जालना, दि. 9 (जिमाका) :- महिला व बाल विकास विभागाने, समस्या व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ
मिळण्यासाठी त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या हेतूने जिल्हा तसेच तालुकास्तरावर महिलांसाठी विशेष लोकशाही दिन पाळण्यात येतो.
तालुकास्तरावर प्रत्येक तहसिल कार्यालयात महिन्याच्या चौथ्या सोमवारी आणि
जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे
आयोजन करण्यात येते. तरी सोमवार दि. 15 सप्टेंबर 2025 रोजी
सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करु इच्छिणाऱ्या महिलांनी आपली तक्रार दोन प्रतीमध्ये महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जालना येथे दाखल करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी केले आहे.
अर्ज स्वीकृतीचे निकष पुढीलप्रमाणे तक्रार,
निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे, तक्रार निवेदन दोन प्रतित सादर करावे, सदरील
प्रकरण न्याय प्रविष्ठ नसावे, अर्ज विहित नमुन्यात व आवश्यक त्या कागदपत्रासह सादर
करावा, सेवा व आस्थापना विषयक बाबी विचारात घेतल्या जाणार नाहीत. निवडणुक आचार संहिता काळात त्या त्या स्तरावर,
विधीमंडळ अधिवेशन काळात राज्यस्तर महिला लोकशाही दिन पाळण्यात येत नाही.
महिलांनी
प्रथम संबंधीत तहसिलदार यांच्याकडे महिला लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी दोन प्रतीत तक्रार
दाखल करावी. तालुका महिला लोकशाही दिनात एका महिन्यांचे आत कार्यवाही न झाल्यास
संबंधीत महिला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करु शकतील. तालुकास्तरावरील लोकशाही दिनात अर्जदार महिलेस अंतिम उत्तर शक्य तितक्या लवकर जास्तीत जास्त एक
महिन्याच्या आत देण्याचे बंधन संबंधित अध्यक्ष तथा तहसिलदार व सदस्य सचिव तथा बाल
विकास प्रकल्प अधिकारी यांची राहील. महिलांनी तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी
तालुकास्तरावर तहसिल कार्यालय व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
यांच्याशी संपर्क करुन या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment