जालना,दि.25 (जिमाका): भारतीय
संविधान दिनानिमित्त दि. 26 नोव्हेंबर,
2024 रोजी सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना या कार्यालय यांच्यावतीने डॉ.
बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृहामध्ये सकाळी 11.00 वाजता ‘भारताचे
संविधान’ या विषयावर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या
कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते म्हणुन प्रा. डॉ. विजयकुमार कुमठेकर, मत्स्योदरी
महाविद्यालय, जालना तसेच इतर मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास
नागरिकांनी उपस्थित राहण्याबाबतचे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना अनंत कदम
यांनी केले आहे.
26 नोव्हेंबर, 1949 रोजी आपण संविधान
स्वीकृत करुन, 26 जानेवारी, 1950 पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली.
संविधानाचे महत्व अनेक स्तरांवर असुन भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष,
लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय,
विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व
संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व
राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. संविधान हे एक
जीवंत दस्तऐवज आहे जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत
महत्वपूर्ण भूमिका बजावते.
भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, तसेच
संविधानाची मुल्ये शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच देशाचे भावी नागरिक
यांच्यापर्यंत पोहचावीत यासाठी राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची
व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व
शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयं
अर्थसहाय्यित शाळा/ आश्रमशाळा व वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था,
महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण
झाल्यानिमित्त सन 2024-25 या अमृतमहोत्सवी वर्षात "घर घर संविधान " हा
उपक्रम साजरा करण्यात येणार आहे.
****

