Sunday, 14 May 2017

शासनाच्या महत्वाकांक्षी विकास योजनांची कामे मिशन मोडवर राबवा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



जालना, दि. 13 –   राज्य शासनाचा महत्वाकांक्षी व शाश्वत पाण्यासाठी राबविण्यात येत असलेले जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, प्रधानमंत्री आवास योजना या विकास योजनांची कामे जलदगतीने होण्यासाठी या योजना मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
          जाफ्राबाद येथील तहसिल कार्यालयात जालना जिल्ह्याच्या विविध विकास कामांचा मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांकडून घेतला.
          याप्रसंगी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, खासदार रावसाहेब दानवे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविण परदेशी, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश टोपे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे आदींची उपस्थिती होती.
          मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, जिल्हयात राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानामधील कामांचे पावसाळयापूर्वी नियोजन करण्यात यावे.  तसेच गतवर्षात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत प्रलंबित असलेली कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत.   येत्या 2 ऑक्टोबर, 2017 पर्यंत महाराष्ट्र राज्य ओडीएफ करण्याचा संकल्प करण्यात आला असून जालना जिल्ह्यात प्रलंबित असलेल्या शौचालयांच्या उभारणीचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
          यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण व
गाळयुक्त शिवार, कृषीपंपांना वीजजोडणी, स्वच्छ महाराष्ट्र अभियान प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), पीककर्ज वाटप, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, सीडस् पार्क, ड्रायपोर्ट, गटशेती आदी कामांची माहिती तालुकास्तरीय अधिकाऱ्यांकडून तालुकानिहाय घेऊन अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी पॉवर पाँईटच्या माध्यमातुन जिल्ह्यातील विविध योजनांची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.  
गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद
          जाफ्राबाद तालुक्यात गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी बैठकीनंतर संवाद साधला.  यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की,  गटशेतीचा अंतर्भाव या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आला असुन शेतकऱ्यांच्या अनुभवाच्या आधारावर व शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करुन शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहे.  जाफ्राबाद तालुक्यातील गटशेती करणारे शेतकरी  गटशेतीचे ब्रँड ॲम्बेसेडर व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करत या शेतकऱ्यांच्या अनुभवाचा फायदा जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनाही व्हावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या.
          गटशेती प्रमुख लक्ष्मण सवडे यांनी गटशेतीअंतर्गत करण्यात आलेल्या कामांची माहिती मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्यासमोर सादर केली.         या बैठकीस जिल्ह्यातील सर्व उप विभागीय, अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
***-***


Sunday, 30 April 2017

जालना जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे मराठवाड्यातील जनतेला एकाच योजनेतून शुद्ध पाण्याचा पुरवठा करणार- पालकमंत्री बबनराव लोणीकर

जालना, दि. 1 –  महात्मा गांधी, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आयुष्यभर आपल्या प्रबोधनाद्वारे स्वच्छतेचा संदेश गावोगावी दिला आहे. भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी  यांनीही संपूर्ण भारत स्वच्छ करण्याचे स्वप्न उराशी बाळगले असून महाराष्ट्र राज्य हागणदारी मुक्त करण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असुन येणाऱ्या काळात संपूर्ण राज्यासह जालना जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या दारी शौचालयाची उभारणी करुन त्याचा नियमित वापर करण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
            महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले.  त्याप्रसंगी उपस्थितांना शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते.
            यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीष टोपे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, माजी आमदार अरविंद चव्हाण,  जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ. एन.आर. शेळके, उप विभागीय अधिकारी केशव नेटके,घनश्याम गोयल, सतीष अग्रवाल, सुरेंद्र पित्ती, विरेंद्र धोका, श्रीमती आशा दानवे, एकबाल पाशा, भुजंगराव गोरे आदींची उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की,  राज्यातील ११ जिल्हे १४८ तालुके व १६३६० ग्राम पंचायती हागणदारी मुक्त झाले आहेत. मराठवाड्यात सर्वप्रथम परतूर व जाफ्राबाद हे दोन तालुके हागणदारी मुक्त झाले असुन मंठा तालुका हागणदारीमुक्तीच्या वाटेवर आहे. येणाऱ्या काळात जालना जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.   
            जालना जिल्ह्याचा विकास अधिकगतीने करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असुन मराठवाड्यासह जिल्ह्यातील जवळपास 40 हजार लोकांना रोजगार देऊ शकणाऱ्या आणि सुमारे 6 हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करण्याची क्षमता असलेल्या 109 कोटी रुपये गुंतवणुकीचा सीडपार्क जालना परिसरात करण्यास अलिकडेच मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे.  या सीडपार्कमुळे बियाणे उद्योगासमोरील अडचणी दूर करण्याबरोबरच पायाभुत सुविधांचा विकास करुन बियाणे उत्पादन क्षेत्रात पोषक वातावरण निर्मितीद्वारे रोजगार आणि गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचे सांगत मराठवाड्यासह राज्यातील विद्यार्थ्यांना रसायन तंत्रज्ञानाबाबत शिक्षण घेता यावे यासाठी जिल्ह्यातील सिरसवाडी येथील गट नं. 132 मधील 200 एकरवर शासनाच्या अधिपत्याखाली अभिमत विद्यापीठाचा दर्जा असणाऱ्या रसायन तंत्रज्ञान महाविद्यालय उभारण्यासही मंत्री मंडळाने मान्यता दिली असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
जालना, परतूर व मंठा तालुक्यातील 176 गावांना ग्रीडद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी 234 कोटी रुपयांचा निधीतून योजना साकारण्यात येत आहे. योजनेचे काम जलदगतीने करण्यात येत असुन येत्या दोन वर्षात ही योजना पूर्ण होऊन नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असुन संपूर्ण मराठवाड्याला वॉटरग्रीडने पाणी पुरवठा करण्याबरोबरच शेतीला व उद्योगालाही पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव मंत्री मंडळासमोर मांडण्यात आला होता. या योजनेचा डीपीआर (डिटेल प्रोजेक्टर रिपोर्ट) सादर करण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असुन येणाऱ्या काळात या योजनेच्या माध्यमातुन मराठवाड्याला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  
            सन 2016-17 या वर्षात प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये उत्कृष्ट काम करुन जालना जिल्ह्याने संपूर्ण देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. नुकत्याच झालेल्या नागरी सेवा दिनी  नवी दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांचा सन्मान करण्यात आला.  जिल्ह्यासाठी ही भुषणावह बाब असुन जिल्हाधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो. येणाऱ्या काळात जालना जिल्हा प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर रहावा यासाठी प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समन्वयाने व एकदिलाने काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
            देशाच्या स्वातंत्र्यानंतर आजही अनेक कुटूंबांना स्वत:च्या हक्काचे घर नाही.  देशातील प्रत्येक नागरिकाला स्वत:च घर मिळावं या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातुन 2022 पर्यंत प्रत्येकाला घर उपलब्ध करुन देण्याचा संकल्प केला आहे.  जालना शहरात या योजनेंतर्गत 364 सदनिकांची म्हाडामार्फत उभारणी करण्यात येत आहे.  दुर्बल घटकातील व अल्पउत्पन्न असणाऱ्यांना या ठिकाणी सर्वसोईंनीयुक्त असे घरे देण्यात येणार असुन या ठिकाणी रस्ते, वीज, पाणी, मलनिस्सारण व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.   या घरासाठी केंद्र शासन 1 लाख 50 हजार, राज्य शासन एक लाख असे एकूण 2 लाख 50 हजारांची सबसिडी देण्यात येणार आहे.  तसेच उर्वरित रक्कम बँकेमार्फत कर्ज स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.  येणाऱ्या काळात जिल्ह्यातील दुर्बल व अल्पउत्पन्न असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या हक्काचे घर मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणारअसल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            सातत्याने निर्माण होणाऱ्या टंचाई परिस्थितीवर मात करुन शाश्वत पाणीसाठे निर्माण करण्यासाठी गेल्या दोन वर्षापासुन राज्यात जलयुक्त शिवार अभियान यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे.  जालना जिल्ह्यात सन 2015-16 मध्ये 212 तर 2016-17 या वर्षामध्ये 186 गावांची निवड करण्यात येऊन जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली आहेत.  जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांमुळे जवळपास 50 हजार 17 टी.सी.एम. पाणीसाठा निर्माण झाला असुन पाणी पातळीमध्ये 2.25 मीटरने वाढ झालेली आहे. येणाऱ्या काळात जिल्ह्यातील सर्वच गावामधुन हे अभियान यशस्वीरित्या राबवुन जालना जिल्हा टंचाईमुक्त करण्याचा मानस असुन या कामांमध्ये नागरिकांनी अधिकाधिक सहभाग नोंदवावा. तसेच पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातुन जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच शाश्वत सिचंनाची सुविधा निर्माण करण्यासाठी राज्यात मागेल त्याला शेततळे ही योजना राबविण्यात येत आहे.  जालना जिल्ह्यात गतवर्षात या योजनेच्या माध्यमातुन  9 हजार 602 शेतकऱ्यांना शेततळे मंजुर करण्यात आले असुन 2 हजार 729 शेततळयांचे काम पूर्ण करण्यात आले असुन उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            श्यामाप्रसाद रुरबन योजनेमध्ये परतूर तालुक्यातील आष्टीसह 15 गावांचा समावेश करण्यात आला असुन 170 कोटी रुपयांच्या या योजनेमधून या गावात पालिकाक्षेत्राप्रमाणे नागरी सुविधा देऊन विकास करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी व कृषी अधिकाऱ्यांचा सत्कार
            सन 2016-17 या वर्षात जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नातून खरीपात 4 लाख 69 हजार आणि रब्बी मध्ये 1 लाख 27 हजार शेतक-यांनी 39 कोटी रुपयांचा विमाहप्ता भरुन पिकविमा योजनेत भाग घेत जालना जिल्हा देशात प्रथम आल्याबद्दल जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जालना येथील पोलीस अधीक्षक श्रीमती ज्योतिप्रिया सिंह यांची बदली पुणे येथे झाली असुन त्यांनी जालना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था यशस्वीपणे अबाधित राखल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांचाही सत्कार करण्यात आला. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत मंठा व बदनापूर तालुके 100 टक्के ओडीएफ केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांचाही मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी, स्मार्ट ग्रामअंतर्गत गावचे सरपंच तसेच औद्योगिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सुक्ष्म व लघु उद्योजकांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
            कार्यक्रमाचे संचलन निशिकांत मिरकले यांनी केले.  कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, पत्रकार,विद्यार्थी, विद्यार्थीनीची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.         
*******
जिल्हाधिकारी कार्यालयात
जिल्हाधिकारी श्री जोंधळे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
            जालना,दि.1- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ. एन.आर. शेळके, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजेश जोशी, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर, जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर, उप‍ विभागीय अधिकारी केशव नेटके, जिल्हा कोषागार अधिकारी  श्री पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी रवींद्र जगताप, तहसिलदार श्रीमती अनिता भालेराव  यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

*******


Friday, 21 April 2017

प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये देशात जालना जिल्हा प्रथम पंतप्रधानांच्या हस्ते जिल्हाधिकारी श्री जोंधळे यांनी स्वीकारला पुरस्कार

जालना -  सन 2016-17 या वर्षात प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये उत्कृष्ट काम करुन जालना जिल्ह्याने संपूर्ण देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. नागरी सेवा दिनानिमित्त नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे पारितोषिक स्वीकारले.
          दिल्लीमध्ये झालेल्या या भव्यदिव्य अशा कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण पहाण्याची व्यवस्था जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये करण्यात आली होती. दूरदर्शनवरील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पहाण्यासाठी जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांची उपस्थिती होती.  
          प्रधानमंत्री फसलबीमा योजना मे अव्वल आने का मान महाराष्ट्र के जालना जिले को मिलता है. जालना जिले के जिलाधिकारी शिवाजी जोंधळे से गुजारिश करते है की वे आकर प्रधानमंत्रीजी के करकमलो से पुरस्कार का स्वीकार करे अशी घोषणा निवेदकाने करताच जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असलेल्या शेतकरी, अधिकारी, कर्मचारी व पत्रकार यांनी टाळयांच्या कडकडाटाने आनंद व्यक्त केला.  मुंबई दुरदर्शनच्यावतीने निर्माता मारुती मोगले व तंत्रज्ञ श्री मुपोनादी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असलेल्या सर्वांचा उत्साह कार्यक्रमस्थळातील मान्यवरांपर्यंत ओबी व्हॅनच्या माध्यमातून पोहोचविला.

*******

Thursday, 20 April 2017

प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये देशात जालना जिल्हा प्रथम नागरी सेवादिनी पंतप्रधानांच्या हस्ते दिल्ली येथे जिल्हाधिकारी स्वीकारणार पुरस्कार

जालना  -  सन 2016-17 या वर्षात प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये उत्कृष्ट काम करुन जालना जिल्ह्याने संपूर्ण देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावला असुन शुक्रवार दि. 21 एप्रिल, 2017 रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या नागरी सेवादिनाच्या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे हे यावेळी पारितोषिक स्वीकारणार आहेत.
          राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्राद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर तसेच खासदार रावसाहेब दानवे यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात उत्तमरित्या व्हावी व शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच जिल्हा प्रशासनाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट काम केल्यामुळे संपूर्ण देशातुन जिल्हाला हा प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
          जिल्हयात 2015-16 या वर्षी खरीपात एकूण रु. 25 कोटी विमा हप्ता भरुन पिक विमा घेतलेल्या जिल्हयातील जवळपास 95 टक्के शेतक-यांना  रु. 431 कोटी 64 लाख रुपये  आणि रब्बी मध्ये एकुण  2 कोटी विमा हप्ता भरून पिक विमा घेतलेल्या शेतक-यांना                   44 कोटी 29 लाख रुपये कोटी इतकी नुकसान भरपाई मिळाली. सन 2016-17 मध्ये जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नातुन खरीपात 4 लाख 69 हजार आणि रब्बी मध्ये 1 लाख 27 हजार शेतक-यांनी 39 कोटी रुपयांचा विमाहप्ता भरुन पिकविमा योजनेत भाग घेतल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दशरथ तांभाळे यांनी सांगितले.  
          जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, यांच्यासह तालुक्यातील सर्व कृषि अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी,कर्मचारी,सर्व तहसिलदार, तलाठी ग्रामसेवक यांच्या संयुक्त प्रयत्नातून व माहिती व जनसंपर्क विभाग व सर्व प्रसिद्धी माध्यमांनी दिलेल्या योगदानामुळे हे शक्य झाले, असल्याची भावना जिल्हाधिकारी श्री जोंधळे यांनी व्यक्त केली.
          भारत सरकारमार्फत केंद्र पुरस्कृत काही महत्वपूर्ण योजनांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हयांना प्रधानमंत्री उत्कृष्ट नागरी सेवा पुरस्कार दिला जातो.  त्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा समावेश आहे.  या योजनेतून पुरस्कार मिळण्यासाठी देशातील सर्व जिल्ह्यांनी अर्ज केले होते.  याची प्राथमिक छाननी होऊन बारा जिल्ह्यांना सादरीकरणासाठी दिल्ली येथे बोलावण्यात आले होते.  याचे सादरीकरण जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दशरथ तांभाळे यांनी दि. 14 फेब्रुवारी, 2017 रोजी दिल्ली येथे केले. तदनंतर दुसऱ्या छानणीत चार जिल्ह्यांना पुन्हा दिल्लीत सादरीकरणासाठी बोलावण्यात आले.  दि.  9 मार्च, 2017 रोजी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दशरथ तांभाळे यांनी दिल्ली येथे सादरीकरण केले होते.
          या पुरस्कार सोहळयाचे थेट प्रक्षेपण दि. 21 एप्रिल, 2017 रोजी सकाळी 11-00 वाजता दुरदर्शनच्या डी.डी वाहिनीवरुन करण्यात येणार आहे.  या सोहळया दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जालना जिल्ह्यातील काही निवडक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.  या कार्यक्रमाचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक जनतेने घ्यावा, असे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

*******

Saturday, 11 March 2017

“महाराष्ट्र माझा” छायाचित्र प्रदर्शनास पालकमंत्री बबनराव लोणीकर यांची भेट माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा स्तुत्य उपक्रम

जालना, दि. 11 –डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, जालना येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र माझा छायाचित्र प्रदर्शनास राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी आज दि. 11 मार्च रोजी भेट देऊन प्रदर्शनाची पहाणी करत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम स्तुत्य असून संपूर्ण राज्यभर अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी केली.  
      याप्रसंगी माजी आमदार अरविंद चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर, राज्य महिला आयोगाचे जिल्हा समन्वयक  ॲङ पी.जे. गवारे, विरेंद्र धोका, ज्येष्ठ छायचित्रकार बाबुराव व्यवहारे, प्रा. रेणुका भावसार, ज्ञानज्योती प्राथमिक विद्यालयाचे श्री हनवते आदींची प्रमुख उपस्थिती होती.
      यावेळी पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, सर्वसामान्य व्यक्तींचा सर्वांगिण विकास करण्यासाठी राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. जलयुक्त शिवार, मेक इन इंडिया, स्वच्छता अभियान, विद्युत विकास, रस्ते विकास, कृषिविकास, कौशल्यविकास यासारख्या योजनांबरोबरच शेतकऱ्यांच्या शेतीला, वीज, पाणी, शेतमालाला भाव देण्यासाठी अनेकविध उपक्रम शासन राबवित आहे. शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मिडिया माध्यमातून तर तरुणाईला ही माहिती सोशल मिडिया माध्यमातून देण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अत्यंत उत्कृष्टपणे कार्य करत असल्याचे गौरदवोदगार त्यांनी यावेळी काढले.
     जालना जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत जिल्ह्यात ड्रायपोर्ट, सीडस् पार्क, रसायन तंत्र महाविद्यालयासारखे विकासात्मक प्रकल्प आणण्यात आले असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळण्याबरोबरच विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची सोय निर्माण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            प्राचीन भारतीय कला- संस्कृती, इतिहासाचा वारसा, लोकपरंपरा, धार्मिक, सांस्कृतिक, पर्यटन, वन्यजीव तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांवर आधारित अशा वैविध्यपूर्ण छायाचित्रे असलेल्या प्रदर्शनाचा लाभ जिल्ह्यातील जनतेने घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री                  श्री लोणीकर यांनी यावेळी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने "महाराष्ट्र माझा" ही राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील निवडक छायाचित्रे जालना जिल्ह्यातील नागरिकांना बघता यावीत या उद्देशाने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, सामाजिक न्याय विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथील हॉलमध्ये हे प्रदर्शन सुरु असून                 दि. 15 मार्चपर्यंत हे प्रदर्शन सर्वांना मोफत पाहता येणार असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी                 श्री बावस्कर यांनी यावेळी सांगितले.
 यावेळी शासनाच्या विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनी, नर्सिग कॉलेजच्या विद्यार्थीनी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*******


Monday, 6 March 2017

नामांकित छायाचित्रकारांचे "महाराष्ट्र माझा" प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

जालना -  प्राचीन भारतीय कला- संस्कृती, इतिहासाचा वारसा, लोकपरंपरा, धार्मिक, सांस्कृतिक, पर्यटन, वन्यजीव तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांवर आधारित अशा वैविध्यपूर्ण छायाचित्रे असलेल्या प्रदर्शनाचे आयोजन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, सामाजिक न्याय विभाग, जालना येथे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
            यावेळी जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर, ज्येष्ठ छायाचित्रकार बाबुराव व्यवहारे, लक्ष्मण राऊत, तालुका विधी न्या विभागाचे समन्वये ॲड पी.जे. गवारे, सामाजिक कार्यकर्ते हेमंत ठक्कर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
            यावेळी जिल्हाधिकारी श्री जोंधळे म्हणाले की,  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, जालना यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र माझा छायाचित्र प्रदर्शनात कला, संस्कृती, इतिहास वारसा यासह शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा समावेश असलेल्या विषयावरील अप्रतिम अशा छायाचित्रांचा समावेश करण्यात आला असून या प्रदर्शनाचा लाभ शालेय,महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनींसह सर्व नागरिकांनी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. 
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने "महाराष्ट्र माझा" ही राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील निवडक छायाचित्रे जालना जिल्ह्यातील नागरिकांना बघता यावीत या उद्देशाने येथील डॉ. बाबसाहेब आंबेडकर भवन, सामाजिक न्याय विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथील हॉलमध्ये हे प्रदर्शन आज दि. 6 मार्च, 2017 पासून भरविण्यात आले असून 15 मार्चपर्यंत हे प्रदर्शन सर्वांना मोफत पाहता येणार असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी श्री बावस्कर यांनी यावेळी सांगितले.
 या उदघाटन समारंभास पत्रकार अंकुश गायकवाड, अभयकुमार यादव, नारायण माने, अतुल व्यवहारे, अनिल व्यवहारे, साबेर खान, जावेद तांबोळी, किरण खानापुरे, सुनिल खरात, शासनाच्या विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*******







Friday, 3 March 2017

श्यामा प्रसाद मुखर्जी रुरबन योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या 16 गावांच्या विकास कामांचा डीपीआर तातडीने सादर करा– पालकमंत्री बबनराव लोणीकर

जालना –   केंद्र शासनाच्या श्यामा प्रसाद मुखर्जी रुरबन योजनेमध्ये परतूर तालुक्यातील 16 गावांचा समावेश करण्यात आला असून या गावांमध्ये विविध विकास कामे करण्यासाठी डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) तातडीने सादर करण्याचे निर्देश राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा‍ जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.
श्यामा प्रसाद मुखर्जी रुरबन योजनेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संबंधित यंत्रणांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.
या बैठकीस जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, ग्रामविकास विभागाचे उपसचिव श्री भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, परतूर तालुक्यातील आष्टीसह अकोली, आनंदगाव, ब्राम्हणवाडी, सुरुमगाव, ढोकमाळ तांडा, फुलेवाडी, पळसी, हास्तुरतांडा, लिखित पिंप्री, लोणी खुर्द, कनकवाडी, परतवाडी रायगव्हाण, सातारा वाहेगाव व वाहेगाव सातारा या गावांचा श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे.  या योजनेंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील विकासाचा असमतोल दूर करणे असून निवड झालेल्या गावांमध्ये आर्थिक व तांत्रिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे अपेक्षित आहे.  त्यानुसार सर्व संबंधित यंत्रणांनी या गावांचा विकास करण्यासाठी जबाबदारीने व समन्वयाने कामे करावीत.  या कामात हगगय अथवा दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही पालकमंत्री       श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.          
 श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन योजनेंतर्गत निवड झालेल्या गावात विकास कामे करण्यासाठी राज्य शासनामार्फत 70 टक्के निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असून उर्वरित 30 टक्के निधी केंद्र शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.  या 16 गावांमध्ये कौशल्यविकास प्रशिक्षण, कृषी प्रक्रिया, स्टोरेज आणि गोदाम, मोबाईल आरोग्य युनिट, शाळा सुधारणा, उच्चशिक्षण सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा, घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन, गावअंतर्गत गटारे, रस्त्यावरील पथदिवे, गावअंतर्गत रस्ते जोडणी, सार्वजनिक वाहतुक, एलपीजी गॅस कनेक्शन, डिजिटल साक्षरता, नागरी सेवा केंद्रे आदी सुविधा उपलब्ध करुन द्यावयाच्या आहेत.  गावात कामे करताना ती गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होतील याची सर्व यंत्रणांनी दक्षता घेण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
            यावेळी ग्रामविकास विभागाचे सचिव श्री भालेराव यांनी योजनेचे महत्व व कशापद्धतीने ही योजना राबवावयाची आहे या संदर्भात उपस्थित अधिकाऱ्यांनासविस्तर अशी माहिती दिली. तर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी आजपर्यंत या योजनेंतर्गत झालेल्या कामांचा व केलेल्या नियोजनाचा उपस्थित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.
            या बैठकीस संबंधित विभागाचे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

*******