Tuesday, 25 February 2025

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

 


           जालना, दि. 21 (जिमाका) :- जिल्ह्यात इयत्ता दहावी व बारावीच्या शैक्षणिक परीक्षा सुरु आहेत. तसेच आगामी महाशिवरात्री, रमजान या सण, उत्सव आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत दि.6 मार्च 2025 पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी  गणेश महाडिक यांनी जारी केले आहेत.   

           संपूर्ण जालना जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश दि. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दि. 6 मार्च 2025 रोजीच्या 24 वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश अधिकारी- कर्मचाऱ्यांना तसेच उपविभागातील पोलिस अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूका, सभा, मोर्चा यांना लागू राहणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

 

जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत 436 कोटी नियतव्यय मंजूर

 


 

       जालना,दि.25(जिमाका) : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 करीता जिल्ह्यांनी सादर केलेल्या प्रारुप आराखड्यांना मान्यता देण्यासाठी तसेच त्यास अंतिम स्वरुप देण्यसाठी उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हानिहाय राज्यस्तरीय बैठकांचे आयोजन दि. 3 फेब्रुवारी, 2025 ते 11 फेब्रुवारी, 2025 या कालावधीत करण्यात आले होते. राज्यस्तरीय बैठकीमध्ये आपल्या जिल्ह्याकडून करण्यात आलेल्या सादरीकरणानंतर जिल्हा योजनेचा नियतव्यय अंतिम करतांना, कार्यान्वयीन यंत्रणांची मागणी, जिल्ह्याचे वैशिष्ट्य, गरजा तसेच शासनाची प्राथमिकता इ. बाबी विचारात घेऊन जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-25 करीता जालना जिल्ह्यासाठी एकूण रुपये 436 कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला. सन 2024-25 करीता जिल्ह्यासाठी 390 कोटी नियतव्य मंजूर झाला होता. सन 2024-25 करीता मंजूर नियतव्य अंतर्गत नागरी भागासाठी विशेष अतिरिक्त नियतव्यय रुपये 22.41 कोटी  रुपयांचा वापर करण्यात येणार आहे. तसेच बदनापूर आणि परतूर या आकांक्षित दोन तालुक्याकरीता प्रत्येकी 5-5 कोटी नियतव्यय शासनाने अंतिमत: मंजूर केला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.

राज्यात गतीने होत असलेले नागरीकरण लक्षात घेवून सर्व जिल्ह्यांना नागरीकरणाच्या प्रमाणात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सर्व महानगरपालिका/नगरपालिका/ नगरपंचायती यांना विशेष अतिरिक्त नियतव्यय (Special Additional outlay) उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता विचारात घेऊन, सन 2025-26 या वर्षाकरीता आपल्या जिल्ह्यास मंजूर रुपये 436 कोटी अंतिम नियतव्ययापैकी रुपये 22.41 कोटी इतका नागरी भागासाठीचा विशेष अतिरिक्त नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. या विशेष अतिरिक्त नियतव्ययाचा वापर आपल्या जिल्ह्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जनगणना-2011 च्या लोकसंख्येच्या प्रमाणात नागरी भागाच्या विकास कामांसाठी करण्यात येणार आहे.

निती आयोगाकडून जिल्ह्यातील बदनापूर व परतूर" हे तालुके आकांक्षित तालुके म्हणून घोषित करण्यात आले आहेत. आकांक्षित तालुक्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रति तालुका रुपये 5 कोटी याप्रमाणे रुपये 10 कोटी इतका निधी एक विशेष बाब म्हणून देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे.

 

**

Friday, 21 February 2025

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा : ऐतिहासिक निर्णय आणि केंद्र सरकारचे आभार

 


 

भारत सरकारने मराठी भाषेला अभिजात (Classical) भाषेचा दर्जा बहाल करून महाराष्ट्रातील आणि जगभरातील मराठी भाषिकांच्या भावना गौरविल्या आहेत. हा ऐतिहासिक निर्णय मराठी भाषेच्या समृद्ध साहित्य, परंपरा, आणि संस्कृतीची महती अधोरेखित करणारा आहे. अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय? भारतातील कोणत्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये मुख्यतः खालील बाबी महत्त्वाच्या ठरतात: 1. प्राचीनता: भाषा कमीतकमी १५०० ते २००० वर्षे जुनी असावी. 2. संपन्न साहित्य परंपरा: भाषेच्या प्राचीन आणि आधुनिक स्वरूपात मौलिक साहित्य विपुल प्रमाणात उपलब्ध असावे. 3. स्वतंत्र भाषिक परंपरा: भाषा अन्य कोणत्याही भाषेपासून प्रेरित न होता स्वतंत्र अस्तित्व टिकवून असावी. 4. संस्कृती आणि परंपरा: त्या भाषेने प्राचीन संस्कृतीच्या जतनात महत्त्वाची भूमिका बजावली असावी. मराठी भाषा आणि तिची अभिजातता मराठी भाषा सुमारे २२०० वर्षे जुनी असून तिचा उल्लेख शिलालेखांमध्ये आढळतो. सातवाहन काळातील लेखन, संत साहित्य, आणि आधुनिक साहित्यातील योगदान पाहता मराठी ही एक अत्यंत संपन्न आणि प्रभावशाली भाषा आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, वि.स. खांडेकर, पु.ल. देशपांडे, शिवाजी सावंत यांसारख्या महान लेखकांनी आणि कवींनी मराठीला समृद्ध केले आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे महत्त्व मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने खालील महत्त्वाचे लाभ होणार आहेत: 1. संशोधनाला चालना: मराठी भाषा, साहित्य, आणि संस्कृतीवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन होईल. 2. अधिक वित्तीय मदत: केंद्र सरकारकडून भाषा संवर्धनासाठी विशेष निधी उपलब्ध होईल. 3. विद्यापीठांमध्ये स्वतंत्र अभ्यासक्रम: मराठी भाषेवर विशेष अभ्यासक्रम आणि संशोधन केंद्रे स्थापन करता येतील. 4. वारसा जतन: मराठी भाषेचे प्राचीन ग्रंथ, शिलालेख, आणि ऐतिहासिक साहित्याचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी प्रयत्न होतील. केंद्र सरकारचे आभार मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल केंद्र सरकारचे मनःपूर्वक आभार. हा निर्णय मराठी भाषेच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील मराठी भाषिकांना या निर्णयाने अभिमानाची आणि प्रेरणादायी भावना प्राप्त झाली आहे शेवटी असे म्हणता येईल मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे हा मराठी संस्कृतीचा विजय आहे. हा निर्णय भाषा संवर्धनाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. आता आपल्या जबाबदारी आहे की मराठीच्या वृद्धीसाठी अधिक प्रयत्न करावेत आणि तिचे जागतिक स्तरावर संवर्धन करावे. "जय मराठी! जय भारत!"

 

-          डॉ. प्रकाश सत्यभामा दिनकरराव सिगेदार

Tuesday, 18 February 2025

अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्ज करावेत

 

 

जालना, दि. 18 (जिमाका) :-  जिल्ह्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडी सेविकास व मदतनीस यांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजना तालुका प्रकल्पनिहाय पद भरती करण्यात येत आहे. तरी संबंधित महिलांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी कोमल कोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

जालना-1 प्रकल्पात अंगणवाडी सेविका 5 व मदतनीस 25 पदे भरण्यात येणार आहेत. अंबड-1 प्रकल्पात अंगणवाडी सेविका 18 व मदतनीस 44 पदे भरण्यात येणार आहेत. अंबड-2 प्रकल्पात अंगणवाडी सेविका 9 व मदतनीस 17 पदे भरण्यात येणार आहेत. घनसावंगी-1 प्रकल्पात अंगणवाडी सेविका 13  व मदतनीस 33 पदे भरण्यात येणार आहेत. घनसावंगी-1 प्रकल्पात अंगणवाडी सेविका 18  व मदतनीस 39 पदे भरण्यात येणार आहेत. भोकरदन-1 प्रकल्पात अंगणवाडी सेविका 4 व मदतनीस 14 पदे भरण्यात येणार आहेत. भोकरदन-2 प्रकल्पात अंगणवाडी सेविका 3 व मदतनीस 20 पदे भरण्यात येणार आहेत. जाफ्राबाद प्रकल्पात अंगणवाडी सेविका 12 व मदतनीस 26 पदे भरण्यात येणार असून या सर्व प्रकल्पात अर्ज स्विकारण्याचा दि.24 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे. तसेच परतूर प्रकल्पात अंगणवाडी सेविका 9 व मदतनीस 16 पदे आणि मंठा प्रकल्पात अंगणवाडी सेविका 5 व मदतनीस 29 पदे भरण्यात येणार असून  या दोन प्रकल्पात अर्ज स्विकारण्याचा दि.28 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे. जालना-2 प्रकल्पात अंगणवाडी सेविका 12 व मदतनीस 35 पदे भरण्यात येणार असून अर्ज स्विकारण्याचा दि.21 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे. बदनापूर प्रकल्पात अंगणवाडी सेविका 6 व मदतनीस 44 पदे भरण्यात येणार असून अर्ज स्विकारण्याचा दि.25 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

Monday, 17 February 2025

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2023-24 प्राथमिक छाननी गुणांकन प्रसिध्द करण्यासाठी सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन

 


 

जालना, दि. 17 (जिमाका) :-  महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्कारासाठी ऑनलाईन सूचना व हरकती सादर करण्याचा सुरुवातीचा दि. 15 फेब्रुवारी,2025 तर सुचना व हरकती सादर करण्याचा अंतिम दि. 18 फेब्रुवारी,2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत  राहिल. तरी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार गुणांकन तक्ते अवलोकनासाठी व सूचना/ हरकती सादर करण्यासाठी ऑनलाईन https://shivchhatrapatiawards.com या लिंकवर ऑनलाईन अर्ज सादर करण्यात यावे, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जेष्ठ क्रीडा महर्षिकरीता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरीता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/ शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. शासनाने दि.29 डिसेंबर,2023 व दि.25 जानेवारी,2024 नुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली,2023 विहित केली आहे. या नियमावलीनुसार सन 2023-24 या वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू/ व्यक्ती यांच्याद्वारा दि.14 जानेवारी ते 26 जानेवारी,2025 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने प्राप्त झालेल्या अर्जाची प्राथमिक छाननी करण्यात आलेले असून, प्राथमिक छाननीचे गुणांकन तक्ते शासननिर्णय क्रं.शिछपु.2023/प्र.क्रं.188/क्रीयुसे-2, दि.29 डिसेंबर,2023 मधील नियम क्रं.1.19, नियम क्रं.1.20, नियम क्रं.1.21 अनवये एकूण गुणांकनासह दि.15 ते 18 फेब्रुवारी,2025 या कालावधीत सूचना व हरकतीसाठी https://shivchhatrapatiawards.com या लिंकवर प्रसिध्द करण्यात येत आहेत. सदरचे प्राथमिक छाननी अहवाल हे अंतिम नसून, त्यामध्ये आपल्या सूचना व हरकतींनुसार बदल होऊ शकतो, तसेच सूचना/ हरकतीनंतर सदरचा अहवाल पुन्हा प्रसिध्द करण्यात येणार नाही. प्राथमिक छाननी अहवालात केलेल्‍या पुरस्कार गुणांकनाबाबत काही आक्षेप किंवा सूचना असतील तर नमुन्यात सादर कराव्यात.

-*-*-*-*-

 

Friday, 14 February 2025

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

 

       जालना,दि.14 (जिमाका) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे  शनिवार, दि. 15 फेब्रुवारी, 2025  रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शनिवार, दि. 15 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 9.40 वाजता श्रध्दा एनर्जी व इन्फ्राप्रोजेक्टस प्रा. लि. बागेश्वरी साखर कारखाना येथील हेलिपॅड, युनिट नं.1, वरफळ, ता. परतुर, जि. जालना येथे आगमन व राखीव. त्यानंतर दुपारी 12.00 वाजता स्व. कन्हैयालाल जेथलिया नगर परिषद, क्रिडा संकुल, परतूर, जि. जालना येथे आगमन व माजी आमदार सुरेश जैथलिया यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमास उपस्थित राहतील. तसेच दुपारी 2.20 वाजता श्रध्दा एनर्जी व इन्फ्राप्रोजेक्टस प्रा. लि. बागेश्वरी साखर कारखाना येथील हेलिपॅड, युनिट नं.1, वरफळ, ता. परतुर, जि. जालना येथून दुपारी 2.25 वाजता हेलिकॉप्टरने प्रयाण करतील.

-*-*-*-*-*-

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन

 


      जालना,दि.14(जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास विभागाने ,समस्याग्रस्त पिडित महिलांना  त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण  होऊन न्याय मिळावा या हेतुने जिल्हा तसेच तालुकास्तरावर महिलांसाठी विशेष लोकशाही दिन  पाळण्याचे  ठरविले आहे.

          त्यानुसार तालुकास्तरावर प्रत्येक तहसील कार्यालयात महिन्याचा चौथा सोमवार आणि जिल्हास्तरावर  जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याचा तीसरा सोमवार महिला लोकशाही दिन म्हणुन पाळण्यात येत आहे. सदर महिला लोकशाही दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सकाळी  11.00 ते 12.00 या वेळेत करण्यात येते . दि. 17 फेब्रुवारी 2025 रोजी 11.00 ते 12.00 या वेळेत जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन होणार आहे. सदर महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करु इच्छिणाऱ्या महिलांनी आपली तक्रार दोन प्रतीत जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय, जालना येथे सादर करावी.

अर्ज स्विकृतीचे निकष खालील प्रमाणे आहेत.

तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे, तक्रार, निवेदन दोन प्रतीत सादर करावे, सदरील प्रकरण न्याय प्रविष्ठ  नसावे, अर्ज विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रतीसह सादर करावा, सेवा आस्थापना विषयक बाबी विचारात घेतल्या जाणार नाहीत. निवडणुक आचार संहिता काळात त्या-त्या स्तरावर, विधिमंडळ अधिवेशन काळात राज्यस्तरावर महिला लोकशाही दिन पाळण्यात येत नाही.

      शासन निर्णयाप्रमाणे महिलांनी प्रथम संबंधित तहसीलदार यांचेकडे महिला लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी दोन प्रतीत तक्रार दाखल करावी, तालुका महिला लोकशाही दिनात एक महिन्याच्या आत कार्यवाही  झाल्यास संबंधित महिला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करु शकतील. तालुकास्तरावरील लोकशाही दिनात अर्जदार महिलेस अंतिम उत्तर शक्य तितक्या लवकर जास्तीत-जास्त एक महिन्याच्या आत देण्याचे बंधन संबंधित अध्यक्ष तथा तहसिलदार सदस्य सचिव तथा बालविकास प्रकल्प अधिकारी यांची राहील. तरी महिलांनी तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी तालुकास्तरावर तहसील कार्यालय जिल्हास्तरावर  जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क करुन या उपक्रमाचा जास्तीत-जास्त लाभ घ्यावा, असे  जिल्हा माहिला बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-*-

जय छत्रपती जय शिवाजी भारत पदयात्राचे आयोजन

 


       जालना,दि.14 (जिमाका) : आयुक्त क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दि. 10 फेब्रुवारी, 2025 रोजी ऑनलाईन बैठकीत दिलेल्या सुचनानुसार दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 7.00 वाजता जय छत्रपती जय शिवाजी भारत पदयात्रा छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून (मोतीबाग) सुरुवात करुन कचेरी रोड-गांधी चमन-मंमादेवी मंदिर-पाणीवेश-काद्राबाद मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास माळा अर्पण करुन पुर्ण करण्यात येणार आहे. या पदयात्रेस जालना जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व विभागाचे विभाग प्रमुख यांची उपस्थिती राहणार आहे.

सर्व शाळा/ महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांसह एनसीसी, एनएसएस, स्काऊट/गाईडस विद्यार्थी यांना पदयात्रेस सहभागी करावेत तसेच सर्व क्रीडा संघटना पदाधिकारी व खेळाडू यांनी पदयात्रेला मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन, जिल्हा शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, जालना यांच्या वतीने करण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-*-

 

 

विभागीय महसुल क्रिडा स्पर्धांचे उत्साहात उद्घाटन · महसुल राज्य मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते महसुल क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन

 







 

जालना,दि.14(जिमाका) : महसूल विभाग हा राज्य शासनाचा कणा असून, महसूल विभागामार्फत आपत्ती व्यवस्थापन, भूसंपादन, अन्न धान्य पूरवठा, गौण खनिज, निवडणुकासह राज्य शासनाच्या महत्वकांक्षी योजना प्रभावीपणे राबविल्या जातात. हि सर्व कामे करतांना अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण व तणाव हा कायम असतो. हा ताण-तणाव कमी करुन मानसीक संतुलन ठेवण्यासाठी दररोज शारिरीक व्यायाम हा आज अत्यावश्यक आहे, त्यामुळे अशा क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास, व पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषधी प्रशासन विभागाचे राज्य मंत्री योगेश ज्योती रामदास कदम यांनी केले.

येथील पोलीस कवायत मैदान जालना येथे छत्रपती संभाजीनगर विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा - 2025 चे दि. 14 ते 16  फेब्रुवारी, 2025 या कालावधीत आयोजन करण्यात आले. त्याच्या उद्घाटन प्रसंगी महसुल राज्य मंत्री श्री. कदम हे बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री राजेश राठोड, अर्जून खोतकर, नारायण कुचे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, विभागीय सह आयुक्त अनंत गव्हाणे, विभागीय सह आयुक्त श्रीमती नयना बोदांर्डे, जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, लातूरच्या जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे, हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रवार, परभणीचे अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, तहसिलदार/नायब तहसिलदार संघटनेचे विभागीय अध्यक्ष विजय चव्हाण, महसूल कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष लक्ष्मण नरमवार, तलाठी संघटनेचे राज्य अध्यक्ष संदीप नरुरे आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. कदम म्हणाले की, दैनंदिन कार्यपध्दतीमुळे तसेच सतत वाढत असलेल्या कार्यालयीन कामकाजामुळे मानसिक ताण-तणाव वाढत आहे. यामुळे अनेकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. याकरीता सर्वांनी सर्वप्रथम आपल्या आरोग्याकडे आणि आपल्या कुंटूंबाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. याकरीता दररोज स्वतःसाठी किमान एक तास काढून व्यायाम करणे आवश्यक आहे. अशाप्रकारच्या क्रिडा स्पर्धांमुळे कर्मचाऱ्यांचा मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. जालना येथे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेसह सांस्कृतिक कार्यक्रमाचे ही आयोजन केले आहे. या माध्यमातून अधिकारी-कर्मचारी यांना त्यांच्या सुप्त कलागुण सादर करण्याची देखील संधी उपलब्ध होणार आहे. तीन दिवस होणाऱ्या या स्पर्धेचा सर्वांनी आनंद घ्यावा. जालना जिल्हा प्रशासनाने अतिशय चांगल्याप्रकारे या स्पर्धांचे आयोजन केल्याने जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे अभिनंदन मी करतो. तसेच महसुल कर्मचाऱ्यांनी शिस्तबध्द केलेल्या पथसंचालनाचे त्यांनी यावेळी कौतुक केले. तसेच महसुल क्रिडा महोत्सवाच्या आयोजनासाठी वाढीव निधीची मागणी तसेच महसूल संघटनानी केलेल्या विविध मागण्या आपण महसुल मंत्री यांच्या समोर ठेवून, याकरीता पाठपूरावा करणार असल्याची त्यांनी यावेळी ग्वाही दिली.

यावेळी आमदार राजेश राठोड म्हणाले की, दैनंदिन कामकाज करतांना कर्मचाऱ्यांवर अधिकच्या कामांचा ताण नेहमी असतो. याकरीता अशा स्पर्धांमुळे अधिकारी-कर्मचारी यांचा ताण-तणाव कमी होण्यास नक्कीच मदत होते.

आमदार नारायण कुचे म्हणाले की, महसूल विभाग हा राज्य शासनाचा प्रतिनिधीत्व करणारा विभाग आहे. त्यामुळे या विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्यावर नेहमीच अधिकच्या कामाचा ताण असतो. ताण-तणावमुक्त करण्याबरोबर आरोग्य चांगले ठेवण्यासाठी क्रीडा स्पर्धां अत्यंत महत्वाच्या आहेत. शरीर सुदृढ असल्यास कोणत्याही ताण-तणावाला सहज सामोरे जाता येते. तसेच महसुल विभागाच्या ज्या काही मागण्या आहेत, त्याकरीता पाठपुरावा करण्याची त्यांनी यावेळी ग्वाही दिली.

आमदार अर्जून खोतकर म्हणाले की, महसूल विभागाशी प्रत्येक नागरिकाचा कोणत्या ना कोणत्या कारणाने संबंध येतो, जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या कामे पार पाडण्याची जबाबदारी महसूल विभागावर असते. यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नेहमी कामाचा अधिकचा ताण असतो. परंतू अशाप्रकारच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा ताण-तणाव कमी होण्यास नक्कीच मदत होईल. तसेच  महसुल विभागीय स्पर्धेकरीता विविध जिल्ह्यातून आलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे या जिल्ह्याचा आमदार म्हणून करतो. जालना जिल्हा प्रशासनाने अतिशय उत्कृष्टरित्या या स्पर्धेची तयारी केल्याने त्यांचेही कौतुक केले.

विभागीय आयुक्त दिलीप गावडे म्हणाले की, महसूल विभाग म्हटलं की, सर्व प्रकारच्या दाखल्यापासून ते जमिन व्यवहार, निवडणूक आदींशी लोकप्रतिनिधी, जनता यांचा संबंध येत असतो. आणि हे सर्व हाताळत आपण दैनंदिन प्रशासकीय कामकाज करतात. तुमचं दैनंदिन जीवन हे आव्हानात्मक झाले आहे. प्रशासकीय कामकाज करतांना विविध गोष्टींचा ताण हा सर्व अधिकारी - कर्मचाऱ्यांवर असतो. त्यामुळे अशा प्रकारच्या स्पर्धांच्या माध्यमातून आपल्यातल्या कला-क्रीडा गुणांना प्रोत्साहन मिळाव व आपला ताण दूर व्हावा हा मुख्य हेतू हा स्पर्धा आयोजनाचा आहे.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले की, जालना जिल्ह्याला विभागीय स्पर्धांचे आयोजन करण्याची संधी मिळाली. तीन दिवस चालणाऱ्या या क्रिडा स्पर्धांमध्ये एकुण 84 क्रिडा प्रकारात 1500 खेळाडूंनी भाग  घेतला आहे. या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. या आयोजनात विविध विभागाचे देखील चांगले सहकार्य मिळाले. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धांचा सर्वांनी आनंद घ्यावा. तसेच  येथुन जातांना आपल्या पुढील प्रशासकीय कामकाजासाठी उत्साह घेऊन जावा असे आवाहन जालना  जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.

प्रारंभी महसूल राज्य मंत्री यांच्या हस्ते क्रिडा ज्योत प्रज्वलीत करुन स्पर्धांची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, बीड, नांदेड, धाराशिव आणि हिंगोली या जिल्ह्यातील खेळाडूंनी  राज्यमंत्र्याना पथसंचलनाच्या माध्यमातून मानवंदना दिली. यावेळी श्री. कदम यांनी सर्व खेळाडूंना प्रतिज्ञा दिली. तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले.

यावेळी राज्य मंत्री श्री. कदम यांच्या हस्ते पथ संचलनाचा निकाल जाहिर करण्यात आला. यामध्ये जालना जिल्ह्याने प्रथम तर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने द्वितीय आणि नांदेड जिल्ह्याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. 

जालना येथे आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती संभाजीनगर विभागीय महसुल क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा मध्ये जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, बीड, नांदेड, धाराशिव आणि हिंगोली येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

-*-*-*-*-*-*-

 

Thursday, 13 February 2025

कुष्ठरोगविषयक संदेश देणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद

 





जालना, दि. 12 (जिमाका) :- जिल्ह्यात "स्पर्श" कुष्ठरोग जनजागृती अभियान, कुष्ठरोग निवारण दिन व जनजागृती पंधरवाडा दि. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2025 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. कुष्ठरोगविषयक संदेश जनसामान्यांपर्यत पोहोचवण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने जिल्हास्तरीय खुली "रन फॉन लेप्रसी" मॅरेथॉन  स्पर्धेचे आयोजन दि. 13 फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेचा शुभारंभ सहायक जिल्हाधिकारी पुलकित सिंग यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.

जालना जिल्हा सामान्य रुग्णालयातून "रन फॉन लेप्रसी" मॅरेथॉन  स्पर्धेला सुरुवात होवून सामाजिक न्याय भवन, जिल्हा परिषद मार्गे अंबड चौफुली, सतकर कॉम्प्लेक्स ते जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथून सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) कार्यालयात मॅरेथॉनचा समारोप करण्यात आला.

सहभागी स्पर्धकांमधुन पुरुष गटात वैभव राजेंद्र शिंदे, आकाश रामेश्वर राठोड,  सचिन मोहन चव्हाण यांची अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाने निवड करण्यात आली.  तसेच महिला गटात प्रियंका लालसु ओकसा, शुभांगी वैजिनाथ म्हसलेकर, वैष्णवी बळीराम सोनटक्के यांची अनुक्रमे प्रथम, व्दितीय तृतीय क्रमांकाने निवड करण्यात आली. त्यांना रोख रक्कम पुरुष व महिला गटास अनुक्रमे 4 हजार रुपये, 2 हजार 500 रुपये, 1 हजार 500 रुपये व प्रशस्तीपत्र याप्रमाणे सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंग, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गजानन मस्के, डॉ. एन.जी. पवार, वैद्यकिय अधिकारी डॉ. आर.यु. काकड,   डॉ. जिल्हा हिवताप अधिकारी राहुल राऊत, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. सुधाकर शेळके, वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्कर्षा कड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) कार्यालयातील कर्मचारी एस.डी. सावंत, एन.जे.मगर, एस.जी. शेख, सुंदर देवकते, दत्ता डाके, डॉ. रोहन ठोंबरे, श्रीमती मुंदडा, अश्विनी दांड,  फेरोज पठाण, प्रशांत दहीभाते, अश्विनी बदर तसेच जिल्हा हिवताप कार्यालय व जिल्हा क्षयरोग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चक्रधर बागल यांनी केले.

-*-*-*-*-