शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व
जलसंधारणाबाबत 21 ऑगस्ट 2026 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात "महा वॉकेथॉन-वॉक
फॉर वॉटर" (Maha Walkathon-Walk for Water) या उपक्रमाचे असून मृद व जलसंधारण
विभागाच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची थीम सेव सॉईल, सेव वॉटर, सेक्युअर
टूमारो ( Save Soil, Save Water, Secure Tomorrow) अशी असून पाणी अडवा, पाणी
जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा हे घोषवाक्य आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात 21 ऑगस्ट
रोजी कमाल 3 किलोमीटर (महा वॉकेथॉन) चालणे आणि मृद व जलसंधारणाची शपथ घेणे असे या
कार्यक्रमाचे स्वरुप आहे.
शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारण
हे आवश्यक असून त्याचे महत्त्व पटवून देण्याकरिता राज्यात 15 ते 21 ऑगस्ट, 2026
दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आणि 15 ऑगस्ट, 2026 ते 26 जानेवारी, 2027 दरम्यान
"जलसंधारण अभियान" आयोजित करण्यात येत आहे. तर 21 ऑगस्ट 2026 रोजी
राज्यातील सर्व जिल्ह्यात शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत ‘महा
वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ (Maha Walkathon-Walk for Water) या उपक्रमाचे आयोजन करुन
जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरुप देण्याचे कार्य राज्य शासनाने हाती घेतले असून मृद
व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी या लोकचळवळीत राज्यातील सर्व नागरिकांनी
सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथे होणार
असून प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमाच्या आयोजनाचे प्रमुख जिल्हास्तरीय मृद व
जलसंधारण समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी हे असणार आहेत. या कार्यक्रमासाठी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा
अजित पवार, सर्व मंत्री, सर्व राज्यमंत्री, राज्यसभा/ लोकसभा/ विधानपरिषद/
विधानसभा सदस्य, सर्व जिल्हापरिषद अध्यक्ष/उपाध्यक्ष, सर्व महापौर / उपमहापौर,
सर्व नगराध्यक्ष/उपनगराध्यक्ष, सर्व जिल्हापरिषद / पंचायत समिती / ग्रामपंचायत
सदस्य, सर्व महानगरपालिका/नगरपालिका/नगरपंचायत सदस्य आणि इतर स्थानिक लोकप्रतिनिधी
यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.
सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी,
सर्व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी, जिल्ह्यातील नामांकित व प्रतिष्ठित व्यक्ती /
डॉक्टर / कलाकार/ उद्योजक, जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू,
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस, माय भारत,
नेहरु युवा केंद्र, भारत स्काऊट्स अँड गाईड्स, रेड क्रॉस, होमगार्ड, स्वयंसेवी
संस्था, रोटरी क्लब सदस्य, लायन्स क्लब सदस्य, रनिंग क्लब सदस्य, सायकलिंग क्लब
सदस्य, उद्योग व व्यापारी संघटना, सीएसआर भागीदार कंपन्या, विविध क्रीडा संघटना,
गुड मॉर्निंग ग्रुप्स, विविध व्यायाम शाळा, स्वयंसेवी संस्था, महिला, राज्याचे नागरिक
यांना सहभागी करण्यात येणार आहे.
क्यूआर आधारित ऑनलाईन
नोंदणी
महा वॉकेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआर आधारित ऑनलाईन नोंदणी करता
येणार आहे. 21 ऑगस्ट रोजी महा वॉकेथॉन मध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तीस
ई-प्रमाणपत्र मिळणार आहे. तर प्रथम दहा विजेत्यास जिल्हास्तरावर सन्मानचिन्ह
देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची सोशल मीडियासाठी #MahaWalkathon,
#WalkForWater, #SaveSoilSave Water हे हॅशटॅग वापरण्यात याव्यात, असे आवाहन
करण्यात आले आहे.
जलसंधारण सप्ताह
15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2026 या जलसंधारण सप्ताह दरम्यान राज्यातील सर्व 36
जिल्ह्यात मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील
15 ते 30 वयोगटातील युवक-युवतींच्या कल्पकतेचा उपयोग करुन इनस्टाग्राम (Instagram)
च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मृद व जलसंधारणाबाबत व्यापक
जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यव्यापी "Reel for Soil and Water
Conservation" स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. याची थीम Save Soil, Save
Water, Secure Tomorrow अशी असून सोशल मीडियावर #SaveSoil Save Water हे हॅशटॅग
वापरण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे एकाच हॅशटॅगखाली विक्रमी
संख्येने रील्स तयार होऊन मोठ्या डिजिटल सहभागाची नोंद होणार आहे.
रील स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरावर आयोजित
करण्यात आली असून या स्पर्धेचा पात्र वयोगट 15 ते 30 वर्षे असा ठेवण्यात आला आहे.
प्रत्येक स्पर्धकाने 30 ते 60 सेकंदांची Instagram Reel तयार करावी. व्हिडीओ/
रीलच्या सुरुवातीला व्हिडीओ / रीलचा उद्देश, स्वतःचे संपूर्ण नाव, जिल्ह्याचे नाव
नमूद सहभागी स्पर्धकांनी करणे आवश्यक आहे. स्पर्धाकांने Reel स्वतःच्या Public
Instagram Account वर पोस्ट करावी. स्पर्धकांनी मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत
Instagram Account ला Tag करणे बंधनकारक राहील. यासाठी अधिकृत हॅशटॅग #Save Soil
Save Water वापरणे अनिवार्य राहणार आहे.
स्पर्धेसाठी मान्यता दिलेला एक अधिकृत QR Code तयार करण्यात येईल. QR Scan
केल्यानंतर नोंदणी Reel Link Submit जिल्हा निवड→ Verification → सहभाग प्रमाणपत्र
अशी सोपी प्रक्रिया असणार आहे. Instagram हॅशटॅगबरोबर स्वतंत्र डिजिटल नोंदणी
केल्यामुळे शासनाकडे प्रत्येक सहभागीची अधिकृत नोंद उपलब्ध राहणार आहे. रील्स
अपलोड करण्याचा कालावधी 15 ते 21 ऑगस्ट 2026 असा आहे.
रील्स बनवण्यासाठी विषय
माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या
पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण
संरक्षण, गावातील यशस्वी मृद व जलसंधारण कामे, पारंपरिक मृद व जलसंधारण पद्धती,
माती व पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना, आजचे संवर्धन उद्याचे सुरक्षित
भविष्य असे रील्स बनवण्यासाठी विषय देण्यात आले आहेत.
रील्स बनवितांना Storytelling, Acting, Music, Dance, Animation, Al
Creative, Comedy, Short Film, Before-After, Drone Visuals किंवा अन्य
नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करता येणार आहे. मात्र रीलचा मुख्य संदेश माती आणि
पाणी संवर्धनाशी संबंधित असणे आवश्यक राहणार आहे.
रील्स करिता गुणांकन पद्धती पुढील प्रमाणे असणार आहे. विषय व संदेश - 30
गुण, कल्पकता -25 गुण, प्रभावी सामाजिक संदेश - 20 गुण, सादरीकरण व तांत्रिक
गुणवत्ता - 15 गुण, Instagram Engagement - 10 गुण असे एकूण - 100 गुण असणार आहेत.
केवळ Likes किंवा Followers वर विजेता निश्चित न करता तज्ज्ञ परीक्षण आणि Social
Media Engagement या दोन्हींचा समतोल ठेवण्यात येणार आहे. गुणांकानुसार विजेत्याची
निवड करण्यात येईल.
संपूर्ण राज्यासाठी एकच अधिकृत हॅशटॅग #SaveSoilSaveWater वापरण्यात येणार
असून, प्रत्येक जिल्ह्यातून किमान 250 रील्स आणि राज्यभरातून 10 हजार रिल्सचे
उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून लाखो नागरिकांपर्यंत डिजिटल स्वरूपात
मृद व जलसंधारणाचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. रील स्पर्धेत प्रत्येक
जिल्ह्यात प्रथम पुरस्कार ₹25 हजार व गौरवचिन्ह, द्वितीय पुरस्कार ₹15 हजार व गौरवचिन्ह
आणि तृतीय पुरस्कार ₹10 हजार व गौरवचिन्ह प्रस्तावित आहे. पात्र सहभागींना
ई-प्रमाणपत्र तसेच विजेत्यांना विशेष ‘युवा मृद-जलदूत’ म्हणून गौरविण्यात येणार
आहे
"एक Reel...
मातीसाठी !, एक Reel... पाण्यासाठी !, एक Reel... सुरक्षित भविष्यासाठी !" हा
रील्स प्रचारासाठी मुख्य संदेश आहे.
जलसंधारण अभियान
या स्पर्धेसोबतच 15 ऑगस्ट 2026 ते 26 जानेवारी 2027 या जलसंधारण
अभियानादरम्यान राज्यातील सर्व 36 जिल्ह्यात शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध
स्पर्धा (जलसंधारणाचे महत्त्व, पाण्याचे महत्व, जल है तो कल है, जलसंवर्धन उपाय,
घरातील पाण्याचा वापर - Water Budget), चित्रकला / पोस्टर स्पर्धा- जलसंवर्धन
उपाय, पाणी बचत उपाय, Rainwater Harvesting., वाद-विवाद स्पर्धाः (विषय- जलसंधारण
शासनाची जबाबदारी कि जनतेची जबाबदारी, इतर विषय), एक शाळा- एक शोषखड्डा उपक्रम राबविणे,
सर्व शाळांमध्ये पाणी बचतीचे महत्व विद्यार्थांना सांगणे., जलमित्र / जलदूत घोषित
करणे, 21 ऑगस्ट रोजी शाळेत माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या फोटोस
पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करणे, 21 ऑगस्ट रोजी मृद व जलसंधारणाची शपथ घेणे, 21
ऑगस्ट रोजी प्रमाणपत्र /सन्मानचिन्ह / पुरस्कार वितरण करणे, 21 ऑगस्ट रोजी गावातील
किंवा शहरातील जलतज्ञ/प्रतिष्ठीत व्यक्ती यांना प्रमुख पाहूणे म्हणून आमंत्रित
करणे असे कार्यक्रम घेण्यात यावेत.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळा व महाविद्यालयांना आणि उत्कृष्ट सादरीकरण
करणाऱ्या विद्यार्थ्यांना 26 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक
व सन्मानचिन्ह देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मृद व जलसंधारण
विभागाचे पुढील सोशल मीडिया अकाऊंट आहेत.
Instagram -
https://www.instagram.com/mahawalkathon2026/?hl=en
Facebook - https://www.facebook.com/mahawalkathon2026/
Twitter-
https://x.com/MahaWalkathon26
संकलन – गजानन पाटील,
विभागीय संपर्क अधिकारी,
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई.
No comments:
Post a Comment