Thursday, 23 July 2026

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी सैनिक, वीरपत्नी व पाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्कार; अर्ज करण्याचे आवाहन

 


जालना, दि.23 (जिमाका) : विविध क्षेत्रात उल्लेखनीय व अतिउत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या माजी सैनिक, वीरपत्नी तसेच त्यांच्या पाल्यांना सन 2025-26 या वर्षासाठी एकरकमी 1 लाख ते 2 लाख रुपयांपर्यंत ‘विशेष गौरव पुरस्कार’ देण्यात येणार आहेत. पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज 15 सप्टेंबर 2026 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या पुरस्कारासाठी शैक्षणिक, क्रीडा, कला, सामाजिक कार्य, उद्योग, पर्यावरण तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याचा विचार करण्यात येणार आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील पात्रता : इयत्ता दहावीमध्ये किमान 90 टक्के व बारावीमध्ये किमान 85 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविलेले माजी सैनिक किंवा वीरपत्नींचे पाल्य पात्र राहतील. तसेच पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेत विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविलेला किंवा IIT, IIM, AIIMS यांसारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळविलेल्या विद्यार्थ्यांनाही या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील पात्रता : राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य अथवा कांस्यपदक प्राप्त केलेले खेळाडू तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू पात्र राहतील. संबंधित क्रीडा प्रमाणपत्रे Indian Olympic Association, Sports Authority of India किंवा संबंधित National Federation यांच्याकडून प्रमाणित असणे आवश्यक आहे.

कला व सांस्कृतिक क्षेत्र : साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य तसेच इतर कला क्षेत्रात राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय पुरस्कार अथवा उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींनाही या पुरस्कारासाठी अर्ज करता येईल.

इतर क्षेत्रांतील पात्रता : पूर, भूकंप, वादळ, आग, दरोडा किंवा अपघात यांसारख्या नैसर्गिक अथवा आपत्तीजन्य परिस्थितीत बहुमोल योगदान दिलेल्या व्यक्ती, यशस्वी उद्योजक तसेच सामाजिक कार्य आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रात पुरस्कार प्राप्त व्यक्ती देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.

अर्जासोबत संबंधित कामगिरीचे पुरावे, पुरस्कारांची प्रमाणपत्रे, वर्तमानपत्रातील प्रसिद्धीची कात्रणे, छायाचित्रे तसेच आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.  इच्छुक व पात्र माजी सैनिक, वीरपत्नी आणि त्यांचे पाल्य यांनी आपले अर्ज 15 सप्टेंबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथे सादर करून या विशेष गौरव पुरस्कार योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने केले आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment