Friday, 14 August 2026

अंमली पदार्थाच्या गैरवापराविरुद्ध 18 ऑगस्टला जालना येथे राष्ट्रीय शपथ

 


 

जालना,दि.14 (जिमाका) :  अंमली पदार्थांच्या वाढत्या गैरवापराविरोधात जनजागृती निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार देशभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने ‘नशा मुक्त भारत, विकसित भारत’ अभियानांतर्गत जालना जिल्ह्यात अंमली पदार्थाच्या गैरवापराविरुद्ध राष्ट्रीय शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवार, दि. 18 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद कार्यालय, जालना येथे होणार आहे.

संयुक्त राष्ट्र महासभेच्या डिसेंबर 1987 मध्ये झालेल्या ठरावानुसार दरवर्षी 26 जून हा दिवस ‘अंमली पदार्थांचा गैरवापर आणि बेकायदेशीर तस्करीविरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस’ म्हणून पाळला जातो. अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, तसेच समाजाला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी व्यापक लोकसहभाग निर्माण करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

भारत सरकारने अंमली पदार्थांच्या धोक्याविरुद्ध लढण्यासाठी ‘ड्रग्ज मुक्त भारत’ संकल्प निश्चित केला असून, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) यांच्या माध्यमातून ‘नशा मुक्त भारत, विकसित भारत’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून विशेषतः युवकांमध्ये अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम याबाबत जागृती करण्यात येत आहे.

जालना जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे विभागप्रमुख व अधिनस्त कार्यालये यांच्या सहभागातून हा शपथ कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर महिला मंडळे, युवक मंडळे, स्थानिक स्वयंसेवी संस्था, अनुदानित संस्था, महाविद्यालये, माध्यमिक व प्राथमिक विद्यालये, दिव्यांग संस्था, आश्रमशाळा, जिल्हा रुग्णालय, बसस्थानक व रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक कार्यकर्ते यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येणार आहे.

अंमली पदार्थांचे सेवन ही केवळ व्यक्तीची समस्या नसून त्याचा परिणाम कुटुंब, समाज आणि देशाच्या भवितव्यावर होत असतो. त्यामुळे अंमली पदार्थांच्या विरोधातील लढ्याला लोकसहभागाची जोड देणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अंमली पदार्थांच्या गैरवापराविरुद्ध राष्ट्रीय शपथ घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

ऑनलाइन शपथ घेण्याचेही आवाहन

नागरिकांना कार्यक्रमस्थळी उपस्थित राहण्याबरोबरच ऑनलाइन पद्धतीनेही अंमली पदार्थांच्या गैरवापराविरुद्ध शपथ घेता येणार आहे. यासाठी https://nmba.dosje.gov.in/volunteer/registration या संकेतस्थळावर ऑनलाइन शपथ घेऊन त्याचे प्रमाणपत्र प्राप्त करावे. तसेच शपथ घेतल्याचे छायाचित्र संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अंमली पदार्थमुक्त समाज निर्मितीसाठी प्रत्येक नागरिकाने या अभियानात सहभागी होऊन ‘नशा मुक्त भारत, विकसित भारत’ या संकल्पनेला बळ द्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment