जालना,दि.13(जिमाका) : मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार जालना जिल्ह्यात 15
ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2026 या कालावधीत जलसंधारण सप्ताह, तर 15 ऑगस्ट 2026 ते 26
जानेवारी 2027 या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्यात येणार आहे. माजी
मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची आठवण
म्हणून 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येत असून, या
उपक्रमांतून मृद व जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात आले
आहे.
जलसंधारण सप्ताहाचा प्रमुख आकर्षण
असलेल्या महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर चे आयोजन 21 ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यात
करण्यात येणार आहे. (Save Soil, Save Water, Secure Tomorrow) ही या उपक्रमाची
संकल्पना असून, पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा हा संदेश देण्यात
येणार आहे. या वॉकेथॉनमध्ये 15 वर्षे व त्यावरील पुरुष व महिला सहभागी होऊ शकतील.
जास्तीत जास्त तीन किलोमीटर अंतराची ही वॉकेथॉन असून, सहभागींकडून मृद व
जलसंधारणाची शपथही घेण्यात येणार आहे. सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र
देण्यात येणार आहे.
वॉकेथॉनमध्ये लोकप्रतिनिधी, शासकीय व
निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, NCC, NSS, नेहरू युवा केंद्र, स्वयंसेवी
संस्था, विविध क्रीडा व सामाजिक संघटना, डॉक्टर, कलाकार, उद्योजक, खेळाडू,
व्यापारी संघटना तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन
करण्यात आले आहे. सकाळी 6 वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी उपस्थिती, 6.15 वाजता
वॉर्मअप, 6.45 वाजता मृद व जलसंधारणाची शपथ, 7 वाजता वॉकेथॉनचा प्रारंभ आणि 8 वाजता
समारोप होणार आहे. प्रथम पाच विजेत्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह
देण्यात येणार आहे.
युवकांसाठी रील फॉर सॉईल अँड वॉटर
कन्झर्वेशन स्पर्धा
जलसंधारण सप्ताहादरम्यान 15 ते 30 वर्षे
वयोगटातील युवक-युवतींसाठी ‘Reel for Soil and Water Conservation’ ही
जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धकांनी 30 ते 60 सेकंदांची
Instagram Reel तयार करून स्वतःच्या Public Instagram Account वर पोस्ट करायची
असून, संबंधित अधिकृत Instagram Account ला Tag करणे तसेच #SaveSoilSaveWater हा
हॅशटॅग वापरणे बंधनकारक आहे.
माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण,
जलसंधारण, पावसाचे पाणी संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट विकास, वृक्षारोपण,
पर्यावरण संरक्षण, पारंपरिक जलसंधारण पद्धती तसेच नाविन्यपूर्ण जलसंवर्धन उपाय
यांसारख्या विषयांवर रील तयार करता येणार आहे. Storytelling, Acting, Music,
Dance, Animation, AI Creative, Comedy, Short Film, Before-After आणि Drone
Visuals अशा विविध माध्यमांचा वापर करता येईल.
स्पर्धेचे परीक्षण विषय व संदेश,
कल्पकता, सामाजिक संदेश, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्ता आणि Instagram Engagement
या निकषांवर एकूण 100 गुणांमध्ये करण्यात येणार आहे. केवळ Likes किंवा
Followersच्या आधारे विजेता निश्चित न करता तज्ज्ञ परीक्षण आणि Social Media
Engagement यांचा समतोल साधण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर ‘महाराष्ट्र युवा
जलदूत’ या नावाने प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे 25 हजार, 15 हजार आणि 10 हजार
रुपये रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
शाळा-महाविद्यालयांत विविध उपक्रम
15 ऑगस्ट ते 26 जानेवारी दरम्यान
जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध, चित्रकला व पोस्टर, वाद-विवाद अशा
स्पर्धांसह ‘एक शाळा–एक शोषखड्डा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना
पाणी बचतीचे महत्त्व पटवून देणे, जलमित्र किंवा जलदूत घोषित करणे, 21 ऑगस्ट रोजी
सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन करणे, मृद व जलसंधारणाची शपथ घेणे तसेच
पुरस्कार व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.
अभियानाच्या कालावधीत ग्रामीण व शहरी
भागात मृद व जलसंधारणाच्या कामांचे भूमीपूजन व लोकार्पण, अमृत सरोवरांना भेट,
वृक्षारोपण, ‘एक पेड मां के नाम’ उपक्रम, लोकसहभागातून नाला, तलाव, विहीर व पाझर
तलाव स्वच्छता तसेच शेततळे, शेतबंधारे, CCT व Deep CCT कामांची पाहणी आदी उपक्रम
राबविण्यात येणार आहेत.
एक रिल... मातीसाठी ! एक रिल...
पाण्यासाठी! एक रिल... सुरक्षित भविष्यासाठी ! या संदेशातून युवकांचा मोठ्या
प्रमाणावर सहभाग वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रिल आणि वॉकेथॉनच्या
नोंदणीकरीता https://register.mahaevent.co.in/ या लिंकचा वापर करण्यात आला आहे.
जलसंधारण ही केवळ शासकीय जबाबदारी न राहता लोकचळवळ व्हावी, यासाठी जालना
जिल्ह्यातील नागरिकांनी या सर्व उपक्रमांत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन
मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता एन. पी. कटके यांनी केले आहे.
माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य
घडवा; जलसमृद्ध महाराष्ट्र घडवा हा संदेश या अभियानाच्या माध्यमातून देण्यात येणार
आहे.
-*-*-*-*-*-*-