Tuesday, 28 February 2023

महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू

 


जालना, दि.28 (जिमाका) :- जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या परीक्षा दि. 21 फेब्रुवारी 2023 पासून सुरु झाल्या आहेत तर  दि. 2 मार्चपासून  इयत्ता  दहावीच्या परीक्षा सुरु होणार आहेत. तसेच दि. 6 व  7 मार्च रोजी होळी व धुलिवंदन, 10 मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती आणि दि.11 मार्च रोजी संकष्ट चतुर्थी असल्याने  विविध मिरवणुका व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. तरी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये प्रतिबंध करण्यात आलेला आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी निर्गमित केले आहेत.

इयत्ता बारावीच्या परीक्षा दि. 21 फेब्रुवारी 2023 पासून सुरु झाल्या आहेत तर  दि. 2 मार्चपासून  इयत्ता  दहावीच्या परीक्षा सुरु होणार आहेत. तसेच दि. 6 व  7 मार्च रोजी होळी व धुलीवंदन उत्सव साजरा होणार असल्याने मिरवणुका व विविध कार्यक्रम होणार आहेत. आणि दि.10 मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती आहे. तरी या  सण,  उत्सवाच्या अनुषंगाने मिरवणुका व विविध कार्यक्रम होणार आहे. संकष्ट चतुर्थी दि.11 मार्च रोजी असल्याने राजूर, माळाचा गणपती व मावा पाटोदा येथे गणपती मंदिर असल्याने भाविकांची सदर ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी व शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी विविध संघटनांकडून आत्मदहन, उपोषण, धरणे, सध्या महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या सत्ताधारी व विरोधकात एकमेकांविरुध्द विविध कारणावरून आरोप प्रत्यारोप मोर्चे, निदर्शने, रास्तारोको इत्यादी सर्व प्रकारची आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे  महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये अधिकाराचा वापर करुन पुढीलप्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.  

शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी, भाले, चाकू व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणाऱ्या वस्तु जवळ बाळगणार नाही.  तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणूनबुजून दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही आणि गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप, विडंबनापर नकला करणार नाही आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजक माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणापत्रे किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही. हा आदेश संपूर्ण जिल्ह्यासाठी दि. 1 मार्च 2023 रोजीचे 6 वाजेपासून ते दि. 15 मार्च रोजीचे 24 वाजेपर्यंत अंमलात राहील. असे आदेशात नमुद करण्यात आलेले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment