Wednesday, 31 October 2018

शहरात एकता दौड संपन्न जालना शहर वासियांना नोंदवला उत्स्फुर्त सहभाग पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन एकता दौडचा शुभारंभ



जालना, दि. 31 – सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शहरात एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील मस्तगड येथे सरदार वल्लभभाई पटेल तसेच स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी  पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले व एकता दौडला हिरवी झेंडी दाखवुन शुभारंभ केला.
याप्रसंगी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, नगराध्यक्षा श्रीमती संगीता गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, महावीर ढाका,रामेश्वर भांदरगे,  सिद्धीविनायक मुळे,  रवी अग्रवाल,  चम्पालाल भगत, सुनील दायमा,  जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर, तहसिलदार संतोष बनकर, बीपीन पाटील, उप विभागीय अधिकारी केशव नेटके, मनोज देशमुख,  जिल्हा शल्य चिकित्सक एम के राठोड  आदींनी वल्लभभाई पटेल तसेच स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले व एकता दौडमध्ये सहभाग नोंदवला. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
मस्तगड येथुन सुरु झालेली ही रॅली मंमादेवी, सुभाषचंद्र बोस पुतळा, पाणीवेस, काद्राबादमार्गे शिवाजी पुतळा येथे येऊन विसर्जित करण्यात आली. या दौडमध्ये जिल्हा परिषद प्रशाला (मुलांची), इंडस बालकामगार प्रकल्पातील महिला,  नर्सिंगचे विद्यार्थी, शाळेचे विद्यार्थी, डॉक्टर्स, पोलीस दलाचे जवान, एसआरपीएफचे जवान, यांच्यासह रोटरी क्लब, लायन्स क्लबचे पदाधिकारी, सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शहरातील नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला. 









Sunday, 28 October 2018

रस्त्यांची कामे अत्यंत उत्कृष्ठ करणार : अर्जुनराव खोतकर अग्रसेन चौक ते विशाल कॉर्नर रस्त्यासह वळणरस्त्यांच्या कामास प्रारंभ




जालना दि.28 - अग्रसेन चौक ते विशाल कॉर्नर या सिमेंटच्या रस्त्यासह शहराला आकार देणाऱ्या चहूबाजूच्या वळण रस्त्यांचे काम इतके उत्कृष्ट केले जाईल की, 25 वर्षे रस्ते खराबच होणार नाहीत, तसेच लोखंडी पुलाजवळ आणखी एक पूल आणि रामतीर्थ स्मशानभूमीजवळ नवीन पूल उभारला जाईल असे राज्यममंत्री अर्जुन खोतकर यांनी जाहिर केले.
 अग्रसेन चौक ते विशाल कॉर्नर, मंठा चौफुली ते कन्हैयानगर चौफुली आणि जालना ते सिंदखेड राजा चौक या 11 कोटी 60 लक्ष रूपये खर्चाच्या रस्त्यांचे शुभारंभ प्रसंगी राज्यमंत्री खोतकर बोलत होते. व्यासपीठावर भास्करराव अंबेकर, माजी आमदार संतोष सांबरे, उद्योजक किशोर अग्रवाल, अरूण अग्रवाल, कैलास लोया, अर्जुन गेही, भानुदास घुगे, किशोर टेकवानी, पंडिराव भुतेकर, प.स.चे सभापती पांडूरंग डोंगरे, सुखदेव बजाज, अभिमन्यू खोतकर, आत्मानंद भक्‍त, डॉ.सचदेव, सविता किवंडे,  संतोष मोहिते, दिनेश भगत, गोपाल काबलिये आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, सार्वजनिक जीवनात वावरताना एखादी महत्वाची मागणी आमच्या हातून पूर्ण झाली तर तो आमच्यासाठी आनंदाचा क्षण असतो. अग्रसेन चौक ते विशाल कॉर्नर (औरंगाबाद चौफुली) हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. या रस्त्याचे काम सर्वप्रथम सुरू करावे, अशी शहरातील नागरिकांसह येथील उद्योजकांची मागणी होती. आज तो दिवस उजाडला असून साडे सहा कोटी रूपये खर्चून या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण केले जाणार आहे. रामतीर्थ स्मशानभूमीसमोर आधीच्या पुलानजीक 5 कोटी रूपये खर्चून नवीन पूल केला जाणार आहे. 20 वर्षापूर्वी जालना शहराला गोलाकार वळण रस्ता माझ्याच काळात झाला आहे. असा शहराभोवती गोलाकार रस्ता औरंगाबाद, बीड वा लातूरलाही होऊ शकला नाही, या वळण रस्त्यावर तीन रेल्वेपूल उभारले आहेत. मात्र, शहरात प्रवेश करणारे रस्तेच खराब होते. ही गोष्ट खरी आहे की, प्रवासातून जालन्यात पोहोचलो, हे वाहनाच्या खडखड धडधडीतून आपोआप समजत होते, पण आता हा रस्ता अत्यंत उत्कृष्ट आणि गुळगुळीत केला जाणार आहे. संबंधित ठेकेदार अथवा अभियंत्यांना कुणी त्रास दिल्यास त्याची आपण गय करणार नाही. शहराच्या चहूबाजूचे रस्ते दर्जेदारच होतील, अशी ग्वाही खोतकर यांनी दिली.
          जालना बसस्थानकाचे काम परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या सहकार्याने आपण हाती घेतले  असून वर्षभरात बसस्थानकाचे रुप बदलून टाकू व अत्यंत आधुनिक बसस्थानक म्हणून जालन्याचा नामोल्‍लेख करावा लागेल. मी आमदार आणि अंबेकर नगराध्यक्ष असतानाच जालना ते जायकवाडी पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊ शकली. न्यायालयात व्यक्‍तीश: गेलो तेव्हाच या योजनेसाठी 50 कोटीचा पहिला हप्‍ता मिळाला होता, याची आठवण खोतकर यांनी करून दिली. संभाजी उद्यान, पोहण्याचा तलाव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह, नवीन रस्ते आणि पूल शिवसेनेच्याच काळातील आहेत. लवकरच मोती तलावात 15 कोटी रूपये खर्चून भगवान गौतम बुध्दांचा पुतळा बसविला जाणार आहे. दिवंगत पत्रकार राजेंद्र तिरूखे यांचे या रस्त्यास नाव देण्यासंबंधी नगरसेवकांना सांगितले जाईल. आमचा ‘व्हीजन’ विकासाचाच असल्याचे यावेळी खोतकर यांनी स्पष्ट केले.
           भास्करराव अंबेकर म्हणाले की, खराब रस्ते ही जालन्याची ओळख झाली आहे. जालन्याजवळ बस आली आणि ‘धडधड’ सुरू झाली की, जालना आले, हे लोक ओळखत होते. पण आता राज्यमंत्री खोतकर यांनी चहूबाजूचे रस्त्यांचे काम हाती घेतल्याने ही खराब रस्त्यांची ओळख मिटणार आहे. आपण नगराध्यक्ष असताना या शहरातील विविध विकासकामे झाली आहेत. जायकवाडीची योजना आम्ही केली नसती तर आज दुष्काळात जालन्याची स्थिती भयानक असती. राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विकासकामे झाल्याचे सांगून त्यांनी  राज्यमंत्री खोतकर कौतुक केले.
           यावेळी संतोष सांबरे, किशोर अग्रवाल यांची भाषणे झाली. शहरातील काही प्रतिष्ठीत उद्योजक, नागरिक आणि कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. संचलन आशिष रसाळ यांनी तर आभार गणेश घुगे यांनी मानले. यावेळी गोपी गोगडे, हरेश तलरेजा, योगेश रत्नपारखे, कार्यकारी अभियंता चांडक, उपअभियंता नागरे, राजू सलामपुरे, दुर्गेश कोठाठीवाले, मुरली काकड, विजय केलानी, काकडे पाटील, शेळके, भारत कौसुंदल आदी उपस्थित होते.
            खोतकर म्हणाले की, शहरातील अवाजवी मालमत्ता करासंबंधी जिल्हाधिकारी यांना बैठक लावण्यास आली सांगितले आहे, जालना शहरात  दि.19 ते 23 डिसेंबर दरम्यान त महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार असल्याचेही राज्यमंत्री खोतकर यांनी सांगितले.


Friday, 26 October 2018

पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समितीची बैठक संपन्न



            जालना, दि. 26 – जिल्हा दक्षता समितीची बैठक राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली.
            यावेळी बदनापूरचे आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, अपर जिल्हाधिकारी पी.बी.खपले, जिल्‍हा उपनिबंधक एन.व्ही.आघाव, दक्षता समिती सदस्यांन श्रीमती कमल जवाहरलाल तुल्‍ले, श्रीमती जिजाबाई अकाजी जाधव,कचरु रगडे, गोविंद पंडीत, बी.डी. पवार, शिवाजी खंदारे, रामराव लावणीकर आदींची उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, जालना जिल्ह्यात ई-पॉस मशिनच्या माध्यमातुन धान्य वाटप करण्यात येत असल्यामुळे या धान्यात होणाऱ्या काळाबाजाराला आळा बसला आहे.  गोदामातून धान्य उचलत असताना वजनामध्ये तफावत असल्याच्या तक्रारी येत असुन स्वस्तधान्य दुकानदारांनी धान्य घेताना ते मोजुन घेण्याचे आवाहन करत प्रत्येक शासकीय गोदामाच्या परिसरात सी.सी.टी.व्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावेत.  तसेच पाच वर्षे एकाच गोदामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तातडीने बदल्या करण्याचे निर्देश देत अंगणवाड्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराची जिल्ह्यातील सर्कलनिहाय तपासणी करण्याबरोबरच नवीन कार्डधारकांना वाटप करण्यात येत असलेल्या धान्य वाटवाचा तालुकानिहाय अहवाल मागविण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केल्या.
            यावेळी आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांच्यासह उपस्थित अशासकीय सदस्यांनी धान्य वितरणाबाबत असलेल्या तक्रारी तसेच वितरणामध्ये सुलभता येण्यासाठी उपयुक्त अशा सुचना मांडल्या.
*******






जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठी पिण्यासाठी आरक्षित करा उपलब्ध पाणी काळजीपूर्वक व जपुन वापरा - पालकमंत्री बबनराव लोणीकर



            जालना, दि. 26 -  जिल्ह्यातील ज्या प्रकल्पामध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे, अशा ठिकाणचा पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्याचे निर्देश राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलाशयातील पाणीसाठा आरक्षित करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.
            यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, अपर जिल्हाधिकारी प्रकाश खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, जिल्ह्यात पाऊस नसल्याने प्रकल्पातील पाण्याची पातळी अत्यंत खोल गेली आहे.  अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा वापर काळजीपूर्वक व जपुन करणेचे गरजेचे असुन ज्या प्रकल्पामध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे अशा ठिकाणचा पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात यावा. त्याचबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण होणार आहे.  लोअरदुधना सारख्या प्रकल्पात पाणी उपलब्ध असुन अशा ठिकाणी चारानिर्मितीसाठी पाणी उपलब्ध करुन देण्याचा शासनाने निर्णय घेतला असुन शेतकऱ्यांना चारा निर्मितीसाठी बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. परजिल्ह्यातुन चारा उपलब्ध करुन घेऊन त्यावर खर्च करण्यापेक्षा जिल्ह्यातच उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याच्या ठिकाणी चाऱ्याची निर्मिती केल्यास जनावरांच्या चाराचा प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत होणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            जिल्ह्यातील काही प्रकल्पामध्येच पाणीसाठा उपलब्ध आहे.  उपलब्ध असलेले पाणी काळजीपूर्वक व जपुन वापरण्यासाठी सर्व नगरपालिकांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित करुन जनमानसामध्ये पाण्याचा वापर काटकसरीने व काळजीपूर्वक करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
            मराठवाड्यातील जनतेला शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यासाठी  वॉटरग्रीड योजना साकारण्यात येत आहे.  या योजनेचा डीपीआर बनवण्याचे काम इस्त्राईल देशातील कंपनीला देण्यात आले असुन या कंपनीने त्यांचा डीपीआर सादर केला आहे.  लवकरच या योजनेच्या निविदांची प्रक्रिया पुर्ण होणार असल्याची माहितीही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिली.
            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री जोशी यांनी जिल्ह्यातील प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याची माहिती मंत्री महोदयांना दिली.
*******


जलमित्र पुरस्कारांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण जलयुक्त शिवार अभियानात समाजातील प्रत्येकाने हिरिरीने सहभाग नोंदवावा - पालकमंत्री बबनराव लोणीकर



            जालना, दि. 26 –  गत चार वर्षापासून जिल्ह्यात शाश्वत पाणी साठे निर्मितीवर भर देऊन जलयुक्त शिवार अभियानाची दर्जेदार अशी कामे करण्यात आली असुन येणाऱ्या काळातही जलयुक्त शिवार अभियानात समाजातील सर्व संस्था, पदाधिकारी, अधिकारी व नागरिकांनी हिरिरीने सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
            जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन 2015-16 या वर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या गाव, तालुका, पत्रकार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना जलमित्र पुरस्कार पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात देण्यात आला.  त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.
            व्यासपीठावर आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, महाजन ट्रस्टच्या नुतन देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, भगवान म्हात्रे, निवृत्ती डाके पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय माईनकर आदींची उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, गेल्या चार वर्षात जिल्ह्यात 400 कोटी रुपये खर्चून जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातुन जलसंधारणाची दर्जेदार अशी कामे करण्यात आली आहेत. या कामात शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबरच सेवाभावी संस्था, नागरिक, माध्यमे यांचाही मोठा वाटा राहिला आहे.  जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातुन करण्यात आलेल्या कामामुळे 43 हजार 662 टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला असल्याचे सांगत या अभियानात ज्यांनी उत्कृष्ट कार्य केले अशांचा सत्कार करण्यात आला असुन त्यांची प्रेरणा घेऊन या कामात अधिकाधिक सहभाग वाढावा हे काम अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे हा यामागचा उद्देश असल्याचे सांगत सर्व सत्कारमुर्तींचे अभिनंदन करत माध्यमांनी या योजनेस चांगल्याप्रकारे प्रसिद्धी दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केले.
            राज्यात शंभर दिवस पडणाऱ्या पावसाचे प्रमाण शंभर तासावर आले असुन या परिस्थितीला निसर्गाला दोष देऊन चालणार नाही तर यासाठी आपणच कारणीभूत आहोत.             वाढते प्रदुषण तसेच वृक्षांची होणारी कत्तल या परिस्थितीला कारणीभूत आहे.  पाऊस पाडण्यासाठी कारणीभुत असलेल्या 51 प्रजातींची झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत असुन शासनाने वृक्ष लागवडीवर भर दिला असुन जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातुन मोफत रोपांचा पुरवठा करण्यात आला असुन ही वृक्षे जगवण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            काकडासारख्या डोंगराळ भाग असलेल्या गावात अधिकाऱ्यांच्या पुढाकारातून पाणी साठवण्याचे मोठे काम करण्यात आले असल्याचे सांगत या गावात असलेल्या दगडांच्या खदानीमध्ये डोंगराचे पाणी वळवुन पाण्याचा संचय करण्यात आला.  या गावात आजही पाणी साठलेले असल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या नाविन्यपुर्ण कल्पना राबविण्याची गरज असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी शासनाने 275 कोटी 37 एवढा निधी मंजूर केला असुन त्यापैकी 186 कोटी एवढा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता.  आणखीन 90 कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असुन तो लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            आमदार नारायण कुचे म्हणाले की, शाश्वत पाणीसाठे निर्मितीसाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यात आले असुन येणाऱ्या काळातही या अभियानाचे काम अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
            जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर म्हणाले की, जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाची कामे सर्व गावातून करण्यात यावीत.  तसेच जिल्ह्यातील दुष्काळसदृष्य परिस्थतीचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या बरोबरीने काम करण्यासाठी सज्ज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियान हा शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.  सर्व विभागांनी एकत्रितपणे येऊन या अभियानाच्या माध्यमातुन दर्जेदार अशी कामे केली आहेत.  अभियानाच्या सुरुवातीच्या काळात या योजनेस पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला नाही परंतू या अभियानात कामे झाल्यानंतर व त्याचे दृष्य परिणाम ज्या वेळेस दिसु लागली त्या वेळेस प्रत्येक गावाला याचे महत्व पटुन आपल्या गावात जलयुक्तची कामे करण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतला.  गतवर्षीप्रमाणेच यावर्षीसुद्धा जलयुक्त शिवार अभियानाची कामे चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगत माध्यमांनी या अभियानास चांगली प्रसिद्धी दिल्याबद्दल त्यांचे आभारही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले.
तालुका, गावे,पत्रकार व अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुरस्कार
            जलयुक्त शिवार अभियानामध्ये सन 2015-16 मध्ये जालना तालुक्यास प्रथम क्रमांकाचे पाच लक्ष रुपयांचे बक्षिस देण्यात आले. मंठा तालुक्यातील किनखेडा हे गाव प्रथम आले. द्वितीय पुरस्कार जालना तालुक्यातील सामनगावला जाहीर करण्यात आला तर तृतीय पुरस्कार अंबड तालुक्यातील दुनगावाला देण्यात आला. चौथ्या क्रमांकाचे बक्षिस बदनापुर तालुक्यातील म्हात्रेवाडीस तर पाचव्या क्रमांकाचे बक्षिस घनसावंगी तालुक्यातील गुरुपिंप्रीस देण्यात आले.
            जलयुक्त शिवार अभियानामध्ये उत्कृष्ट लिखाण करणाऱ्या विभाग व जिल्हास्तरावरील पहिला क्रमांकाचा पुरस्कार बाबासाहेब शेषराव डोंगरे यांना देण्यात आला तर द्वितीय पुरस्कार दिव्य मराठीचे शहर प्रतिनिधी बाबासाहेब लाला डोंगरे यांना तर तृतीय क्रमांकाचा पुरस्कार दै. आनंदनगरीचे विशेष प्रतिनिधी सतीष पाटेकर यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  जलयुक्त शिवार अभियानात उत्‍कृष्ट काम केल्याबद्दल मंठा येथील कृषि सहाय्यक आर.आर. आघाव यांना पुरस्कार देण्यात आला. जलसंधारण अधिकारी श्री डोणगावकर यांनी या अभियानात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कारही यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय माईनकर यांनी केले.
            कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, पत्रकार यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
-*-*-*-*-*-


Monday, 22 October 2018

परतूर येथील पीक परिस्थितीची पालकमंत्र्यांकडून पहाणी



 जालना, दि. 22 –  राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी परतूर तालुक्यातील  येनोरा येथील शेतकरी बालासाहेब खामकर यांच्या शेतीस भेट देऊन त्यांच्या शेतातील तूर व कापूस पीकाची पहाणी करुन त्यांच्यासोबत संवाद साधत पाऊस नसल्यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 





जिल्ह्यातील वाडी,वस्ती, तांडे व गावांमध्ये पक्क्या व मजबुत रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यावर भर टंचाईसदृष्य परिस्थितीमध्ये शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे पालकमंत्री बबनराव लोणीकर



  जालना, दि. 22 –  देशाच्या विकासामध्ये रस्त्याची फार मोठी मोलाची भूमिका असुन दळणवळण अधिक सुलभ व जलदगतीने होण्यासाठी जिल्ह्यातील वाडी,वस्ती, तांडे व गावांमध्ये पक्क्या व मजबुत रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात अनेक दिवसापासून पावसाचा खंड असल्याने जिल्ह्यातील पीक परिस्थितीची पहाणी करण्यात येत असुन टंचाईसदृष्य परिस्थितीमध्ये शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
            मौजे पाटोदा ता. परतूर येथे दैठणा-येणोरा-पाटोदा रस्त्याच्या कामाचे भूमिपुजन तसेच पाटोदा येथील स्मशानभूमीच्या कामाचे भुमिपुजन पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले . त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहूल लोणीकर, प्रभाकर कुलकर्णी, रामेश्वर तनपुरे बद्रीभाऊ ढवळे, तुळशीराम खवल, ह.भ.प. वाघ महाराज, अंकुशराव नवल, गणेशराव खवले, रमेशवराव आढाव, नितीन जोगदंड, शिवाजी पाईकराव, संपत टकले, उप विभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसिलदार श्री कदम आदींची उपस्थिती होती. 
पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, या भागात मजबुत व पक्का रस्ता व्हावा ही गावकऱ्यांची अनेक वर्षापासूनची मागणी होती.  गावकऱ्यांना दिलेल्या शब्दाची वचनपुर्ती आज या निमित्ताने होत असुन दैठणा-येणोरा-पाटोदा या रस्त्याच्या कामासाठी 2 कोटी 52 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असुन या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी सोय होणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात पावसाचा अनेक दिवसापासून खंड असल्याने शेतीअर्थव्यवस्था तोट्यात आली आहे. पाऊस नसल्याने जिल्ह्यातील टंचाईसदृष्य परिस्थितीची पहाणी करुन अहवाल सादर करण्यात येणार आहे.  जिल्ह्यातील आठही तालुक्यातील पीक परिस्थितीची आपण पहाणी केली असुन अनेक दिवसापासून पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे. या परिस्थितीचा खंबीरपणे मुकाबला करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनामार्फत नियोजन करण्यात येत आहे. गावपातळीवर काम करणारे तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहाय्यक यांचा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यामध्ये मोठा वाटा असतो.  पीकविमा असो वा दुष्काळी परिस्थिती अशा परिस्थितीत झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवुन देण्यासाठी प्रत्येक गावात तसेच मंडळामध्ये पीककापणी प्रयोग करण्यात येतात.  पीककापणी प्रयोग करुन त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करुन शासनाकडे पाठविण्यात येतो. त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ठरविण्यात येते. त्यामुळे गावपातळीवर काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पीककापणी प्रयोग वस्तुनिष्ठ व शासनाच्या निकषानुसार करुन शेतकऱ्यांना न्याय मिळेल तसेच त्यांना अधिकाधिक भरपाई कशा पद्धतीने देता येईल, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश देत पूर्वी पन्नास टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाल्यास भरपाई देण्यात येत होती परंतू केंद्र शासनाने यामध्ये बदल करुन 33 टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.   पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले की, ज्या ठिकाणी पाण्याचे स्त्रोत उपलब्ध आहेत अशी ठिकाणचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याबरोबरच ज्या गावात पाण्याचे साठे उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी मागेल त्याला टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचे नियेाजनाबरोबरच मजुरांचा हाताला काम नसल्याने त्यांचे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी मागेल त्याला काम उपलब्ध करुन देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना कामे उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 
            176 गावांना वॉटरग्रीडच्या माध्यमातून शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 234 कोटी रुपयांची योजना साकारली जात आहे.  त्याचबरोबरच मतदासंघातील 92 नवीन गावांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला असुन यासाठी 125 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. येत्या वर्षभराच्या कालावधीत ही योजना पूर्ण करुन जालना, परतूर व मंठा तालुक्यातील गावांना शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री.लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातुन जलसंधारणाची विविध दर्जेदार अशी कामे करण्यात आली आहेत.  परंतू पाऊसच नसल्याने अभियानाच्या माध्यमातुन झालेल्या कामात हव्या त्या प्रमाणात पाण्याचा संचय झाला नसल्याचे सांगत येणाऱ्या काळात जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यास निश्चितच मोठ्या प्रमाणात पाण्याचा संचय होईल, असा विश्वासही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी व्यक्त केला. 
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांचीही मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्यकारी अभियंता श्री सोनलकर यांनी रस्त्याच्या कामांविषयी माहिती दिली. 
कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******