जालना दि. 9 (जिमाका) :- जागतिक बाजारपेठेत व्यवसाय संधी वाढत आहेत. तरुण उद्योजकांना आयात-निर्यात व्यवसायाकडे वळवण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य सरकारच्या स्वायत्त संस्थेकडून 'अमृत'च्या लक्ष्यित गटासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या, तसेच विद्यमान व्यवसायाचा विस्तार करू इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे. आयात-निर्यात क्षेत्रामध्ये रोजगार व उद्यमशीलतेच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे इच्छुक युवक-युवती, व्यापारी आणि उद्योजकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
या प्रशिक्षणामध्ये परदेशी व्यापार धोरणे, निर्यात कागदपत्रे, सीमाशुल्क प्रक्रिया, परदेशी बाजारपेठेची निवड, लॉजिस्टिक्स व्यवस्थापन, ऑनलाइन व्यापार तंत्रज्ञान तसेच विविध सरकारी योजनांचा लाभ अशा महत्त्वपूर्ण विषयांवर प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणार्थीना तज्ज्ञ मार्गदर्शन, उद्द्योग क्षेत्राशी नेटवर्किंग, व्यवसाय स्थापनेसाठी तांत्रिक साह्य अशा सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment