जालना
दि.1 (जिमाका): महाराष्ट्राने स्थापने पासूनच सर्वच क्षेत्रामध्ये विकासाच्या प्रक्रियेत
मोठी भरारी घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्यामुळेच आपले
महाराष्ट्र राज्य देशातील अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते, असे प्रतिपादन राज्याच्या
पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री
श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांनी केले.
महाराष्ट्र दिनाच्या 67 वा स्थापना दिनानिमित्त जालना येथील पोलीस मुख्यालय मैदानावर श्रीमती मुंडे यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी महापौर श्रीमती वंदना मगरे, खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार अर्जुन खोतकर, उपमहापौर राजेश राऊत, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कंवरिया, मनपा आयुक्त अंजली शर्मा, अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, राज्य
शासन विविध कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्याचा
प्रयत्न करत असून, विकासाच्या प्रक्रियेत राज्य शासन शेतकरी, कष्टकरी आणि
सर्वसामान्य जनतेच्या पाठिशी सदैव उभे आहे. तसेच सर्वच क्षेत्रात विकासाचा
दृष्टीकोन ठेवत, राज्य शासनाची वाटचाल सुरु आहे.
जगातील
सर्वात मोठी भारताची 2027 ची जनगणना ही देशाची 16 वी जनगणना पहिल्यांदाच 'डिजिटल’
पध्दतीने राबविण्यात येत आहे. ही जनगणना दोन टप्प्यांत पार पडणार आहे. ही जनगणना अधिक
सुलभ, अचूक आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने नागरिकांना स्वगणना
(Self Enumeration) करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या प्रक्रियेमुळे
नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली सर्व
नागरिकांनी आपली स्वतःची अचूक माहिती स्वतः नोंदविण्याचे त्यांनी यावेळी आवाहन
केले.
तसेच
भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेचा उल्लेख करत पालकमंत्री
श्रीमती मुंडे यांनी नागरिकांना आपल्या मतदार यादीतील माहिती तपासून घेण्याचे आवाहन
केले. तसेच ‘मिशन कर्मयोगी’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या ‘साधना सप्ताह 2026’मध्ये राज्याने
देशात प्रथम क्रमांक मिळवून नवा मानदंड आखल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यावरण
व वातावरणीय बदल विभागाच्या ‘माझी वसुंधरा 6.0’ मोहिमेचा आढावा देत पालकमंत्री यांनी
1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत जिल्ह्यातील 28 हजारांहून अधिक स्थानिक
स्वराज्य संस्थांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी झाल्याचे सांगितले. तसेच पशुसंवर्धन
विभागाच्या ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने’ अंतर्गत ग्रामीण नागरिकांना
रोजगार बळकट करून महाराष्ट्राचा ‘आर्थिक कणा’ बनविण्याचा ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन आणि शेळी-मेंढी पालनासाठी तांत्रिक व आर्थिक मदत देऊन ग्रामीण
कुटुंबांचे उत्पन्न वाढवण्याचा हा उपक्रम असल्याचे पालकमंत्री यांनी नमूद केले.
विविध योजनांच्या यशस्वी
अंमलबजावणीमुळे जालना जिल्हा देखील अग्रेसर राहिला आहे. जालना जिल्ह्यासाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षात
जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत प्राप्त निधी विविध विकास कामांसाठी शंभर
टक्के खर्च झाल्याने पालकमंत्री यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले. जालना ड्रायपोर्ट,
जालना-नांदेड समृध्दी महामार्ग आणि जालना–जळगाव रेल्वे मार्ग यासारख्या पायाभूत प्रकल्पांचे
काम चांगल्या गतीने सुरू असून, त्यामुळे जिल्हय़ातील उद्योग व अर्थव्यवस्थेला मोठी
गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात
‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ राबविण्यात येत असुन, या अंतर्गत
आतापर्यंत जिल्ह्यात 47 शिबीरे आयोजन करुन, सुमारे 44 हजाराहून अधिक लाभार्थ्यांना
विविध लाभ देण्यात आले. तसेच जलसंपदा विभागाच्यावतीने 15 ते 30 एप्रिल या कालावधीत
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा-2026’ ही मोहिम जिल्ह्यात
यशस्वीरित्या पार पडली. तसेच कृषी विभागामार्फत महा-डिबीट या पोर्टलद्वारे जिल्ह्यातील
18 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना 82 कोटी रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले.
तसेच प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजने अंतर्गत 153 लाभार्थ्यांना सुमारे
10 कोटी रुपयांचे कर्ज तसेच 4 कोटी रुपयांचे
अनुदान वितरीत करण्यात आले आहे. तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह योजने
अंतर्गत 2025-26 मध्ये अपघातात मृत्यू झालेल्या, तसेच अपंगत्व आलेल्या एकुण 127 शेतकऱ्यांच्या
वारसदारांना 2.53 कोटी रुपये सानुग्रह अनुदान मंजूर झाले आहे. राज्याच्या उद्योग विभागातंर्गत
राबविण्यात येणाऱ्या महत्वकांक्षी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ योजने अंतर्गत
जिल्ह्यात यावर्षी 243 नविन उद्योग उभे राहिल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.
जिल्ह्यात
एलपीजी गॅस आणि पेट्रोलचा मुबलक साठा उपलब्ध असून, नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही
अफवांवर विश्वास ठेवू नये. पाणी टंचाईकरिता आवश्यक
उपाययोजना करण्यात आल्या असुन, सर्वसामान्य नागरिकांना पाणी टंचाईचा त्रास होणार नाही,
याबाबत प्रशासनास सूचना देण्यात आल्याचे सांगितले.
महाराष्ट्र
राज्य सेवा हक्क अधिनियम अंतर्गत जालना जिल्हा प्रशासनाने ‘घरपोच शासकीय सेवा’ या नाविन्यपूर्ण
उपक्रमाची अंमलबजावणी केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयास राज्यस्तरीय कार्यक्रमात सन्मानित
करण्यात आले. तसेच जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या ‘जालना मित्र’ या डिजिटल अॅपद्वारे
नागरिकांना घरबसल्या योजनांची माहिती आणि विविध सेवांचा लाभ मिळत असल्याचे सांगितले.
तसेच
सद्या राज्यभर तापमानात वाढ झाली असुन, उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याचे सांगितले.
नागरिकांनी जास्त वेळ बाहेर राहणे, योग्यरीतीने पाणी आणि अन्न घेणे, थंड वस्त्रे वापरणे
यासारख्या सावधानता बाळगण्याचे आवाहन पालकमंत्री यांनी केले.
प्रारंभी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी परेड निरीक्षण केले.
त्यानंतर विविध पथकांनी संचलन केले. पोलीस शहर व ग्रामीण यंत्रणेचे पथक, वाहतूक
नियंत्रण विभाग, गृह रक्षक दल, शीघ्र प्रतिसाद दल यांच्यासह अग्निशमन दल, श्वान
पथक, आपत्ती व्यवस्थापन वाहन, 108 रूग्णवाहिका आदी वाहनांचा संचलनात उत्स्फूर्त
सहभाग होता. पोलीस वाद्यवृंद पथकाच्या स्फूर्तीदायक महाराष्ट्र गीताच्या वादनाने
कार्यक्रमाची रंगत वाढवली.
यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याहस्ते विविध पुरस्कारांचे
वितरण करण्यात आले. तसेच पोलीस विभागाला वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. मुख्य
ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास यावेळी स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी,
अधिकारी-कर्मचारी, पत्रकार व नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
****
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment