जालना, दि.3 (जिमाका): जिल्ह्यात कोणत्याही आस्थापनांनी बालकामगारांना
कामावर ठेवू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या. जिल्हाधिकारी
कार्यालयातील सभागृहत दि. 30 रोजी संपन्न झालेल्या बालकामगार व वेठबिगार कृती दलाची
बैठकीमध्ये जिल्हाधिकारी मित्तल बोलत होत्या. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त यु.स. पडियाल
यांच्यासह विविध विभागातील अधिकारी यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी जिल्ह्यात
मोठ्या प्रमाणात बालकामगार व वेठबिगार बाबत जन जागृती करण्याचे निर्देश दिले. तसेच
14 वर्षाच्या आतील बालकास कामावर ठेवणे व 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन कामगारास कामावर
ठेवणे कायद्याने गुन्हा असूनख् त्याबाबत 20 ते 50 हजार रु. दंड व 6 महिने ते 2 वर्ष
शिक्षेची तरतुद आहे. बालकामगार कामावर ठेवल्याने बालकामगाराचे शारिरीक व मानसिक नुकसान
होते. बालकामगारास अत्यंत वेदना होतात व शिक्षणाच्या वयात काम करावे लागल्याने त्यांचे
संपूर्ण भविष्य उध्वस्त होते. त्यामुळे जालना जिल्ह्यात कोणत्याही आस्थापनेने, कारखान्याने
अथवा हॉटेल, गॅरेज इ. चालकांनी बालकामगारांना कामावर ठेवू नये. कोणत्याही आस्थापनेवर
बालकामगार काम करताना आढळून आल्यास त्या संबंधीत आस्थापना मालकाविरुद्ध कडक कायदेशीर
कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही बालकामगारांना कामावर ठेवू नये. व बालकामगारांचे
भविष्य वाचवावे असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment