जालना,दि.14(जिमाका)
: महसूल विभाग हा राज्य शासनाचा कणा असून, महसूल विभागामार्फत
आपत्ती व्यवस्थापन, भूसंपादन, अन्न धान्य पूरवठा, गौण खनिज, निवडणुकासह राज्य शासनाच्या
महत्वकांक्षी योजना प्रभावीपणे राबविल्या जातात. हि सर्व कामे करतांना अधिकारी-कर्मचाऱ्यांवर
अतिरिक्त ताण व तणाव हा कायम असतो. हा ताण-तणाव कमी करुन मानसीक संतुलन ठेवण्यासाठी
दररोज शारिरीक व्यायाम हा आज अत्यावश्यक आहे, त्यामुळे अशा क्रीडा स्पर्धांचे आयोजन
करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास, व पंचायत
राज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषधी प्रशासन विभागाचे राज्य मंत्री
योगेश ज्योती रामदास कदम यांनी केले.
येथील पोलीस कवायत मैदान जालना येथे छत्रपती संभाजीनगर
विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा - 2025 चे दि. 14 ते 16 फेब्रुवारी, 2025 या कालावधीत आयोजन करण्यात आले.
त्याच्या उद्घाटन प्रसंगी महसुल राज्य मंत्री श्री. कदम हे बोलत होते. यावेळी आमदार
सर्वश्री राजेश राठोड, अर्जून खोतकर, नारायण कुचे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, विभागीय
सह आयुक्त अनंत गव्हाणे, विभागीय सह आयुक्त श्रीमती नयना बोदांर्डे, जालना जिल्हाधिकारी
डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, परभणीचे जिल्हाधिकारी
रघुनाथ गावडे, लातूरच्या जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे, हिंगोलीचे जिल्हाधिकारी
अभिनव गोयल, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रवार, परभणीचे अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप
काळे, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल,
तहसिलदार/नायब तहसिलदार संघटनेचे विभागीय अध्यक्ष विजय चव्हाण, महसूल कर्मचारी संघटनेचे
विभागीय अध्यक्ष लक्ष्मण नरमवार, तलाठी संघटनेचे राज्य अध्यक्ष संदीप नरुरे आदी उपस्थित
होते.
यावेळी श्री. कदम म्हणाले की, दैनंदिन कार्यपध्दतीमुळे
तसेच सतत वाढत असलेल्या कार्यालयीन कामकाजामुळे मानसिक ताण-तणाव वाढत आहे. यामुळे अनेकांना
आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. याकरीता सर्वांनी सर्वप्रथम आपल्या
आरोग्याकडे आणि आपल्या कुंटूंबाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. याकरीता दररोज स्वतःसाठी
किमान एक तास काढून व्यायाम करणे आवश्यक आहे. अशाप्रकारच्या क्रिडा स्पर्धांमुळे कर्मचाऱ्यांचा
मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. जालना येथे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेसह
सांस्कृतिक कार्यक्रमाचे ही आयोजन केले आहे. या माध्यमातून अधिकारी-कर्मचारी यांना
त्यांच्या सुप्त कलागुण सादर करण्याची देखील संधी उपलब्ध होणार आहे. तीन दिवस होणाऱ्या
या स्पर्धेचा सर्वांनी आनंद घ्यावा. जालना जिल्हा प्रशासनाने अतिशय चांगल्याप्रकारे या
स्पर्धांचे आयोजन केल्याने जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे अभिनंदन मी करतो. तसेच महसुल कर्मचाऱ्यांनी
शिस्तबध्द केलेल्या पथसंचालनाचे त्यांनी यावेळी कौतुक केले. तसेच महसुल क्रिडा महोत्सवाच्या
आयोजनासाठी वाढीव निधीची मागणी तसेच महसूल संघटनानी केलेल्या विविध मागण्या आपण महसुल
मंत्री यांच्या समोर ठेवून, याकरीता पाठपूरावा करणार असल्याची त्यांनी यावेळी ग्वाही
दिली.
यावेळी आमदार राजेश राठोड म्हणाले की, दैनंदिन कामकाज
करतांना कर्मचाऱ्यांवर अधिकच्या कामांचा ताण नेहमी असतो. याकरीता अशा स्पर्धांमुळे
अधिकारी-कर्मचारी यांचा ताण-तणाव कमी होण्यास नक्कीच मदत होते.
आमदार नारायण कुचे म्हणाले की, महसूल विभाग हा राज्य
शासनाचा प्रतिनिधीत्व करणारा विभाग आहे. त्यामुळे या विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्यावर
नेहमीच अधिकच्या कामाचा ताण असतो. ताण-तणावमुक्त करण्याबरोबर आरोग्य चांगले ठेवण्यासाठी
क्रीडा स्पर्धां अत्यंत महत्वाच्या आहेत. शरीर सुदृढ असल्यास कोणत्याही ताण-तणावाला
सहज सामोरे जाता येते. तसेच महसुल विभागाच्या ज्या काही मागण्या आहेत, त्याकरीता पाठपुरावा
करण्याची त्यांनी यावेळी ग्वाही दिली.
आमदार अर्जून खोतकर म्हणाले की, महसूल विभागाशी प्रत्येक
नागरिकाचा कोणत्या ना कोणत्या कारणाने संबंध येतो, जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या कामे
पार पाडण्याची जबाबदारी महसूल विभागावर असते. यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नेहमी कामाचा
अधिकचा ताण असतो. परंतू अशाप्रकारच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या माध्यमातून
त्यांचा ताण-तणाव कमी होण्यास नक्कीच मदत होईल. तसेच महसुल विभागीय स्पर्धेकरीता विविध जिल्ह्यातून आलेल्या
सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे या जिल्ह्याचा आमदार म्हणून करतो. जालना जिल्हा प्रशासनाने
अतिशय उत्कृष्टरित्या या स्पर्धेची तयारी केल्याने त्यांचेही कौतुक केले.
विभागीय आयुक्त दिलीप गावडे म्हणाले की, महसूल विभाग
म्हटलं की, सर्व प्रकारच्या दाखल्यापासून ते जमिन व्यवहार, निवडणूक आदींशी लोकप्रतिनिधी,
जनता यांचा संबंध येत असतो. आणि हे सर्व हाताळत आपण दैनंदिन प्रशासकीय कामकाज करतात.
तुमचं दैनंदिन जीवन हे आव्हानात्मक झाले आहे. प्रशासकीय कामकाज करतांना विविध गोष्टींचा
ताण हा सर्व अधिकारी - कर्मचाऱ्यांवर असतो. त्यामुळे अशा प्रकारच्या स्पर्धांच्या माध्यमातून
आपल्यातल्या कला-क्रीडा गुणांना प्रोत्साहन मिळाव व आपला ताण दूर व्हावा हा मुख्य हेतू
हा स्पर्धा आयोजनाचा आहे.
प्रास्ताविकात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ
म्हणाले की, जालना जिल्ह्याला विभागीय स्पर्धांचे आयोजन करण्याची संधी मिळाली. तीन
दिवस चालणाऱ्या या क्रिडा स्पर्धांमध्ये एकुण 84 क्रिडा प्रकारात 1500 खेळाडूंनी भाग घेतला आहे. या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन करण्याचा
आम्ही प्रयत्न केला आहे. या आयोजनात विविध विभागाचे देखील चांगले सहकार्य मिळाले. तीन
दिवस चालणाऱ्या या स्पर्धांचा सर्वांनी आनंद घ्यावा. तसेच येथुन जातांना आपल्या पुढील प्रशासकीय कामकाजासाठी
उत्साह घेऊन जावा असे आवाहन जालना जिल्हाधिकारी
डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.
प्रारंभी महसूल राज्य मंत्री यांच्या हस्ते क्रिडा ज्योत
प्रज्वलीत करुन स्पर्धांची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जालना, छत्रपती संभाजीनगर,
परभणी, लातूर, बीड, नांदेड, धाराशिव आणि हिंगोली या जिल्ह्यातील खेळाडूंनी राज्यमंत्र्याना पथसंचलनाच्या माध्यमातून मानवंदना
दिली. यावेळी श्री. कदम यांनी सर्व खेळाडूंना प्रतिज्ञा दिली. तसेच यावेळी मान्यवरांच्या
हस्ते स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले.
यावेळी राज्य मंत्री श्री. कदम यांच्या हस्ते पथ संचलनाचा
निकाल जाहिर करण्यात आला. यामध्ये जालना जिल्ह्याने प्रथम तर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने
द्वितीय आणि नांदेड जिल्ह्याने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
जालना येथे आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती संभाजीनगर
विभागीय महसुल क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा मध्ये जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी,
लातूर, बीड, नांदेड, धाराशिव आणि हिंगोली येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने
सहभागी झाले होते.
-*-*-*-*-*-*-