Wednesday, 5 August 2026

जिल्ह्यातील मृद व जलसंधारणाची सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत - मंत्री संजय राठोड • राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी घेतला मृद व जलसंधारण विभागाच्या विविध विषयांचा आढावा

 




 

जालना,दि.5(जिमाका) : मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून जालना जिल्ह्यात सुरु असलेली सर्व कामे  वेळेत पूर्ण करावीत अशा सूचना राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मृद व जलसंधारण विभागाशी संबंधित विविध विषयांचा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अर्जुन खोतकर,आमदार नारायण कुचे, आमदार हिकमत उढाण, आमदार संतोष दानवे  जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, मनिषा देशपांडे, मृद व जलसंधारण विभागाचे ओएसडी अनंत जगताप आणि देवेंद्र भामरे,  मुख्य अभियंता हरिभाऊ गिते, अधिक्षक अभियंता अजितकुमार परांडे,  कार्यकारी अभियंता नरेंद्र कटके,  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे,  वरिष्ठ भूवैज्ञानिक सी. एच. गिरीधर  यांची उपस्थिती होती.

यावेळी मंत्री श्री. राठोड म्हणाले की, जिल्ह्यातील पाझर तलाव दुरुस्ती, जलसंधारणाच्या जुन्या कामांची दुरुस्ती आणि नवीन कामांचा प्रस्ताव मृद व जलसंधारण विभागाने तयार करावा. भूसंपादनामुळे रखडलेल्या मृद व जलसंधारण विभागाच्या प्रकल्पांचा आढावा घेताना आवश्यकतेनुसार भूसंपादनासाठी निधी वितरित करावा. घनसावंगी तालूक्यातील जांब तांडा साठवण तलाव या प्रकल्पाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करुन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेत बैठकीचे आयोजन करुन त्यात निर्णय घेवून प्रस्ताव सादर करावा. एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत विशेष निधी व अभिसरणाची प्रस्तावित कामे तात्काळ पूर्ण करावीत. मागील वर्षात अतिवृष्टीने क्षतीग्रस्त झालेल्या योजनाची कामे पूर्ण करावी. जिल्हाधिकारी यांनी दर महिन्याला मृद व जलसंधारण विभागाच्या कामाचा आढावा घ्यावा. तसेच सर्व संबंधित विभागांनी जलतारा प्रकल्प राबविण्याला प्राधान्य द्यावे. सध्या पुरेसा पाणीसाठा असला तरी ‘एल निनो’ मुळे निर्माण होणारी संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेवून नियोजन करावे. तसेच  एल निनोच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जलसंधारणाची जास्तीत-जास्त कामे करण्याच्या दिल्या. तसेच जालना जिल्ह्यात मृद व जलसंधारण विभागातील अभियंता यांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही लवकर करण्यात येणार असल्याचे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

यावेळी सर्व लोकप्रतिनिधी यांनी प्रत्येक विधानसभा मतदार संघातील 1 कोल्हापूरी पध्दतीच्या बंधाऱ्याचे रुपातंर बॅरेजेस मध्ये करण्याची मागणी केली.

प्रारंभी जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी एल निनोच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यासाठी तयार केलेल्या 7 सुत्री कार्यक्रमाची माहिती सादरीकरणांद्वारे सादर केली.

यावेळी जिपचे कार्यकारी अभियंता, विभागीय वन अधिकारी, उप वन संरक्षक, प्रकल्प संचालक कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)  मृद व जलसंधारण विभागाचे उपअभियंता यांची  उपस्थिती होती.

 

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment