जालना दि.1 (जिमाका): जालना जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ, मार्गदर्शन आणि पुनर्वसनासाठीची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी याकरीता दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारण्यात आले असुन, या केंद्राद्वारे जिल्ह्यातील दिव्यांगाना विविध सुविधा मिळण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांनी केले.
जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, महापौर वंदना मगरे, मनपा आयुक्त अंजली शर्मा, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती मुंडे पुढे म्हणाल्या की, दिव्यांग पुनर्वसन केंद्रांमुळे दिव्यांग व्यक्तींना अनेक महत्त्वाच्या सुविधा मिळण्यास मोठी मदत होणर आहे. अशा केंद्रांचा मुख्य उद्देश म्हणजे दिव्यांगांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे आहे. या केंद्रामुळे जिल्ह्यातील दिव्यांगांना मोठा आधार मिळणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून त्यांना योग्य मार्गदर्शन, कागदपत्रांची पूर्तता, वैद्यकीय मदत आणि पुनर्वसनाच्या सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. जालना येथील हे केंद्र महाराष्ट्रात अग्रस्थानी पोहोचावे यासाठी शासनस्तरावर आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी कार्यक्रमास नागरिक, दिव्यांग बांधव, दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी, विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.


No comments:
Post a Comment