जालना,दि.30(जिमाका) : जालना
जिल्ह्याच्या स्थापनेला 45 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या
वतीने ‘रायझिंग जालना’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रगती, नवोन्मेष,
एकता आणि समृद्धीच्या दिशेने वाटचाल दर्शविणारा हा कार्यक्रम जिल्ह्याच्या विकासाचा
आढावा घेणारा आणि भविष्यातील दिशा ठरविणारा ठरणार आहे. हा भव्य कार्यक्रम 1 मे
2026रोजी सकाळी 10 वाजल्यापासून महाराजा अग्रसेन फाउंडेशन, जालना येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण
व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा प्रज्ञा
गोपीनाथ मुंडे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच विशेष अतिथी म्हणून
आमदार सर्वश्री विक्रम काळे, राजेश राठोड, महापौर श्रीमती वंदना मगरे, खासदार सर्वश्री
कल्याण काळे, संजय जाधव, आमदार सर्वश्री सतीश चव्हाण, बबनराव लोणीकर, अर्जुनराव खोतकर,
नारायण कुचे, संतोष दानवे, हिकमत उढाण, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांची प्रमुख उपस्थिती
राहणार आहेत.
जालना
जिल्ह्याच्या 45 वर्षांच्या वाटचालीतील उल्लेखनीय कामगिरी, विविध विकास प्रकल्प, तसेच
आगामी योजनांचे सादरीकरण यावेळी करण्यात येणार आहे. तसेच जालन्याच्या विकासाचा आढावा
घेत भविष्यातील दृष्टीकोन सादरीरकरण करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनाला विशेष
प्राधान्य देत या कार्यक्रमात विविध अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्याच्या
सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या योजनांचा आढावा घेण्यात येणार असून, उद्योग,
शेती, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील प्रगती अधोरेखित केली जाणार
आहे. तसेच, नागरिकांच्या सहभागातून विकासाला गती देण्यावर भर दिला जाणार आहे.
तसेच स्थानिक
उद्योग, स्टार्टअप्स, कृषी उत्पादने, विविध शासकीय योजना, स्थानिक खाद्यपदार्थाचे
50 हून अधिक स्टॉल्स असणार आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध गायक सरकाटे
ग्रुपद्वारे सादर करण्यात येणाऱ्या ‘गरजा महाराष्ट्र’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमद्वारे जालनाकरांना एका भव्य सांस्कृतिक
कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध परंपरा, वैभवशाली संस्कृती, विविध
लोककला आणि गौरवशाली इतिहास यांचा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे.
हा सोहळा केवळ 45 वर्षांच्या वाटचालीचा उत्सव
नसून, जालन्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येण्याचा आणि नवा संकल्प करण्याचा महत्त्वपूर्ण
टप्पा ठरणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून
जिल्ह्याच्या प्रगतीच्या प्रवासाचा भाग होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment