Friday, 23 December 2016

शेतकऱ्यांनी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज - पालकमंत्री बबनराव लोणीकर



जालना, दि. 23 – राज्याच्या अर्थसंकल्पात शेतीविकासासाठी शासनाने 25 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून शासन शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेकविध योजना राबवित असून शेतकऱ्यांनी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
            कृषि उत्पन्न बाजार समिती, मंठा येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.
            यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष कैलासबापू बोराडे, कल्याणबापू खरात, गोपाळराव बोराडे, भाऊसाहेब कदम, मदनलाल शिंगे, गणेशराव खवणे, राजेश मोरे, दारासिंग चव्हाण, अशोक वायाळ, महादेव बाहेकर, सोपानराव खारवणे, पंजाब पुणेकर, राजेभाऊ बोंगाडे, बी.डी. पवार, अंकुशअप्पा बोराडे, बाळासाहेब मोरे, पंबाजराव केंधळे, अंकुश कदम, अंकुशराव अवचार, बाबुराव शहाणे, प्रदीप बोराडे, पंबाजराव बोराडे, शंतनु काकडे, अच्युत डोईफोडे, काशिनाथ बोराडे, गणेश बोराडे, सतीष निर्वळ, राधाकिसन बोराडे, नारायणदवणे, संजय सरवदे, संभाजी खंदारे, बालाजी मोरे, सोनाजीराव बोराडे, कल्याणराव खरात, संजय गायकवाड, समाजभुषण गायकवाड, माऊली शेजुळ, शिवाजी आबा खंदारे, विष्णुपंत खोडके, अनुसयाबाई राठोड, तहसिलदार रवींद्र राठोड, कृषी विद्यापीठ परभणी बी.डी. पवार, महाबीजचे व्यवस्थापक जे.आर. खोकड आदींची उपस्थिती होती.
            यावेळी पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात बदलत्या हवामानानुसार शेती करण्याची गरज आहे. कृषिक्षेत्रामध्ये नवनवीन संशोधने होत आहेत. कमी पाण्यावर व कमी वेळात अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांची तसेच देशी वाणांच्या निर्मितीवर भर देण्यात येत आहे.  कृषि विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी ही माहिती जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन द्यावी.  जेणेकरुन शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये मुबलक प्रमाणात उत्पन्न होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. 
            शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक व शाश्वत पाणी, वीज देण्यासाठी  प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगत  राज्य शासनाच्या शेतकऱ्यांसाठी अनेकविध येाजना आहेत.  या योजना प्रत्येक गावापर्यंत पोहोचून त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            शेतीला शाश्वत व मुबलक प्रमाणात पाणी मिळण्यासाठी जलयुक्त शिवार ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. गेल्या दोन वर्षापासून राज्यासह जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली असून जालना जिल्ह्यात 60 कोटी रुपये खर्चून नद्यांचे खोलीकरण, रुंदीकरण, गाळ काढणे, नालाबंडीग यासारख्या कामांबरोबरच 500 बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाऱ्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा संचय झाला आहे.   जलयुक्त शिवार अभियानाची कामे अधिक गतीने व्हावीत यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून 13 पोकलॅन मशिन्स खरेदी करण्यात आल्या आहे.  या मशिन्समुळे वर्षभर प्रत्येक गावात समानरितीने काम करणे शक्य होणार असल्याचे सांगून नागरिकांनीही लोकसभागातून अशा प्रकारची कामे हाती घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
            पंतप्रधान सिचाई योजनेमध्ये लोअर दुधना प्रकल्पाचा समावेश व्हावा यासाठी आपण व्यक्तीश मंत्रालयीन स्तरावर प्रयत्न केल्याने मराठवाड्यातील केवळ लोअर दुधनाचा या योजनेत समावेश करण्यात आला.  या योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून 605 कोटी रुपंयाचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यापैकी 452 कोटी रुपये प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.  या निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमीनीचा मावेजा देण्याबरोबरच अनेकविध विकास कामे करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
       मराठवाडयातील 40 हजार लोकांना रोजगार मिळवून देण्याबरोबर शेतकऱ्यांच्या विकासात भर घालणारा सीडपार्क जालना येथे उभारण्यासाठी मंत्रीमंडळाने औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत नुकतीच मंजुरी दिली आहे.  या सीडपार्कच्या माध्यमातून वर्षाला 600 कोटी रुपयांची उलाढाल होणार असून याचा फायदा बि-बियाणे कंपन्यांसह बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.  त्याचबरोबर शेतकरी तसेच गोरगरीब व सर्वसामान्यांच्या पाल्यांना उच्चशिक्षण मिळावे यासाठी जालना परिसरात 200 एकरवर रसायन तंत्रज्ञान संस्थेचे उपकेंद्रासही मंजुरी दिली असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी गोपाळराव बोराडे, तालुका कृषि अधिकारी श्री आमळे, सहाय्यक उपनिबंधक श्रीमती शहा यांचीही समयोचित भाषणे झाली.
            मंठा जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेकविध उपक्रम राबवून त्यांना दिलासा देण्याचे काम केल्याबद्दल संस्थेचा पालकमंत्री महोदयांनी गौरवही केला.             कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार तसेच दीपप्रज्वलनाने करण्यात आली.  यावेळी मार्केट कमेटीच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या भुईकाटा व धान्यचाळणी यंत्राचे उदघाटनही मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्यास पदाधिकारी, अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***-***




No comments:

Post a Comment