Monday, 29 July 2024

जालना जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी उद्योजकांना जिल्हा प्रशासनाचे सर्व सहकार्य -- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ इग्नाइट महाराष्ट्र कार्यशाळेस उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उद्योग उभारणीसाठी विविध तज्ञांनी केले मार्गदर्शन


 





     जालना, दि. 29 (जिमाका)-- नवउद्योजकांना उद्योग उभारणीसाठी जालना जिल्ह्यात पोषक वातावरण आहे. प्रमुख शहरांना जोडणारे रस्ते, रेल्वे मार्ग, समृध्दी महामार्ग यासारख्या वाहतुकीच्या सुविधांसह इतर पायाभूत सुविधा जिल्हयात उपलब्ध असल्याने उद्योजकांनी आपला उद्योग या जिल्ह्यात अवश्य उभारावा, यासाठी जिल्हा प्रशासनाचे उद्योजकांना सर्व सहकार्य राहिल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.

           सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग (MSME) क्षेत्रासंदर्भात राज्य व केंद्र शासनाची धोरणे व उपक्रम याबाबत जागरुकता वाढविण्यासाठी उद्योजक व निर्यातदार यांच्याकरीता आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे इग्नाइट महाराष्ट्र कार्यशाळा (IGNITE MAHARASHTRA-2024)  संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.

           कार्यशाळेस अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, छत्रपती संभाजीनगर विभागाचे उद्योग सहसंचालक बी.टी. यशवंते, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक योगेश सारणीकर, सिंगल विंडोचे (मैत्री) अधिकारी प्रदीप दळवी, सिडबीचे व्यवस्थापकीय अधिकारी मनोज कुमार सहयोगी, जालन्याचे पोस्टमास्टर संदिप महाजन, आयडीबीयचे उपव्यवस्थापक मिलिंद काळे, निर्यात तज्ञ अमोल मोहिते, विमा सल्लागार आनंद अमृतकर आदी उपस्थित होते. यावेळी उद्योजक, औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी, नवउद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, जालना हा कृषी प्रधान जिल्हा आहे. यासह हा जिल्हा स्टील, बियाणे उद्योगांसाठी प्रसिध्द आहे. आता हा जिल्हा रेशीम उद्योगासाठीही नावारुपाला येत आहे. एकंदरीत जिल्ह्यात उद्योगासाठी अतिशय सकारात्मक पोषक वातावरण असल्याने नवउद्योजकांसाठी उद्योग उभारणीकरीता येथे चांगली संधी आहे. उद्योजकांना जिल्हा प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहिल. उद्योग विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा उद्योजकांना प्राधान्याने लाभ दिला जाईल. सध्या जालन्याचा औद्योगिक विकास पाहता येत्या काळात हे शहर मोठे औद्योगिक शहर म्हणून नक्कीच ओळखले जाईल.

         श्रीमती मेत्रेवार यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल माहिती दिली. या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार युवक-युवतींना विविध आस्थापनेवर प्रशिक्षणाची संधी मिळणार असल्याने योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

          श्री. बी.टी. यशवंते यांनी सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग क्षेत्रासंदर्भात राज्य व केंद्र शासनाची धोरणे व उपक्रम तसेच उद्योग विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.

       श्री. दळवी यांनी उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या विविध परवानग्या कशा मिळवाव्यात त्यासाठी असणाऱ्या सिंगल विंडो (मैत्री) पध्दतीतबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्री. काळे यांनी बँकिंग फायनान्स, श्री. मोहिते यांनी निर्यात, श्री. अमृतकर यांनी उद्योगासाठी असणारा विमा, श्री. सहयोगी यांनी सिडबीचे कार्य तर श्री. महाजन यांनी टपाल कार्यालयामार्फत करण्यात येणाऱ्या मालाचे वाहतूक व्यवस्थापन याविषयी आणि श्री. सारणीकर यांनी जालना जिल्हयातील औद्योगिक विकास व  सुविधांबद्दल सादरकरणाव्दारे माहिती दिली.

-*-*-*-*-

 

 

Wednesday, 24 July 2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात तब्बल 1 लक्ष 29 हजार 924 प्रमाणपत्रे वितरीत

 


 

जालना, दि. 24 (जिमाका) :-   जालना जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दि. 1 जुलै  ते 22 जुलै 2024 या कालावधीत एकूण 78067 उत्पन्न प्रमाणपत्रे आणि 51857 वय, अधिवास व राष्ट्रीयता प्रमाणपत्र असे एकुण 1 लाख 29 हजार 924 प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली आहेत. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी आपले सरकार सेवा केंद्राच्या तीन बैठका घेतल्या असून यामध्ये योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला, आणि योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना, तसेच केंद्रावर आलेल्या नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन व ऑनलाईन अर्ज करण्यास मदत करण्याचे निर्देश देण्यात आले. या योजनेमुळे जिल्ह्यातील अनेक मुलींना शैक्षणिक व सामाजिक लाभ होईल. तसेच शासनाच्या या उपक्रमामुळे मुलींच्या शिक्षणाला व आत्मनिर्भरतेला चालना मिळणार आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, सर्व तहसीलदार व अन्य अधिकारी वर्ग यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक मुलींनी व त्यांच्या कुटुंबियांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

-*-*-*-*- 

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेतखाली जिल्हा स्वस्त धानय्‍ दुकानदारांची बैठक संपन्न

 




जालना, दि. 24 (जिमाका) :-  दि. 24 जुलै 2024 रोजी दुपारी 12.00 वाजता जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार, केरोसीन परवाना धारक महासंघ यांच्या रास्तभाव दुकानदारांच्या काही मागण्या व अडीअडचणी  संबंधी निवेदनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर, सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी डी.एस. दिवटे यांची उपस्थिती होती.

या बैठकीत रास्तभाव दुकान परवानाधारक यांच्या महत्वाच्या मागण्या व अडीअडचणीवर चर्चा करण्यात  आली. राज्यातील रास्तभाव दुकानामध्ये आजच्या महागाई निर्देशानुसार मार्जिनमध्ये योग्य ती वाढ करण्यात यावी. पॉस मशीन संदर्भात येणाऱ्या अडीअडचणी तसेच रास्तभाव दुाकानाच्या मार्जिनची रक्कम वेळेवर मिळण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली.

लाभार्थ्यांचे आधार क्रमाकांसह पडताळणी अर्थात ई- केवायसी  करणे ही निरंतर प्रक्रिया असायला हवी. एपीएल शेतकरी शिधापत्रिका धारकांना देण्यात येणाऱ्या सबसीडीबाबत चर्चा झाली. तसेच रास्तभाव दुकानदारांच्या अडीअडचणी समजून घेण्यात आल्या.

या बैठकीस जिल्हातील रास्तभाव दुकानदार संघटनेची पदाधिकारी मनीत कक्कड, प्रभाकर डोंगरे, बाबासाहेब हिवराळे, जगन्नाथ थोटे, नामदेव तनपुरे, विठ्ठल काळे, संभाजी कळकटे, गोवर्धन धबडकर व इतर रास्तभाव दुकानदान उपस्थित होते. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-

 

जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करावेत

 

 

जालना, दि. 24 (जिमाका) :- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शनिवार दि.18 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सेवा केंद्रावरुन किंवा इतर ठिकाणावरुन ऑनलाईन अर्ज दि.16 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. तरी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे अर्ज जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी सादर करावेत, असे आवाहन अंबा-परतूर जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.जी. पवार यांनी केले आहे.

            जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी-2025 साठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी पाचवीच्या मुख्याध्यापकांकडून प्रमाणपत्र भरुन घ्यावे, तसेच प्रमाणपत्रावर विद्यार्थ्यांचे छायाचित्र, स्वाक्षरी व पालकांची स्वाक्षरी करुन हे प्रमाणपत्र मुख्याध्यापकाद्वारे प्रमाणित करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज सादर करणे, जाहिरात, माहितीपत्रक, प्रमाणपत्र आदि www.navodaya.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्यासाठी प्रमाणपत्र, छायाचित्र, स्वाक्षरी 10 ते 100 केबीमध्ये स्कॅन करुन भरावेत. विद्यार्थ्यांचा जन्म      दि.1 मे 2013 ते 31 जुलै 2015 या कालावधीमधील असावा. जालना जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या व इयत्ता पाचवी वर्गात वर्ष 2024-25 मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी करता येणार आहे. असे प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, अंबा-परतूर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

कारगिल विजय दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

 

 

जालना, दि. 24 (जिमाका) :-  शहीद सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी राज्यात 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षी 25 वा कारगील विजय दिवस हा कारगिल विजय रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवसाचे औचित्य साधून दि. 26 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता वन विभागाकडून प्राप्त फळ झाडांचे वृक्षारोपण करुन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथील  सैनिकी संकूलावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील वीर पत्नी, वीर माता, वीर पिता, माजी सैनिक, विधवा व त्यांचे अवलंबितांसह इतर नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

Friday, 19 July 2024

राज्य राखीव पोलीस बलाच्या शारीरिक व मैदानी चाचणीचा शेवट मंगळवारी

 


     जालना, दि. 19 (जिमाका) :-  राज्य राखीव पोलीस बल गट क्र.3 जालना येथील 248 रिक्त पदाकरीता  25 हजार 463 उमेदवारांचे आवेदन अर्ज प्राप्त झाले आहेत. सदरची सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रिया दि. 19 जुन 2024 रोजी पासुन  गट क्र. 3 जालना येथे सुरु आहे. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 3 जालना येथील शारीरिक व मैदानी चाचणीची मंगळवार दि. 23 जुलै 2024 रोजी शेवटची तारीख असून त्यानंतर शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात येणार नाही.  

        MAHA-IT  यांचेद्वारे प्रशासकीय तथा पावसाळी हवामानामुळे  बऱ्याच उमेदवारंना शारीरिक व मैदानी चाचणी करीता हजर राहण्याच्या नव्याने तारखा देण्यात आलेल्या आहेत अश्या उमेदवारांनी त्याच दिनांकास चाचणीकरीता हजर रहावयायचे आहे.  दि. 23 जुलै 2024 रोजी नंतर मैदानी चाचणीस उपस्थित राहणाऱ्या उमेदवार यांना भरती प्रक्रियेत सामावून घेण्यात येणार नाही. शारीरिक व मैदानी चाचणी संपल्यानंतर सदर अंतिम दिनांकानंतर लेखी परिक्षेबाबत पुर्व तयारी चालु करण्यात येणार आहे. मैदानी चाचणीचे शेवटचा एक दिवस दि.23 जुलै 2024 मंगळवार रोजी असून जे उमेदवार प्रासांगिक कारणामुळे मैदानी चाचणीस उपस्थित राहू शकले नाहीत त्यांना दि. 23 जुलै 2024 रोजी उपस्थित राहून आपली शारीरिक व मैदानी चाचणी पुर्ण करुन घेण्याची मुभा/संधी देण्यात येत आहे. सदर उमेदवार यांनी येतांना अर्ज,प्रवेशपत्र व विलंबाबत असलेल्या कारणाचा सबळ पुरावा घेऊन उपस्थित राहावे. संपर्क क्रमांक – 02482-230902

अधिक माहितीसाठी – www.maharashtrasrpf.gov.in,  www.mahapolice.gov.in  policerecruitment2024.mahait.org   या संकेत स्थळाला भेट देण्यात यावी.असे आवाहन  राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 3 चे समादेशक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

जिल्हास्त़र सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धेने शालेय स्पर्धेस सुरूवात

 





जालना, दि. 19 (जिमाका) :-  आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे आदेशान्वये सन 2024-25 या वर्षातील जिल्हास्त़र सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 15 वर्षेआतील मुले व 17 वर्षेआतील मुले व मुली  क्रीडा स्पर्धा 2024-25 चे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, जालना व जिल्हा फुटबॉल असोशिएशन, जालना यांचे तांत्रिक सहकार्याने दि. 19 ते 20 जुलै 2024 या कालावधीत रेल्वे मैदान येथे करण्यात आले.

जिल्हास्तर सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन दि. 19 जुलै 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता रेल्वे मैदान येथे संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून रेल्वे विभागाचे ए.डी.ई. एन इंजिनिअर, लक्षू नायक,  यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी पी.डब्ल्यु आय, सेक्शन इंजिनिअर, मनोजकुमार निराला,  जिल्हा क्रीडा अधिकारी, अरविंद विद्यागर, सचिव, जिल्हा फुटबॉल असोशिएशन, जालना, रमेश शेळके, , सचिव, रेल्वे युनियन, जालना, शेख जावेद, सदस्य, जिल्हा फुटबॉल असोशिएशन, जालना, मोहमद अकबर, विविध शाळांचे क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.

दिनांक 19 जुलै 2024 रोजी 17 वर्षाआतील मुले या गटाने सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेस सुरूवात झाली, सदर गटात जिल्हयातील 15 संघानी सहभाग नोंदविला आहे.

सदर स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पंच म्हणून शौकत पठाण, बाबा पठाण, मिलींद इंगळे, शेख रियाज, शेख रहेमान, सय्यद सुलतान, योगेश अंभोरे हे काम पाहत आहे.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन क्रीडा अधिकारी रेखा परदेशी यांनी तर आभार प्रदर्शन क्रीडा अधिकारी आरती चिल्लारे यांनी केले. यावेळी खेळाडू, क्रीडा प्रेमी, क्रीडा संघटक, युवक युवती सह इतर मोठया संख्येने उपस्थित होते.

जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांचे मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी रेखा परदेशी, आरती चिल्लारे, सोपान शिंदे, हारूण खान, राहुल गायके इत्यादी परिश्रम घेत आहेत. अशी माहिती जिल्हा क्रिडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. -*-*-*-*-*-

Thursday, 18 July 2024

शेतकऱ्यांना ई समृध्दी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

 

 

जालना, दि. 18 (जिमाका) :-  जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या  https://esamridhi.in/#/login या संकेतस्थळाला भेट देवून अथवा क्युआर कोड स्कॅन करुन आपल्या शेतीमालाची एमएसपी दराने विक्री करण्यासाठी ई समृध्दी पोर्टलवर खरेदी प्री रजिस्ट्रेशन करावे व केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा मार्केंटींग अधिकारी जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व नाफेड कार्यालय, मुंबई यांच्या संयक्त विद्यामाने दरवर्षीप्रमाणे हंगाम 2024-25 मध्ये ही जिल्ह्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानूसार नाफेडमार्फत मका, तूर, चना, मुग, उडीद व सोयाबिन खरेदी करण्यात येणार आहे. नाफेड कार्यालयाने शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी ई समृध्दी पोर्टल सुरु केले असून नाफेडमार्फत राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ राज्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यत पोहोचवावा यासाठी शेतकऱ्यांनी ई समृध्दी पोर्टलवर नोंदणी करुन आपल्या शेतीमालास योग्य दर घ्यावा, याकरीता सदर पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

-*-*-*-*-

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत

  

जालना, दि. 18 (जिमाका) :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय जालना मार्फत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. योजनेसाठी मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकिय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवुन 60 टक्के गुण किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात बुधवार दि.24 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक व्ही. एस. सोनवणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना वितरण करण्यासाठी जास्त टक्केवारी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची गुणानुक्रमानुसार निवड मुख्यालय मुंबई यांच्याकडुन उपलब्ध निधीच्या प्रमाणात केली जात असते.  

अर्जदाराचा जातीचा दाखला, अर्जदाराच्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला,  शिधापत्रिका, आधारकार्ड,  गुणपत्रक, दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्र, बोनाफाईड किंवा पुढील वर्षात प्रवेश घेतल्याची पावती आदि कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्जदाराने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना येथे बुधवार दि.24 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत.  असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

जुन अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र ई-आर 1 सादर करण्याचे आवाहन

 

 

जालना, दि. 18 (जिमाका) :- सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासन यांची सर्व कार्यालये, अंगिकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगर पालिका, नगरपालिका, तसेच खाजगी क्षेत्रातील 25 किंवा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार, व्यवसाय, कारखाने यांना सेवायोजन कार्यालये कायदा 1959 व त्या अंतर्गत नियमावली 1960 नुसार त्रैमासिक विवरणरपत्र ई-आर 1 माहे जुन, 2024 तिमाही संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. तरी जिल्ह्यातील कसूरदार आस्थापनांवर कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भुजंग रिठे यांनी केले आहे.

या प्रमाणे नियोक्त्यांच्या लॉग-इन मध्ये विवरणपत्र www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या प्रमाणे नियोक्त्यांची जुन, 2024 या तिमाहीचे विवरणपत्र ई-आर 1 दि. 31 जुलै, 2024 पर्यंत सादर करावे. यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in वेबसाईट ओपन करुन, एम्प्लॉयरवर क्लिक करुन एम्प्लॉयर लॉग इनमध्ये नियोक्त्यांचा युजर आय डी व पासवर्ड वापरुन लॉग इन करुन ईआर रिपोर्टमधील ई-आर 1 या ऑप्शनवर क्लिक करुन ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. यासाठी काही तांत्रिक अडचण आल्यास किंवा अधिकच्या सहाय्यासाठी सोमवार ते शुक्रवार कालावधीत या कार्यालयाच्या 02482299033  दूरध्वनीवर संपर्क करावा. सेवायोजन कार्यालये (रिक्तपदाची सुचना देणे सक्तीचे) कायदा 1959 व त्या अंतर्गत नियमावली 1960 मधील तरतुदी नुसार सर्व आस्थापनांनी जुन 2024 या अखेर आपल्या वेतन पटावर असलेल्या सर्व मनुष्यबळाची माहिती ई-आर 1 विवरणपत्र 31 जुलै, 2024 पुर्वी वरील वेबसाईटवर ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

बदनापूर तालुक्यात संपूर्णता अभियान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

 

 

जालना, दि. 18 (जिमाका) :-  भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या केन्द्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय- छत्रपती संभाजीनगर, बदनापुर पंचायत समिती तसेच वाकुळणी ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने वाकुळणी येथे संपूर्णता अभियान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन दि. 22 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने हजर राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केन्द्रीय संचार ब्यूरोचे छत्रपती संभाजीनगर क्षेत्रीय कार्यालय, बदनापूर पंचायत समिती व वाकूळणी ग्रामपंचायत यांनी केले आहे.

कार्यक्रमाच्या प्रचारार्थ दि. 22 जुलै 2024 रोजी कार्यक्रमाआधी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे तसेच दि. 20 व 21 जुलै 2024 रोजी गावात दवंडी देण्यात येणार आहे. या अभियानात निवडक आकांक्षित तालुक्यांमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत शासनाच्या योजनांची माहिती पोहोविण्याकरिता निती आयोगाच्या मार्गदर्शनाखाली अशा विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. केंद्र शासनाने आकांक्षित जिल्ह्यांचा जलद आणि प्रभावीपणे कायापालट करण्यासाठी आकांक्षी जिल्हा कार्यक्रम लाँच केला आहे. आकांक्षी जिल्हा कार्यक्रमकडून मिळालेल्या माहितीवर आधारित, 500 ब्लॉक्स समाविष्ट करणारा आकांक्षी ब्लॉक्स प्रोग्राम जानेवारी 2023 मध्ये सुरू करण्यात आला आहे. भारतातील सर्वात अविकसित क्षेत्रांमधील प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी निती आयोगाने ही मोहीम सुरू केली आहे. आकांक्षित तालुक्यांमधील सहा निर्देशक सुधारण्यासाठी काम करण्यात येईल. त्यामध्ये प्रसूतीपूर्व काळजीसाठी गर्भवती महिलांची वेळेवर नोंदणी, त्यांना पूरक पोषण आहार, मधुमेह आणि रक्तदाबासाठी आकांक्षित तालुक्यांमध्ये लोकसंख्येची तपासणी करणे, माती आरोग्य कार्ड, बचत गट रिव्हॉल्व्हिंग फंडाची तरतूद आदी तर जिल्हा स्तरावर त्याचे लक्ष्य मुलांचे लसीकरण, माध्यमिक शाळांना वीज किंवा पाठ्यपुस्तके पुरवण्याचा आढावा घेणे अदिचा समावेश असेल. या अभियानाचा कालावधी 1 जुलै 2024 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत असेल.  संपूर्णता अभियान जनजागृती कार्यक्रमात शासनाच्या विविध योजनांवर तज्‍ज्ञाद्वारे  मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

-*-*-*-*-

केंद्र शासनाचे जलशक्ती अभियान केंद्रीय पथकाचा अभ्यास दौरा संपन्न

 

 

जालना, दि. 18 (जिमाका) :-  केंद्र शासनाचे जलशक्ती अभियान केंद्रीय पथक जालना येथे दि. 15 ते 17 जुलै 2024 ला जालना जिल्ह्याच्या प्रथम अभ्यास दौऱ्यावर असताना त्यांनी अभियानाअंतर्गत झालेल्या विविध कामांची पाहणी केली. तसेच दि.16 जुलै 2024 रोजी  जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत जलशक्ती अभियान अंतर्गत झालेल्या कामांचे पथकासमोर सादरीकरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय नोडल अधिकारी श्रीकांत नामदेव, वैज्ञानिक तथा तांत्रिक अधिकारी प्रिती राऊत यांनी जालना प्रशासनामार्फत राबविण्यात आलेल्या योजनांचे कौतुक केले.

अभियानाअंतर्गत झालेल्या विविध कामांची दि. 15 जुलै 2024 रोजी पाहणी पथकाने केली. यात दरेगाव येथील रिचार्ज शाफ्ट व सामनगाव येथे शेततळे, सिमेंट नाला बांध व कोल्हापुरी बंधारा, अंबड येथील पुरातन पुष्कर बारव ला भेट दिली. दि. 16 जुलै रोजी कौचलवाडी येथे पोणलोट समिती व गावक-यांशी चर्चा केली व जलसंधारण कामांमधिल महिलांच्या सहभागाचे कौतुक केले. तसेच दि. 17 जुलै 2024 रोजी अंहकार देऊळगाव येथील जलजीवन मिशन अंर्तगत पुर्ण करण्यात आलेल्या हर घर जल योजनेची पाहणी केली. तसेच जिल्हा जलसंधारण आराखडा तात्काळ तयार करण्याबाबत, जिल्ह्यातील पाणी साठ्यांची जिओ टॅगींग, पुरातन बारवांची दुरुस्ती, जन जागरुकता अभियान मधे जास्तीत जास्त महिलांचा समावेश करण्याबाबत सुचना दिल्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार जालना, जिल्हा जलसंधारण अधिकारी आर.एच. झुरावत, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पदमाकर गायकवाड, जिल्हा अधिक्षक कृषी अधिक्षक जी. आर. कापसे, कार्यकारी अभियंता विद्या कानडे,  कृषी अभियंता प्रा. पी.व्ही. वासरे व इतर अधिकारी उपस्थित होते. असे जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

-*-*-*-*-


Tuesday, 16 July 2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी 31 ऑगस्टपर्यंत केली तरीही लाभ जुलैपासून मिळणार - पालकमंत्री अतुल सावे

 



जालना, दि. 16 (जिमाका) :-  राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आलेली आहे. तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेवटच्या पात्र महिला लाभार्थ्यांपर्यत योजनेचा लाभ पोहचविण्यासाठी नोंदणीवर भर देण्यात यावा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत केली तरीही लाभ 1 जुलैपासून देण्यात येईल, अशी नि:संदिग्ध ग्वाही राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी बैठकीत दिली. 

            मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जिल्हास्तरीय समितीची बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

            पालकमंत्री श्री. सावे म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नारी शक्ती दूत ॲपवर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. तरी या ॲपवर उदभवणाऱ्या तांत्रिक समस्या तातडीने सोडविण्यासाठी जबाबदार तंत्रस्नेहीची नेमणूक करण्यात यावी. नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका, महिला व बाल कल्याण विभागासह अंगणवाडी  सेविकांचे सहाय्य घेवून त्यांना प्रती दिन उद्दीष्ट देवून ग्रामीण भागातील शेवटच्या पात्र महिलेची नोंदणी करण्यात यावी. पात्र महिलांच्या नोंदणीचे काम शासकीय यंत्रणेकडून 100 टक्के होण्यासाठी वेळोवेळी आढावा घेवून दक्षता घ्यावी तसेच वेळोवेळी लोकप्रतिनिधींचे सहकार्यही घेण्यात यावे. ज्या अंगणवाडी सेविका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आपल्या उद्दीष्टपूर्तीसह उत्कृष्ट काम करतील त्यांचा सन्मान येत्या प्रजासत्ताक दिनी करण्यात येईल. असेही त्यांनी सांगितले. तसेच पाऊस, पिक विमा, खते, बि-बियाणे या कृषी निविष्ठांची परिस्थिती जाणून घेतली.

            सुरुवातीस जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांनी नारी शक्ती दूत ॲपवरील बाबी अधिक सुस्पष्ट करण्यात आलेल्या असून लाभार्थ्यांची अडचण होवू नये यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात आज रोजीपर्यंत जवळपास 70259 अर्ज जमा झाले आहेत तसेच ऑनलाईन 24112 अर्ज आले असल्याचे सांगून जिल्हास्तरीय समितीच्या कार्यकक्षा, विविध विभागांना नेमून दिलेली कामे, बैठका, प्रशिक्षण, अर्जाची स्थिती, केंद्र, शिबीरे आदिची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे उपलब्ध करुन दिली.

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेंच्या नियोजित तारखेत बदल


 

जालना, दि. 16 (जिमाका) :-  शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद  व जालना जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन दि. 18 ते 19 जुलै 2024 या कालावधीत करण्यात आले होते.  तांत्रिक कारणास्तव तारखेत बदल करण्यात आला असून जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धेंचे आयोजन आता 17 वर्षाखालील मुले दि. 19 जुलै 2024 रोजी व 15 वर्षाखालील मुले आणि 17 वर्षाखालील मुलींसाठी दि. 20 जुलै 2024 रोजी जालना येथील रेल्वे फुटबॉल मैदानावर आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती  जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी जन्म तारखेनुसार वयोमर्यादा 15 वर्षाआतील मुले (सब ज्युनिअर) साठी दि. 1 जानेवारी 2010 किंवा त्यानंतर जन्म़लेला असावा व 17 वर्षाआतील मुले व मुली (ज्युनिअर) या गटासाठी  दि. 1 जानेवारी 2008 किंवा त्यानंतर जन्म़लेला असावा.   स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूकडे जन्म दाखला, आधार कार्ड, पासपोर्ट (मुळ प्रतीत) असणे आवश्यक आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेची प्रवेशिका सादर करण्याची शेवटची तारीख  दि. 18 जुलै 2024 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत ऑफलाईन पध्दतीने प्रत्यक्ष जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात जमा करावेत.  स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी आरती चिल्लारे (मो.7758863991) यांच्याशी संपर्क साधावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

Friday, 12 July 2024

“मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण” योजना जालना जिल्हयात प्रभावीपणे राबवावी -- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडीसेविका / कर्मचाऱ्यांचा केला जाणार गौरव अर्ज भरताना महिलांना समस्या भासू देऊ नयेत

 




जालना, दि. 12 (जिमाका) :-  महिलांसाठी राज्यशासनाने मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण  ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केलेली आहे. जालना जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयाने कामे करुन योजनेची यशस्वीपणे अंमलबजावणी करावी. या योजनेतंर्गत सर्वात जास्त अर्ज नोंदणी करणाऱ्या अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांची तालुकानिहाय निवड करुन 15 ऑगस्टला त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने गौरव करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.

मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल भवन येथे बुधवारी (10 जुलै) आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस सर्व नगर परिषद, नगर पालिकांचे मुख्याधिकारी, जालना महानगर पालिकाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरीक्षेत्र) अधिकारी-कर्मचारी, अंगणवाडी सेविका (नागरी क्षेत्र), मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजनेसाठी नियुक्त वार्डाधिकारी, कर्मचारी (नगर परिषद/नगर पालिका) क्षेत्र कर्मचारी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले की, मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना योजनेची संपूर्ण माहिती सांगावी.  पात्रता निकष, अपात्र निकष लाभार्थ्यांना सांगण्यात यावेत. तसेच लाभार्थ्यांना अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे सुलभपणे उपलब्ध करुन द्यावीत. कोणत्याही महिलेला अर्ज भरताना अडचण भासू देऊ नये.

अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पध्दतीने स्वीकारण्यात यावे. यासाठी प्रत्येक वार्डनिहाय, प्रभागनिहाय नियोजन करण्यात यावे. त्यानुसार अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी व त्याची प्रसिध्दी करण्यात यावी. अशा सूचना सर्व मुख्याधिकारी यांना देण्यात आल्या.

सर्व तालुक्यांमध्ये सर्वात जास्त अर्ज नोंदणी व उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि कर्मचारी यांचा विशेष  पुरस्कार देवुन गौरव करण्यात येईल.

यावेळी जालना जिल्ह्यातील सर्व पात्र महिला लाभार्थींची जास्तीत जास्त नोंदणी व्हावी यासाठी नारीशक्ती अॅपमध्ये नोंदणी कशी करावी, याबाबतचे प्रशिक्षण पार पडले. तसेच अंगणवाडी सेविका, नगरपालिका कर्मचारी यांना अर्ज प्रक्रियेबाबत  जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) कार्यालयाकडून प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

                                                             -*-*-*-*-

Thursday, 11 July 2024

खरीप हंगाम-2024; अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकस्पर्धा शेतकऱ्यांना स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

 


जालना, दि. 11 (जिमाका) :- राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अ‌द्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल. हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादन तंत्रज्ञानात वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीतजास्त शेतकरी पिक स्पर्धामध्ये सहभागी होतील या दृष्टीकोनातून शासन निर्णय क्र. पीकस्पर्धा -2020/प्र.क्र.113/4अे. दि. 20 जुलै 2023 अन्वये खरीप हंगाम 2024 पासून पिकस्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येणार आहे. त्यानुसार कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन 2024 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल, मुग व उडीद या पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

 पीकस्पर्धेतील पीके -: खरीप पीके- भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल, मुग व उडीद.

 पात्रता निकषः- स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असावी व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान 40 आर क्षेत्रावर सलग  लागवड असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे - विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ),  ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन,  7/12, 8-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत,

  अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीखः- 4 खरीप हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख पुढील प्रमाणे राहिल. मुग व उडीद 31 जुलै.  भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल 31 ऑगस्ट.  अर्ज दाखल करण्याच्या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्यात यावी.

तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकाल – प्रथम, व्दितीय व तृत्तीय क्रमांकाचे पिकस्पर्धा  विजेते निवडण्यात येतील.

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क :-पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु. 300/- राहील व आदिवासी गटासाठी रक्कम रु. 150/- राहील.

बक्षिसाचे स्वरुप :-  तालुका पातळीवर प्रथम बक्षिस रु. 5000/- व्दितीय रु. 3000/-, तृत्तीय रु. 2000/-. जिल्हा पातळीवर प्रथम बक्षिस रु. 10000/- व्दितीय रु. 7000/-, तृत्तीय रु. 5000/-. राज्य पातळीवर प्रथम बक्षिस रु. 50000/- व्दितीय रु. 40000/-, तृत्तीय रु. 30000/-.

दुय्यम तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ होणे आवश्यक आहे. ही बाब विचारात घेऊन पिकस्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, संकेतस्थळ-www.krishi.maharashtra.gov.in किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा,  असे आवाहन  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जी. आर. कापसे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

-*-*-*-*-*-

राष्ट्रीय लोकअदालतचे 27 जुलै रोजी आयोजन

 

                           

जालना, दि. 11 (जिमाका)- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित मोटार वाहन अपघात कायद्या अंतर्गत नुकसान भरपाईचे प्रकरणे, प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कलम 138, एन.आय. अॅक्टची प्रकरणे, बँकेची वसुली प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, मजुरी संबंधीचे वादाची प्रकरणे, भुसंपादनाची प्रकरणे,  इलेक्ट्रीसीटी, पाणी बिल, महसुलची प्रकरणं व इतर प्रकरणे तसेच दावा दाखलपूर्व प्रकरणं इत्यादी प्रकरणांसाठी दिनांक 27 जुलै 2024 रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व संबंधीतांनी या संधीचा लाभ घेवून आपली प्रकरणं लोकअदालत मध्ये ठेवावीत व तडजोडीने मिटवावीत,  असे आवाहन सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण प्रणिता पी. भारसाकडे-वाघ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

नारी शक्ती दूत ॲपवरून भरता येणार ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ चा अर्ज

 


            मुंबई, दि.  ११:- राज्य शासनाने मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा अर्ज ‘नारी शक्ती दूत’ या ॲपवरूनही भरता येणार आहेत.

            मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभासाठी पात्र महिलांनी गुगल प्ले स्टोअरवरून नारी शक्ती दूत ॲप डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे. अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, समूह संसाधन व्यक्ती, आशा सेविका, लाभार्थी महिलांना हे ॲप डाऊनलोड करून घेता येईल. अर्जासमवेत भरावयाची माहिती कागदपत्रे अशी : आधार कार्डची प्रत (दोन्ही बाजूने), महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, तर त्याऐवजी त्या महिलेचे १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, १५ वर्षांपूर्वीचे मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व जन्मदाखला यापैकी कोणतेही एक ओळखपत्र/प्रमाणपत्र सादर करावे. परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक सादर करावे.

            उत्पन्न प्रमाणपत्र (वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखांपर्यंत असणे अनिवार्य आहे.) मात्र, पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट मिळणार आहे. त्यासाठी  रेशनकार्डच्या पहिल्या व शेवटच्या पानाची एका पानावर प्रत घेऊन ती अपलोड करावी. बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत अनिवार्य नाही. मात्र, असल्यास अपलोड करावी.

            अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, समूह संसाधन व्यक्ती, आशा सेविकांनी करावयाची कार्यवाही : अर्जदाराने सर्व माहिती अचूक भरल्याबाबतची खातरजमा करावी, अर्जदार महिलेचा बँक तपशील व त्यासंबंधीची कागदपत्रे तपासून घ्यावीत. बँक खाते आधार संलग्न आहे किंवा कसे याची नोंद घ्यावी. नसल्यास आधार संलग्न करण्याबाबत संबंधित महिलेला माहिती द्यावी. अर्जदारास इतर आवश्यक ते सहकार्य करावे. आवश्यकतेनुसार अर्जदाराकडून त्रुटी पूर्तता करून घ्यावी. तालुकास्तरीय समितीने तयार केलेल्या तात्पुरत्या यादीबाबत आक्षेप आल्यास आक्षेप एकत्रित करून तालुका समितीकडे सुपूर्द करावेत. तालुका समितीच्या सूचनानुसा कार्यवाही करावी.

            तालुकास्तरीय समितीने करावयाची कार्यवाही : क्षेत्राची माहिती संकलित करणे, क्षेत्रीय यंत्रणांना मार्गदर्शन करणे, लाभार्थी महिलांची गावनिहाय तात्पुरती यादी तयार करून प्रसिद्ध करणे, वेळोवेळी बैठका घेणे, प्राप्त आक्षेप, त्रुटींची पूर्ततेची यादी पडताळणी करून तात्पुरती सुधारित पात्र, अपात्रतेची यादी जिल्हा समितीकडे सादर करणे.

            जिल्हास्तरीय समितीने करावयाची कार्यवाही : प्राप्त झालेल्या यादीची तपासणी करून अंतिम यादी तयार करणे, योजना अंमलबजावणी आढावा घेणे, प्रचार- प्रसिद्धी करणे, योजनेसाठी लागणाऱ्या निधीची मागणी व मार्गदर्शक सूचनेनुसार अन्य कार्यवाही करणे.

            राज्यस्तरीय समितीने करावयाची कार्यवाही : मार्गदर्शक सूचनेनुसार ‘मुख्यमंत्री  माझी लाडकी बहीण’ कक्ष व कॉल सेंटर कार्यान्वित करणे, योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे, योजनेसाठी लागणाऱ्या निधीची शासनाकडे आवश्यकतेनुसार मागणी व मार्गदर्शक सूचनेनुसार अन्य कार्यवाही करणे असे कामकाज आहे.

-*-*-*-*-*-