Friday, 18 January 2019

कल्याणी नदीच्या पुनर्जिवनामुळे तीन हजार एकर शेतजमीन ओलिताखाली येणार - राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर


जालना, दि. 18 –  कल्याणी नदीच्या पुनर्जिवनामुळे पाणी साठवण क्षमता निर्माण होऊन जवळपास तीन हजार एकर शेतजमीन ओलिताखाली येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास, मस्त्यव्यवाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केले.
          जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निरखेडा गावात असलेल्या कल्याण नदीच्या खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ राज्यमंत्री श्री खोतकर  यांच्या हस्ते आज दि. 18 जानेवारी रोजी करण्यात आला.  त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
          यावेळी  पंचायत समिती चे सभापती पांडूरंग डोंगरे, पंडीत भुतेकर, संतोष मोहिते, जिल्हा खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष भाऊसाहेब घुगे, हरीहर शिंदे,  तहसीलदार बिपीन पाटील, ‍                   श्री  सुखदिवे, कृष्णा लक्ष्मण सुराशे रामेश्वर भाऊ गोरे, रामेश्वर गोविद पुरी,  अरुण डोंगरे, नरसिंग गोरे, विठ्ठल सोळंके, बंडु भुतेकर, नारायण गायकवाड भागवत काळे, तुकाराम शेजुळ, मुरलीधर शेजुळ, शिवाजी शेजुळ, काशिनाथ जाधव, बापुराव जाधव, विष्णु गोरे, अंकुश जाधव, अरुण डोंगरे, मुरलीधर थेटे, गणेश बापु गोरे उप विभागीय अभियंता ए.पी. काटकर, शाखा अभियंता डी.पी. राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
          राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले की, कल्याणी नदीचे पुनर्जिवन करण्याची गावकऱ्यांची बऱ्याच दिवसांची मागणी होती. ती आज या निमित्ताने पुर्ण होत आहे.  या नदीच्या पुनर्जिवनाचे काम यापूर्वीच होणे अपेक्षित होते परंतू काही अडचणींमुळे हे काम होऊ शकले नाही.  हे काम व्हावे यासाठी आपण प्रशासनाकडे सातत्याने बैठका घेऊन काम मार्गी लावण्याच्या प्रशासनास सुचना दिल्या होत्या.  त्यानुसार कल्याणी नदीच्या पुनर्जिवनासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असुन अडीच कोटी रुपंयाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.  सिद्धीविनायकसारख्या ट्रस्टच्या माध्यमातुनही या कामांसाठी अधिकचा निधी आणण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे राज्यमंत्री श्री खोतकर यांनी यावेळी सांगितले.
          कल्याणी नदीवर 34 बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात येणार असुन यासाठी जवळपास साडेअकरा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. कल्याणी नदीच्या पुनर्जिवना चे काम पुर्ण झाल्यानंतर पाणी साठवण क्षमता वाढुन परिसरातील तीन हजार एकरपेक्षा अधिक जमीन ओलिताखाली येण्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच  या भागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार असल्याचेही राज्यमंत्री              श्री खोतकर यांनी यावेळी सांगितले.
          कल्याणी नदीच्या पुनर्जिवनामुळे मोठ्या प्रमाणात गाळाचा उपसा होणार आहे.  हा गाळ शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असुन शेतकऱ्यांनी हा गाळ आपल्या शेतीमध्ये टाकावा जेणेकरुन उत्पादनात वाढ होण्यास मोठी मदत होणार असल्याचे सांगत कडवंची या गावाने उपलब्ध पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करुन द्राक्ष पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. या पिकातुन शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात उत्पादन होत असल्याने या भागातील शेतकऱ्यांनीही द्राक्ष पीक लागवडीकडे वळण्याची गरज आहे.  पाणी साठे निर्मितीवर भर देऊन प्रत्येक शेतकऱ्यांने पाण्याची बँक तयार करण्याची गरज असल्याचेही राज्यमंत्री श्री खोतकर यांनी यावेळी सांगितले.
          पशुपालनाविषयी जनजागृती व्हावी आणि पशुपालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी  जालना येथे 2 ते 4 फेब्रुवारीला अखिल भारतीय स्तरावरील भव्य पशु- पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे असुन या प्रदर्शनामध्ये आपल्या राज्यातील तसेच अन्य राज्यातील उत्तमोत्तम आणि जास्त दुध देणाऱ्या जातीच्या गायी व म्हशी तसेच शेती व ओढ कामासाठी अतिशय चांगली व उपयुक्त असलेले बैल, विविध जातींचे अश्व, वेगवेगळ्या जातींच्या वेगवेगळ्या राज्यातील शेळ्या व मेढ्या, परस कुक्कुट पालन व व्यावसायिक कुक्कुट पालन यासाठी उपयुक्त असलेल्या वेगवेगळ्या जातींच्या कोंबड्या, व्यावसायिक वराह पालनासाठी उपयुकत्‍ असलेले विदेशी व संकरीत जातींचे वराह, वेगवेगळ्या जातींचे कुत्रे अशा सर्व प्रकारच्या पशुधनाचा प्रदर्शनामध्ये सहभागी होणार आहे. जातिवंत घोड्या पासून ते सश्यापर्यंत सर्व पशुधन या प्रदर्शनात असणार आहेत. सुलतान , युवराज यासारख्या कोटी कोटी रुपये किंमतीच्या रेड्यांचा सहभाग हे विशेष आकर्षण असणार आहे.  तसेच 20 ते 22 फेब्रुवारी दरम्यान जालना येथे भीम महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले असुन या दोनही कार्यक्रमास नागरिकांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही राज्यमंत्री श्री खोतकर यांनी यावेळी केले .
          इंदेवाडी येथील 9 लाख रुपये किंमतीच्या सभामंडपाचे भूमिपुजनही राज्यमंत्री श्री खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले.
          यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनीही मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाचे सुत्र संचलन भगवान काळे यांनी केले तर आभार भरत जाधव यांनी मानले.
          कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******  



No comments:

Post a Comment