जालना,दि.08(जिमाका): जिल्ह्यातील विविध बँकांमधील वैयक्तिक, संस्थात्मक आणि सरकारी योजनांच्या खात्यांमध्ये सुमारे 30 कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी शिल्लक आहेत. या ठेवींचा एकूण 1,60,499 खातेदारांना परतावा मिळवून देण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर, 2025 या कालावधीत जिल्हा अग्रणी बँक - बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या पुढाकाराने आणि सर्व सदस्य बँकांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार यांनी दिली.
श्री. केदार यांनी सांगितले की, देशभरात सुमारे 1 लाख 35 हजार कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी विविध बँकांमध्ये शिल्लक आहेत. त्यापैकी महाराष्ट्र राज्यात 5,866 कोटी रुपये, ज्यात वैयक्तिक खात्यांच्या 4,612 कोटी, संस्थांच्या 1,082 कोटी, आणि सरकारी योजनांतील 172 कोटी रुपयांच्या ठेवी समाविष्ट आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, 10 वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या खात्यांतील ठेवी ‘ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी (Depositor Education and Awareness Fund -
DEAF)’ मध्ये हस्तांतरित केल्या जातात. तथापि, खातेदारांना आपले पैसे परत मिळवण्याचा पूर्ण हक्क आहे. ठेवी परत मिळविण्यासाठी संबंधित खातेदारांनी आपल्या बँकेत संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे व अद्ययावत KYC सादर करणे आवश्यक आहे. या मोहिमेद्वारे सर्व बँकांकडून जनजागृती शिबिरे व ग्राहक भेटी आयोजित केल्या जाणार असून, खातेदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी व्यवस्थापक मंगेश केदार यांनी केले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment