जालना,दि.10(जिमाका) : महिला व बाल विकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) आणि जिल्हा परिषद, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने 9 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर 2026 या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात ‘राष्ट्रीय पोषण माह 2026’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सुपोषित बालक, निरोगी माता आणि सक्षम समाज’ हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट असून यंदा ‘आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी’ या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्ण कांत कनवरीया यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बाल विकास, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या समन्वयातून जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे.
अभियानांतर्गत अंगणवाडी व्यवस्थापन समित्या अधिक सक्रिय करून अंगणवाडी केंद्रांमधील स्वच्छता, आहाराचा दर्जा आणि स्थानिक समुदायाचा सहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच, 3 ते 3 ० वर्षे वयोगटातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी सेविकांमार्फत नियोजनबद्ध गृहभेटी घेऊन पालकांना बालसंगोपन, आरोग्य आणि पोषणाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
बालकांच्या आहारात पुरेशा प्रथिनांचा समावेश, विविध अन्नगटांचा वापर आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध पौष्टिक अन्नपदार्थांचा वापर याबाबत जनजागृती केली जाणार आहे. पूरक पोषण आहार कार्यक्रमांतर्गत ताजे, विविध प्रकारचे व गरम शिजवलेले भोजन उपलब्ध करून देण्याबरोबरच साप्ताहिक मेनूमध्ये विविधता, स्वच्छता आणि आहाराच्या गुणवत्तेची हमी यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
नव्याने गठित अंगणवाडी व्यवस्थापन समित्या तसेच SNP मेनू बोर्ड यांच्या माध्यमातून पोषणविषयक उपक्रमांमध्ये समुदायाचा सहभाग, मालकीभाव आणि उत्तरदायित्व वाढविण्यात येणार आहे. प्रारंभिक बाल संगोपन व शिक्षण (ECCE) कार्यक्रमांतर्गत बालकांचा संज्ञानात्मक विकास आणि पुरेसे पोषण हे परस्परपूरक घटक असल्याचे अधोरेखित करण्यात येणार आहे.
मातृ वंदना योजनेची विशेष मोहीम
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत पात्र महिलांना योजनेचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी विशेष कागदपत्र पूर्तता व नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. यासोबतच महिला मेळावे, माताबैठका, रॅली, पथनाट्य, गायन स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला व रांगोळी स्पर्धा आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीतही पोषण, आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय पोषण माह अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, लोकप्रतिनिधी, स्वयं-सहायता बचत गट तसेच पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्ण कांत कनवारीया यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment