जालना, दि. 16 (जिमाका) :- जिल्ह्यात आगामी
कालावधीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन, श्री संत गजानन महाराज पायी दिंडी,
श्रावण मासारंभ आणि नागपंचमी आदी सण, उत्सव तसेच शहरातील मिरवणुका व विविध
कार्यक्रम आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक
शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3)
अन्वये जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत दि. 29 जुलै 2025 पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी करण्यात आली आहे, असे
आदेश अपर जिल्हादंडाधिकारी गणेश
महाडिक यांनी जारी केले आहेत.
संपूर्ण जालना जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश दि. 29 जुलै 2025 रोजीच्या 24 वाजेपर्यंत लागू राहील. या
आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा
करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगता येणार नाही. व्यक्तीचे
प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे
म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा
कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक
काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश अधिकारी- कर्मचाऱ्यांना तसेच उपविभागातील
पोलिस अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूका, सभा, मोर्चा यांना
लागू राहणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment