जालना,दि.7(जिमाका) :भारत सरकारच्या आगामी 16 व्या
जनगणना-2027 प्रक्रियेअंतर्गत नागरिकांनी डिजिटल स्व-गणना (Self Enumeration)
प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
यासंदर्भात गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी तथा
प्रधान जनगणना अधिकारी जालना आशिमा मित्तल यांनी सर्व शासकीय व निमशासकीय
कार्यालयांना सूचना जारी केल्या आहेत.
प्रशासनाने दिलेल्या
माहितीनुसार, देशातील 16 वी जनगणना जानेवारी 2026 ते फेब्रुवारी 2027 या कालावधीत
दोन टप्प्यात पार पडणार आहे. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांना स्वतःची
माहिती ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी
भारत सरकारच्या https://se.census.gov.in या संकेतस्थळावर डिजिटल
स्व-गणना प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ही ऑनलाइन स्व-गणना प्रक्रिया
1 ते 15 मे, 2026 या कालावधीत राबविण्यात येत असून, सर्व शासकीय व निमशासकीय
कार्यालयांचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वतःची डिजिटल स्व-गणना पूर्ण
करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच संबंधित कार्यालयांतील सर्व अधिकारी आणि
कर्मचाऱ्यांनीही ही प्रक्रिया निश्चित मुदतीत पूर्ण करावी. ज्या अधिकारी अथवा
कर्मचाऱ्यांनी अद्याप स्व-गणना केलेली नाही किंवा प्रक्रिया अपूर्ण ठेवली आहे,
त्यांनी तातडीने नोंदणी पूर्ण करून त्याचा प्रमाणित अहवाल सादर करावा. संबंधित
कार्यालयांनी 15 मे 2026 पर्यंत डिजिटल स्व-गणना पूर्ण करून 16 मे, 2026 रोजी पर्यंत
संख्यात्मक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले
आहेत.
तसेच जिल्ह्यातील सर्व
नागरिकांनी देखील या सुविधेचा लाभ घेऊन स्वतःची व कुटुंबाची माहिती अचूकपणे
नोंदवावी. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी आशिमा मित्तल यांनी
केले आहे.
-*-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment