Thursday, 30 April 2026

नागरिकांना एकत्रित आयुष्यमान भारत, जनआरोग्य योजनेतून आरोग्य संरक्षण-पालकमंत्री पंकजा मुंडे

 

 

जालना,दि.30(जिमाका) : राज्यातील सर्व नागरिकांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून आरोग्य संरक्षण देण्यात येत आहे. या योजनेतून राज्यातील नागरिकांना उत्तम व मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध होत असून, वैद्यकीय खर्च शून्यावर येण्यासाठी मदत झाली आहे. पात्र व गरजू रूग्ण उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांनी आज दिले.

जिल्हास्तरीय जनआरोग्य संरक्षण कार्यकारिणीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार सर्वश्री बबनराव लोणीकर, अर्जुनराव खोतकर, संतोष दानवे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कंवरिया, मनपा आयुक्त अंजली शर्मा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भुसारे आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना संपूर्णपणे कागदविरहित आणि संगणक प्रणालीद्वारे राबवली जाते. ही योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबांना लागू आहे. आता सर्व ग्रामीण आणि शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे या योजनेंतर्गत समाविष्ट केली जात आहेत, ज्यामुळे गरीबांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनांचा जिल्ह्यातील अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ होऊन, त्यांना आरोग्य संरक्षण मिळावे, यासाठी आरोग्य यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी निर्देश दिले.

पात्र व गरजू रूग्णांना उपचार मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने काम करणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समिती अधिक सक्रिय ठेवावी. रुग्णालयांनी लाभार्थ्यांशी संवेदनशीलतेने वागावे आणि उपचार प्रक्रियेत पारदर्शकता राखावी. योजनांचा व्यापक प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी ग्रामस्तरापर्यंत जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश देताना, प्रत्येक पात्र नागरिकाला योजनेचा लाभ मिळवून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असून यासाठी तालुका स्तरावर वैद्यकीय शिबिरे आयोजित करण्याबाबत तसेच आयुष्मान कार्ड काढण्याची मोहीम प्रभावीपणे राबवावी, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी या एकत्रित योजनेची जिल्ह्यात केलेल्या अंमलबजावणीचा सादरीकरणाद्वारे आढावा सादर केला.

नागरिकांनी ग्रामपंचायत, रेशन दुकानदार, आशा सेविका, योजनेतील अंगीकृत रुग्णलयातील आरोग्य मित्र यांच्या संपर्क साधुन आपले आयुष्मान कार्ड काढून घ्यावे असे आवाहन पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी यावेळी केले.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी या एकत्रित योजनेची जिल्ह्यात केलेल्या अंमलबजावणीचा सादरीकरणाद्वारे आढावा सादर केला.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment