जालना, दि. 25(जिमाका): जालना शहरातील वाढत्या भटक्या जनावरांच्या समस्येवर
नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल यांनी मनापाच्या संबंधित
विभागांना कठोर कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि वर्दळीच्या
ठिकाणी जनावरे मोकाट फिरत असल्याने वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि नागरिकांना होणारा
त्रास वाढत चालला आहे. शहरातील रस्त्यांवर सोडल्या जाणाऱ्या भटक्या जनावरांच्या मालकांवर
कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा आयुक्त जालना शहर महानगरपालिका
आशिमा मित्तल यांनी दिले.
जिल्हाधिकारी मित्तल यांनी स्पष्ट निर्देश
देताना सांगितले की, ज्या मालकांकडून जनावरे रस्त्यावर सोडली जातात, त्यांच्यावर दंडात्मक
कारवाई करण्यात येणार असून, आवश्यक असल्यास कायदेशीर पावले देखील उचलली जातील. शहरातील
स्वच्छता, सुव्यवस्था आणि वाहतूक सुरळीत ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असून नागरिकांच्या
सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही शिथिलता सहन केली जाणार नाही, असे त्यांनी नमूद केले.
मनपा, पशुसंवर्धन विभाग व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकाद्वारे याकरीता नियमित
मोहीम राबविण्यात येणार आहे. भटक्या जनावरांना ताब्यात घेऊन शासकीय गो-शाळा येथे ठेवण्यात येईल, मालकांची ओळख पटवून नियमांनुसार
दंड वसूल करुन सदरील जनावरे त्यांच्या मुळ मालकांना हस्तातंरित करण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकारी मित्तल यांनी नागरिकांनीही
या मोहिमेकरीता पुढे येत सहकार्याची विनंती केली आहे. रस्त्यावर जनावरे सोडणे ही कायद्याने
दंडनीय कृती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वच्छ व सुरक्षित शहर आणि वाहतुकीला अडथळामुक्त ठेवण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला
सहकार्य करावे, असेही आवाहन त्यांनी केले.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment