Thursday, 6 August 2026

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

 

जालना,दि.6 (जिमाका) : राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत संचालित शासकीय वसतिगृहांमध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, पात्र विद्यार्थ्यांनी शासनाच्या https://hmasnew.mahait.org या ऑनलाइन संकेतस्थळावर दि. 7 ऑगस्ट ते दि. 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत अर्ज करावेत, असे आवाहन सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, जालना यांनी केले आहे.

प्रवेश प्रक्रियेसाठी निश्चित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, ऑनलाइन अर्ज दाखल झाल्यानंतर दि. 1 सप्टेंबर ते दि. 7 सप्टेंबर 2026 या कालावधीत अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी गुणवत्तेनुसार पहिली निवड यादी प्रसिद्ध केली जाईल.

पहिल्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना दि. 18 सप्टेंबर 2026 पर्यंत प्रवेश निश्चित करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांसाठी गुणवत्तेनुसार दुसरी निवड यादी दि. 21 सप्टेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांनी दि. 30 सप्टेंबर 2026 पर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

ही प्रवेश प्रक्रिया बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी तसेच व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रथम वर्ष किंवा थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.

इतर मागास बहुजन कल्याण विभागाने पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत ऑनलाइन अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच जालना महानगरपालिका हद्दीपासून 10 किलोमीटर अंतरावरील परिसरातील महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष किंवा थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनीच वसतिगृह योजनेसाठी अर्ज करावेत असे आवाहन केले आहे.

-*-*-*-*-*-

जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक यांच्या पदनामात बदल

 


 

जालना,दि. 6 (जिमाका) : शासनाच्या परिपत्रकानुसार महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र या पदनामा ऐवजी उप आयुक्त  (उद्योग व सेवा) जिल्हा उद्योग केंद्र अशा सुधारीत पदनामाचा सर्व कार्यालयीन पत्र व्यवहार तसेच कार्यालयीन कामकाजामध्ये उल्लेख करण्याचे सुचित केले आहे. अशी माहिती सहायक आयुक्त उद्योग सेवा जिल्हा उद्योग केंद्र यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-*-

शासकीय वसतिगृहात व्यावसायीक विभागाच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


 

जालना, दि.6 (जिमाका) :  समाज कल्याण विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह जालना, भोकरदन, अंबड, बदनापुर, घनसावंगी, संत रामदास शासकीय वसतिगृह, जालना व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह, जालना, अंबड, मंठा, भोकरदन या शासकीय वसतिगृहामध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी व्यावसायीक विभागाच्या प्रवेशासाठी मोफत प्रवेश देण्यात येत आहेत. त्यामुळे गरजु व पात्र विद्यार्थ्यांनी आजच https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळाला भेट देण्यात यावी. व्यावसायीक विभागाच्या प्रवेशासाठी दि. 15 सप्टेंबर 2026 रोजी पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.

यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, अनाथ, दिव्यांग, इतर मागासवर्गीय, विशेष मागासप्रवर्गसह इतर प्रवर्गाच्या इयत्ता आठवी, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये रिक्त असणाऱ्या जागेवर विनामुल्य प्रवेश ऑनलाईन पध्दतीने गुणवत्तेनुसार देण्यात येणार आहे.

जर गुणवत्तेनुसार किंवा जागेअभावी विद्यार्थ्याला शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, तरच त्याला "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनचा अर्ज सादर करता येईल. जे विद्यार्थी वसतिगृह योजनेचा अर्ज भरणार नाहीत त्यांना "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व वसतिगृह दोन्ही योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या तालुक्यामध्ये शासकीय वसतिगृहे नाहीत अशा तालुक्यात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यासाठी सदर नियम शिथील केला आहे.

शासकीय वसतिगृहात विनामुल्य निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जिम व इंटरनेट वाय-फाय इत्यादी सुविधा विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येतात. तरी गरजु विद्यार्थ्यांनी व्यावसायीक विभागाच्या प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन डॉ. अनिता राठोड, सहायक आयुक्त, समाज कल्याण, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन 2026-27 साठी नोंदणी करण्याचे आवाहन

 


 

जालना, दि.6 (जिमाका) :  राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद (NSDC) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणाऱ्या इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन 2026-27 या देशातील सर्वात प्रतिष्ठित कौशल्य स्पर्धेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, विविध सेक्टर स्किल कान्सिल तसेच औद्योगिक आस्थापनांच्या सहकार्याने जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना राष्ट्रीय स्तरावर निवड होण्याची तसेच जागतिक स्तरावरील वर्ल्डस्किल कॉम्पिटिशन मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

            जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. ही स्पर्धा व्यावसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टतेच्या क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते. 23 वर्षांखालील युवक-युवतींना कौशल्य सादर करण्याची ही स्पर्धा ऑलिम्पिक खेळासारखीच असते, हे विविध कौशल्य क्षेत्रांमध्ये आपले ज्ञान, गुणवत्ता व प्राविण्य सिद्ध करण्यासाठी हे एक प्रभावी व्यासपीठ आहे.

            इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन 2026-27 करिता वयोमर्यादा हा एकमेव पात्रतेचा निकष असून 56 कौशल्य क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 2003 किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे. तसेच सायबर सिक्योरिटी, इंडस्ट्री 4.0, मेकॅट्रॉनिक्स आणि रोबोट सिस्टम इंटेग्रशन या टिम स्किल गटातील स्पर्धांसाठी उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 2003 किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे. तसेच ऑटोनॉमस मोबाईल रोबोटिक्स, काँक्रीट कन्स्ट्रक्शन वर्क आणि लँडस्केप गार्डनिंग या टिम स्किल गटातील स्पर्धांसाठी उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 2006 किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे.

            जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), कौशल्य प्रशिक्षण संस्था, अभियांत्रिकी महाविद्यालये, पॉलिटेक्निक, उद्योग-आस्थापना तसेच संबंधित शैक्षणिक संस्थांनी पात्र युवक-युवतींमध्ये या स्पर्धेबाबत जनजागृती करून इंडियास्किल्स कॉम्पिटिशन 2026-27 स्पर्धेसाठी इच्छुक उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाइन नोंदणी करावी. असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

-*-*-*-*-*-

 

 

Wednesday, 5 August 2026

जिल्ह्यातील मृद व जलसंधारणाची सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत - मंत्री संजय राठोड • राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी घेतला मृद व जलसंधारण विभागाच्या विविध विषयांचा आढावा

 




 

जालना,दि.5(जिमाका) : मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून जालना जिल्ह्यात सुरु असलेली सर्व कामे  वेळेत पूर्ण करावीत अशा सूचना राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मृद व जलसंधारण विभागाशी संबंधित विविध विषयांचा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अर्जुन खोतकर,आमदार नारायण कुचे, आमदार हिकमत उढाण, आमदार संतोष दानवे  जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, मनिषा देशपांडे, मृद व जलसंधारण विभागाचे ओएसडी अनंत जगताप आणि देवेंद्र भामरे,  मुख्य अभियंता हरिभाऊ गिते, अधिक्षक अभियंता अजितकुमार परांडे,  कार्यकारी अभियंता नरेंद्र कटके,  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे,  वरिष्ठ भूवैज्ञानिक सी. एच. गिरीधर  यांची उपस्थिती होती.

यावेळी मंत्री श्री. राठोड म्हणाले की, जिल्ह्यातील पाझर तलाव दुरुस्ती, जलसंधारणाच्या जुन्या कामांची दुरुस्ती आणि नवीन कामांचा प्रस्ताव मृद व जलसंधारण विभागाने तयार करावा. भूसंपादनामुळे रखडलेल्या मृद व जलसंधारण विभागाच्या प्रकल्पांचा आढावा घेताना आवश्यकतेनुसार भूसंपादनासाठी निधी वितरित करावा. घनसावंगी तालूक्यातील जांब तांडा साठवण तलाव या प्रकल्पाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करुन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेत बैठकीचे आयोजन करुन त्यात निर्णय घेवून प्रस्ताव सादर करावा. एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत विशेष निधी व अभिसरणाची प्रस्तावित कामे तात्काळ पूर्ण करावीत. मागील वर्षात अतिवृष्टीने क्षतीग्रस्त झालेल्या योजनाची कामे पूर्ण करावी. जिल्हाधिकारी यांनी दर महिन्याला मृद व जलसंधारण विभागाच्या कामाचा आढावा घ्यावा. तसेच सर्व संबंधित विभागांनी जलतारा प्रकल्प राबविण्याला प्राधान्य द्यावे. सध्या पुरेसा पाणीसाठा असला तरी ‘एल निनो’ मुळे निर्माण होणारी संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेवून नियोजन करावे. तसेच  एल निनोच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जलसंधारणाची जास्तीत-जास्त कामे करण्याच्या दिल्या. तसेच जालना जिल्ह्यात मृद व जलसंधारण विभागातील अभियंता यांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही लवकर करण्यात येणार असल्याचे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

यावेळी सर्व लोकप्रतिनिधी यांनी प्रत्येक विधानसभा मतदार संघातील 1 कोल्हापूरी पध्दतीच्या बंधाऱ्याचे रुपातंर बॅरेजेस मध्ये करण्याची मागणी केली.

प्रारंभी जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी एल निनोच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यासाठी तयार केलेल्या 7 सुत्री कार्यक्रमाची माहिती सादरीकरणांद्वारे सादर केली.

यावेळी जिपचे कार्यकारी अभियंता, विभागीय वन अधिकारी, उप वन संरक्षक, प्रकल्प संचालक कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)  मृद व जलसंधारण विभागाचे उपअभियंता यांची  उपस्थिती होती.

 

-*-*-*-*-

 

राज्याचे वित्त, नियोजन, कृषि, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम


 

जालना, दि.5 (जिमाका) :-  राज्याचे  वित्त, नियोजन, कृषि, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे दि. 6 ऑगस्ट 2026 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत.

श्री. जयस्वाल हे गुरुवार, दि. 6 ऑगस्ट,2026 रोजी दुपारी  12.00  वाजता  बदनापुर येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद व बैठकीस उपस्थित राहतील. तसेच दुपारी 1.00 वाजता बदनापुर येथील कृषी विज्ञान केंद्र येथे भेट व पाहणी करतील. दुपारी 2.00 वाजता बदनापूर येथुन सोमठाणा- हसनाबादमार्गे  भोकरदन, जि. जालनाकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता रत्नमाला लॉन्स, जाफ्राबादरोड, भोकरदन जि. जालना येथे आगमन. दुपारी 2.35 वाजता पक्षाच्या बैठकीस उपस्थिती. दुपारी 3.30 वाजता भोकरदन- जाफ्राबाद मार्गावरील मौ. बाभुळगाव फाटा येथे पक्षाचा उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनुसार भोकरदन येथुन रामटेक जि. नागपुरकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-*-

श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव पालखी आगमनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वाहतुकीच्या मार्गात बदल

 


 

जालना, दि.5 (जिमाका) : श्री गजानन महाराज संस्थान शेगाव या न्यासाची श्री ची पालखी पायदळवारी पालखी परंपरेनुसार पंढरपुर येथुन परतीच्या मार्गावर असुन या दिंडीमध्ये 700 ते 800 वारकरी सहभागी आहेत. ही पायी दिंडी ही दि. 7 ऑगस्ट 2026 रोजी जालना जिल्ह्यात प्रवेश करणार असुन दि. 9 ऑगस्ट 2026 ते दि. 10 ऑगस्ट 2026 पर्यंत जालना शहरात मुक्कामी राहून दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी जालना – नाव्हा मार्गे सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणाकडे प्रयाण करणार आहे. ही पायी दिंडी बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश करतेवेळी जालना –नाव्हा-सिंदखेड राजा महामार्ग क्रमांक 753 सी वर मार्गक्रमण करणार आहे.

दिंडीचे दर्शन घेण्याकरीता मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार असुन जड वाहनांच्या रहदारीमुळे क्षुल्लक बाबी वरुन विवादीत परिस्थिती निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पायी दिंडीतील भाविकांच्या व जनतेच्या सुरक्षिततेसाठी व वाहतुकीच्या सुनियमनासाठी या  मार्गावरील वाहतुकीस पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.

 पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधु यांच्या आदेशान्वये राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 सी वरील जालना –नाव्हा-सिंदखेड राजा रोडवरील येणारी व जाणारी वाहतुक व्यवस्था दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 4.00 ते रात्री 8 वाजेपर्यंत खालील सर्व प्रकारच्या जड वाहतुकीस खाली दिलेल्या पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.

  अंबड चौफुली, मंठा चौफुली, कन्हैयानगर बायपास जालना- नाव्हा-सिंदखेड राजा मार्गे सुलतानपुर-मेहकरकडे जाणारी व येणारी जड वाहतुक  पर्यायी   मार्ग कन्हैयानगर जालना मार्गे देऊळगाव राजा-चिखलीकडे जातील व येतील.

            वरील मार्गाच्या जड वाहतुकीसाठी दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 4.00 ते रात्री 8 वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे. असा आदेश पोलीस अधीक्षक यांनी पारीत केला आहे.

-*-*-*-*-*-*-