जालना,दि.19(जिमाका): जिल्ह्यातील
काही पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा साठा तात्पुरता उपलब्ध नसल्याने काही ठिकाणी पंप
बंद ठेवण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण
निर्माण होत असून, अनेक वाहनधारक आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात पेट्रोल व डिझेल
भरून घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी जिल्ह्यातील विविध पेट्रोल
पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण
होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत
जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना
दिल्या आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच इंधनाचा पुरवठा
सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाने दिलेल्या निर्देशांनुसार संबंधित तेल कंपन्या आणि पेट्रोल पंप
चालकांशी समन्वय साधून पेट्रोल व डिझेलचा पुरवठा नियमित ठेवण्याचे आदेश देण्यात
आले आहेत. तसेच पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होऊ नये यासाठी आवश्यकतेनुसार
पोलीस प्रशासनाच्या मदतीने नियोजन करण्यात येणार आहे. यासोबतच स्थानिक वृत्तपत्रे,
सोशल मिडिया आणि इतर माध्यमांद्वारे अधिकृत व सत्य माहिती जनतेपर्यंत
पोहोचविण्यावर भर देण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारची अफवा, चुकीची माहिती किंवा घबराट
निर्माण करणारे संदेश पसरवू नयेत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील सर्व पेट्रोल आणि डिझेल पंपांवर तात्काळ तपासणी मोहीम
राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मोहिमेद्वारे इंधन साठा, विक्री आणि
वितरणाची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. कोणत्याही पेट्रोल पंप चालकाकडून
जाणीवपूर्वक साठेबाजी, कृत्रिम टंचाई निर्माण करणे, जादा दराने विक्री करणे अथवा
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल असे प्रकार आढळल्यास संबंधितांविरुद्ध
कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अशा प्रकरणांमध्ये जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955
तसेच इतर लागू कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच सर्व संबंधित
अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील परिस्थितीवर वैयक्तिक लक्ष ठेवण्याचे
निर्देश देण्यात आले आहेत.
याशिवाय, दररोज बंद आणि सुरू असलेल्या पेट्रोल पंपांचा अहवाल, उपलब्ध इंधन
साठ्याची माहिती आणि करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल प्रशासनाकडे सादर
करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आणि
आवश्यकतेपुरतेच इंधन खरेदी करण्याचे आवाहन केले असून, जिल्ह्यात इंधन पुरवठा
सुरळीत ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी
सुकेशिनी पगारे यांनी सांगितले आहे.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment