जालना,दि.11(जिमाका) : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना प्रभावीपणे करण्यासाठी सर्व संबंधित विभागांना
तातडीने उपाययोजना राबविण्याचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी निर्देश दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन
समितीच्या सभागृहात आयोजित मान्सुनपूर्व आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल
बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी
कृष्णकांत कांवरिया, महानगर पालिका आयुक्त अंजली शर्मा, पोलीस अधीक्षक तेगबीर
सिंह संधू, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी
श्रीमती पगारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती
मित्तल म्हणाल्या की, जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांनी नैसर्गिक आपत्तीचा सामना
प्रभावीपणे करण्यासाठी तालुका व जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क
ठेवावी. तसेच जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनानुसार, जिल्हा
आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचे अद्ययावतीकरण करून संबंधित विभागांनी आवश्यक माहिती
तातडीने सादर करावी. तसेच तालुका स्तरावरही स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन आराखडे
तयार करून ते जिल्हा प्रशासनाकडे सादर करावेत.
जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा
इतिहास लक्षात घेऊन 2005, 2006 आणि 2008 मधील पूरग्रस्त भागांचा अभ्यास करून त्या
ठिकाणी विशेष दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. पूरस्थितीत कोणत्या विभागाने
कोणती जबाबदारी पार पाडायची यासाठी स्वतंत्र एसओपी तयार करण्यासाठी माहिती सादर
करावी. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवण्यात
यावे. पोलीस, आरोग्य, महसूल, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, पंचायत राज,
दूरसंचार आदी विभागांनी आपत्ती कालावधीत समन्वय ठेवून कार्य करावे. सर्व
तहसीलदारांनी तालुका आपत्ती व्यवस्थापन समित्यांच्या बैठका घेवून स्थानिक
पातळीवरील उपाययोजनांचा आढावा घ्यावा. पुर परिस्थितीत नागरिकांना हलविण्याची वेळ
आली तर यासाठी मोठे हॉल, शाळा यांची पाहणी करुन ठेवावी तसेच पुर प्रवण गावामधील बचाव पथके तयार ठेवण्याच्या
सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
तसेच पावसाळ्यात साथीचे आजार
फैलावू नयेत, यासाठी आरोग्य विभागाने विशेष दक्षता घ्यावी. सर्व प्राथमिक आरोग्य
केंद्रामध्ये औषधीसाठा उपलब्ध ठेवावा. तसेच ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम
राबविण्याच्या सूचना देण्यात याव्यात. सर्व पिण्याच्या पाण्याचे स्रोत सुरक्षित
ठेवावेत. महावितरणने पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांची तपासणी करून धोकादायक
झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम तात्काळ पूर्ण करावेत. तसेच ट्रान्सफार्मर
परिसरातील स्वच्छता करुन घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत वीजपुरवठा खंडित झाल्यास
तातडीने दुरुस्ती पथके कार्यरत ठेवावेत. जिल्ह्यातील पाझर तलाव/साठवण तलावाची
देखभाल संबंधीत विभागांनी दूरुस्ती करुन घ्यावी. नदी पात्रातील अतिक्रमण तात्काळ
काढून घ्यावीत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील सर्व रस्ते, पूल व
नाले यांची पाहणी करून आवश्यक त्याठिकाणी तात्काळ दुरुस्तीची कामे करुन घ्यावीत.
शहर व ग्रामीण भागातील जलनिस्सारण व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी नाल्यांची साफसफाई
करण्याचे निर्देशही देण्यात आले. जालना महानगर पालिका आणि सर्व नगरपालिकानी
शहरातील गटार व्यवस्था, नाले यांचे साफसफाई करुन घ्यावी. तसेच जाहिरात फलकांची
तपासणी करुन घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत
नागरिकांना त्वरित मदत मिळावी यासाठी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्कासाठी
दूरध्वनी, मोबाईल, व्हीएचएफ, इंटरनेट आणि एसएमएस यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याचे
आदेश देण्यात आले. गावपातळीवर आपत्ती व्यवस्थापन पथके तयार करून त्यांना प्रशिक्षण
देण्याच्याही यावेळी सांगितले.
अतिवृष्टी, पूर किंवा
वादळाच्या परिस्थितीत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता जिल्हा प्रशासनाच्या
सूचनांचे पालन करावे. आपत्ती
व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज असुन, आपत्तीत मदतीसाठी नागरिकांनी जिल्हा
नियंत्रण कक्षाचा टोल फ्रि क्रमांक 1077 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी
केले आहे.
बैठकीत प्रारंभी निवासी
उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी सादरीकरणांद्वारे आपत्ती व्यवस्थापन
मान्सुनपूर्व आढावा बैठकीचे सादरीकरणाद्वारे माहिती सादर केली.
-*-*-*-*-*-*-
.jpeg)

No comments:
Post a Comment