जालना, दि. 29 (जिमाका) :- महाराष्ट्रातील सर्व व्यक्तींनी मराठी भाषेचा आग्रह धरुन समोरील व्यक्तींशी मराठी भाषेतच संवाद साधावा. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 नुसार शासकीय कामकाज 100 टक्के मराठी भाषेतून करणे आवश्यक आहे. मराठी भाषा जतन व संवर्धनाची चळवळ सर्व शासकीय कार्यालयातून उभारावी, असे प्रतिपादन मराठी भाषा समितीचे अशासकीय सदस्य तथा जेईएस महाविद्यालयाचे प्रा.डॉ. राजेंद्र सोनवणे यांनी केले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवाडानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा समितीचे अशासकीय सदस्य तथा जेईएस महाविद्यालयाचे प्रा.राजेंद्र सोनवणे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार प्रणाली तायडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सुर्यवंशी, नायब तहसीलदार तुषार निकम, ज्योती वाघ यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा या मुख्य धोरणास अनुसरुन मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा दि.14 ते 28 जानेवारी या कालावधीत साजरा करण्यात येत असतो. सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये, महामंडळे, केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालये, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खाजगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था, महाविद्यालयामधून राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा केला जात असतो. असेही त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-*-*-*-*-


No comments:
Post a Comment