेत नसल्याने केंद्र हिस्सा विद्यार्थ्यांच्या खात्यावर प्राप्त होताच.

महाविद्यालयांसाठी आता केवळ एकच लॉगिन उपलब्ध असेल जे थेट महाविद्यालयाच्या प्राचार्याचे असेल (लिपिक लॉगिन पूर्णपणे बंद). ज्या महाविद्यालयांना अद्यापही लॉगिन पासवर्डबाबत काही अडचणी असतील तर त्यांनी त्यांच्या संबंधित शैक्षणिक विभागास संपर्क साधावा. प्रोफाइल व शुल्क निश्चितीः महाविद्यालयाने मागील युझर आयडी व नवीन डीफॉल्ट पासवर्डने लॉगिन करून आपली प्रोफाईल तपासून अभ्यासक्रमनिहाय निश्चिती करण्यात आलेले शुल्क (Fee Structure) तात्काळ अद्ययावत करावी. प्राचार्यांची जबाबदारी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित (Pending) ठेवू नयेत, अर्ज विहित मुदतीत मंजूर करून पुढे पाठविण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्राचार्यांची असेल.

महाडीबीटी पोर्टलकरिता https://mahadbt2.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करावा. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस, उपरोक्त पोर्टलवरील लिंकवर लॉगिन या टॅबवर "नागरिकांसाठी लॉगिन" किंवा "महाआयडीशिवाय प्रवेश करा" या पर्यायाचा वापर करून आधार बेस लॉगिन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी हा पर्याय निवडा. त्यानंतर आधार संलग्न मोबाईल क्रमांक ओटीपी अद्यावत केल्यानंतरच लॉगिन होईल.

लॉगिन झाल्यानंतर पात्र योजनेचा तपशील अद्ययावत केल्यानंतर आपणास लागू होणाऱ्या विभागनिहाय 3 योजनांची यादी उपलब्ध होईल. आपणास ज्या योजनेसाठी अर्ज करावयाचा त्या योजनेच्या नावासमोर "पहा" क्लिक केले असता योजनेची सर्व माहिती दिसू शकेल.

त्यानंतर आपण निवड केलेल्या योजनेच्या समोर Apply टॅबवर क्लिक करून विद्यार्थ्यांनी (उदा. वैयक्तिक माहिती, चालू व मागील शैक्षणिक तपशील, योजनेसंबंधित आवश्यक कागदपत्रे) याप्रमाणे तपशील अद्ययावत करून अर्ज ऑनलाइन सबमीट करावा व प्रिंट किंवा पीडीएफमध्ये जतन करून ठेवावा.

आवश्यक ती सर्व माहिती उदा. जात, प्रवर्ग, महाराष्ट्राचे रहिवासी, दिव्यांगत्व, कौटुंबिक उत्पन्न इ. पोर्टलमध्ये काळजीपूर्वक भरावी. अधिक माहितीकरिता 022-49150800/18001025311 अथवा helpdesk@mahadbt.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क करावा. तांत्रिक अथवा प्रशासकीय तक्रारीकरिता आपल्या लॉगीनमधून स्क्रीनशॉटसह तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे.

महाविद्यालयांनी  महाडीबीटी 2.0 पोर्टलवर विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे व अर्ज करण्यासाठी सहकार्य करावे. अनुसूचित जातीच्या कोणत्याही पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्काची रक्कम घेवू नये, आपल्या महाविद्यालयाचे नाव, महाविद्यालयास मान्य असलेल्या अभ्यासक्रमाची नावे, अभ्यासक्रमाचा कालावधी, अभ्यासक्रमनिहाय प्रवेश क्षमता, महाविद्यालयाच्या व अभ्यासक्रमाच्या मान्यतेचे विविध आदेश, शुल्क रचना इ. माहिती पोर्टलवर मॅप करण्यासाठी संबंधित शैक्षणिक यंत्रणा (उदा. संचालनालयास/विद्यापीठास/परिषदेस/FRA) यांचेकडून मॅप करून घेण्याची कार्यवाही करावी. अशी माहिती सहायक आयुक्त समजाकल्याण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-*-*-

राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे · सन 2026-27 अंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

 


 

जालना,दि.7(जिमाका) : कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार "राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे राज्य पुरस्कृत योजना सन 2026-27" राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांना परदेशातील आधुनिक कृषी तंत्रज्ञान, उत्पादन पद्धती, कृषी प्रक्रिया, बाजार व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण, सेद्रिंय शेती तसेच कृषी एक्स्पोचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावर्षी युरोप व चीन या देशांमध्ये अभ्यास दौरे प्रस्तावित आहेत.

योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यास एकूण 5 शेतकऱ्यांचा लक्षांक प्राप्त झाला आहे, सदर निवड प्रक्रियेमध्ये जिल्ह्यातून किमान एक महिला शेतकरी तसेच राज्य अथवा केंद्र शासन स्तरावरील विविध कृषी पुरस्कार प्राप्त व पीक स्पर्धा विजेते शेतकरी यांना प्राधान्याने संधी देण्यात येणार आहे. संबंधित प्रवर्गातून पात्र अर्ज प्राप्त न झाल्यास मार्गदर्शक सूचनांनुसार इतर पात्र शेतकऱ्यांमधून निवड करण्यात येईल. इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात विहित मुदतीत सादर करावेत. शासनामार्फत अभ्यास दौऱ्याच्या खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल रुपये 2 लाख (यापैकी जी रक्कम कमी असेल) इतके अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दि. 14 ऑगस्ट 2026 पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावेत. असे अवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गहीनीनाथ कापसे यांनी केले आहे.

अर्जदाराकडे अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी, वैध पासपोर्ट, आधार कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केलेली इतर पात्रता व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. पात्र प्रस्तावांची छाननी करून जिल्हास्तरावर पारदर्शक पद्धतीने सोडत काढण्यात येईल. सोडतीचा दिनांक, वेळ व स्थळ याबाबतची माहिती स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. अशी माहिती  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गहीनीनाथ कापसे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

-*-*-*-*-

पेन्शन अदालत व कार्यशाळेचे 11 ऑगस्ट रोजी आयोजन

 


 

जालना,दि.7(जिमाका) : महालेखापाल, नागपूर व जिल्हा कोषागार कार्यालय, जालना यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. 11 ऑगस्ट,2026 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता सामाजिक न्यायभवन, जिल्हा समाजकल्याण कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे पेन्शन अदालत व कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

पेन्शन अदालत तसेच कार्यशाळेत आहरण व संवितरण अधिकारी यांचेकडील निवृत्तीवेतन प्रकरणांविषयी अडचणी जाणुन घेऊन त्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच ज्या निवृत्तीवेतनधारकांची निवृत्तीवेतन विषयक प्रकरणे प्रलंबित आहेत किंवा वापस करण्यात आली आहेत यांच्याही अडचणी जाणुन घेऊन मार्गदर्शन केले जाणार आहे. सर्व आहरण व संवितरण अधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी तसेच ज्या निवृत्तीवेतनधारकांची प्रकरणे प्रलंबीत असतील असे निवृत्तीवेतनधारकांनी या कार्यशाळेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

अपर जिल्हादंडाधिकारी यांचे कलम 37 (1) व (3) अन्वये आदेश जारी

 


 

     जालना दि. 7 (जिमाका) :-    जिल्ह्यात श्री क्षेत्र शेगांव जि. बुलढाणा येथील श्री संत गजानन महाराज जयंती यांची पालखी पंढरपुर येथुन परतीच्या मार्गावर असून ही पालखी दि. 7 ऑगस्ट 2026 रोजी जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करणार असून दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी जालना जिल्ह्यातील नियोजीत प्रवास पुर्ण  करुन बुलढाणा  जिल्ह्याचे हद्दीत प्रवेश करणार  आहे. तसेच दि. 13 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण मासारंभ, दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी पतेती सण, दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्यादिन दि. 17 ऑगस्ट 2026 रोजी नागपंचमी इत्यादी सण, उत्सव  साजरे होणार आहेत. सदर सण, उत्सवाचे अनुषंगाने जालना जिल्ह्यात व शहरात मिरवणुका व विविध कार्यक्रम आयोजित होतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र येत असतात.

तसेच सध्या महाराष्ट्रात व देशभरात आरक्षण उपवर्गीकरणाला तिव्र विरोध होत आहे. तसेच सध्या मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण  व धनगर आरक्षण मिळावे या अनुषंगाने जालना जिल्ह्यात विविध आंदोलनात्मक कार्यक्रम सुरु आहेत. तसेच सध्या महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या सत्ताधारी व विरोधकात एकमेकांविरुध्द विविध कारणावरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहे. तसेच  शेतक-यांचे विविध मागणीसाठी विविध संघटनांकडून आत्मदहन, उपोषण, धरणे, मोर्चे, निदर्शने, रास्तारोको इत्यादी सर्व प्रकारची आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

 

        पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी , भाले, चाकु व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणुनबुजुन दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप,विडंबनापर नकला करणार नाही  आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही.

 

तर पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये  पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई केली आहे.   

 

हा आदेश कामावरील कोणताही ‍ अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागु होणार नाही.  तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक जालना व उपविभागीय पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुका, सभा, मोर्चा यांना लागु राहणार नाही.   हा आदेश संपुर्ण जिल्ह्यासाठी दि. 8 ऑगस्ट, 2026   रोजीच्या 6.00 वाजेपासुन ते  दि. 21 ऑगस्ट,2026 रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-*-*-