Saturday, 17 August 2024

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यावर नियमितपणे जमा होणार रक्कम रक्षाबंधनानिमित्त बहिणींना मिळाली उत्कृष्ट भेट -- पालकमंत्री अतुल सावे मुख्यमंत्री –माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न

 
















 

जालना, दि. 17 (जिमाका) :- महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी  शासनाने मुख्यमंत्री –माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून जालना जिल्हयातील पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने शासनाकडून महिलांना मिळालेली ही उत्कृष्ट भेट आहे. यापुढेही नियमितपणे या योजनेच्या माध्यमातून महिलांना रक्कम मिळणार आहे, त्यामुळे महिलांनी अजिबात काळजी करु नये, अशी ग्वाही राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.

मुख्यमंत्री –माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे येथे आज पार पडला. या निमित्ताने या कार्यक्रमाचे थेट प्रसारण आणि लाभार्थी महिला, उत्कृष्ट काम करणाऱ्या पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांचा सत्कार समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री बोलत होते.

कार्यक्रमास  आमदार नारायण कुचे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, जालना महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नवनाथ वामन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास ) कोमल कोरे आदींसह पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आणि लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

            पालकमंत्री श्री. सावे म्हणाले की, जालना जिल्हयात मुख्यमंत्री –माझी लाडकी बहीण योजनेची जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेसह सर्व संबंधित विभागंनी अतिशय प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यामुळे  ही योजना यशस्वी झाली आहे. अगदी कमी कालावधीत सर्व आव्हानांवर मात करीत समन्वय व सकारात्मकतेमुळे आपला जिल्हा ही योजना प्रभावीपणे राबवू शकला. या योजनेमुळे सर्वसामान्य महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

            आमदार श्री. कुचे यांनी  मुख्यमंत्री –माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मुख्यमंत्री यांचे आभार मानले. सर्वसामान्य महिलांना अर्थिक सक्षम करणारी ही योजना असल्याचे त्यांनी सांगितले.

            जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी जालना जिल्हयात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी करण्यात आलेल्या कार्याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, समाज आणि देशाची प्रगती ही  महिलांवरच अवलंबून असते. मुख्यमंत्री –माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला अर्थिकदृष्टया सक्षम होण्यास मदत होणार आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी  सर्वांनी चांगले सहकार्य केले.

            मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, मुख्यमंत्री –माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना रक्षाबंधनाची एक चांगली भेट मिळाली आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे.

            यावेळी काही लाभार्थी महिलांनी प्रातिनिधीक स्वरुपात आपले मनोगत व्यक्त केले. गोंदेगाव येथील मीरा वाघ म्हणाल्या की, शासनाचे आम्ही खूप आभारी आहोत. मुख्यमंत्री –माझी लाडकी बहीण योजना ही खूप चांगली योजना आहे. रक्षाबंधनाची आम्हाला चांगली ओवळणी मिळाली आहे. तर नंदा खंदारे म्हणाल्या की, या योजनेमुळे आम्हाला खूप आनंद झाला. मुख्यमंत्री दादा आम्ही तुमचे आभारी आहोत. स्वप्नातसुध्दा आम्हाला वाटले नाही की, अशा योजनेतून चांगला आर्थिक लाभ मिळेल.

            प्रास्ताविक श्री. वामन यांनी केले. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थी महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. योजनेच्या यशस्वी अंमलबजवणीबद्दल उत्कृष्ट काम करणाऱ्या पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांचाही गौरव करण्यात आला.

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांनी मानले मुख्यमंत्री यांचे आभार बहिणींच्या खात्यावर जमा झाले 3 हजार रुपये रक्षाबंधनाची मिळाली ओवळणी

 










  जालना, दि. 17 (जिमाका) :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत माझ्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले. रक्षाबंधना आधीच मुख्यमंत्री भावाकडून ओवाळणी मिळाली, त्यांच्यासाठी मी राखी घेवून आले आहे. त्यांच्या सहकार्याने आमचा आनंद गगनात मावेना.  शेतात, वाडी, वस्त्यांवर सगळीकडे साऱ्या महिलांच्या तोंडात फक्त मुख्यमंत्री दादांचे नाव आहे, असे उदगार गोंदेगाव येथील नंदा अशोक खंदारे यांनी काढले.

जालना जिल्ह्यात मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या बॅंक खात्यात जुलै व ऑगस्ट महिन्यांचे तीन हजार रुपये दोन दिवसांपासूनच जमा होत होते. पैसे जमा झाल्याचे संदेश मोबाईलवर पाहुन महिलांच्या आनंदाला पारावार उरला नाही. यानिमित्ताने जालना जिल्ह्यातील लाभार्थी महिलांशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया अत्यंत बोलक्या होत्या. जिल्हयातील वर्षा कपिल करपे (मोदीखाना जालना), ज्योती विजय दळवी (कन्हैय्यानगर जालना), सविता कुऱ्हाडे (काजळा),  मंगल बाबुराव भिंगारे (दाढेगाव ता.अंबड), मंगल रामभाऊ बोडखे (चुरमापुरी ता.अंबड), उषा सुधाकर मोरे (शिवनगाव ता.घनसावंगी), प्रतिभा किशोर आपार (नुतन वसाहत जालना), मिरा गजानन वाघ (गोंदेगाव), नंदा अशोक खंदारे (गोंदेगाव) या काही बहिणींचे मनोगत जाणून घेतले असता, त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

आमची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने माझ्या घर खर्चासाठी  हे तीन हजार रुपये खूप उपयोगी पडणार आहेत. तसेच एका महिलेने माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी व व्यवसायासाठी या पैशाचा उपयोग करणार असल्याची भावनाही बोलून दाखविली. आपल्या भावाने पाठवलेली ही रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून हा पैसा निव्वळ योजनेचा लाभ न राहता त्याला एक वेगळे भावनिक परिमाण लाभले आहे, असे या बहिणींच्या मनोगतातून स्पष्ट होते. कुणाला आपल्या संसाराला हातभार लाभल्याचे अप्रुप होते तर कुणाला आपल्या हक्काचे पैसे मिळाल्याचा आनंद होता. भावाने दिलेला शब्द पाळला अशीही भावना व्यक्त करत पदोपदी आभार व धन्यवाद हे वाक्य प्रत्येक महिलेच्या तोंडून ऐकावयास मिळाले. एकंदर महिलांच्या जीवनात या योजनेमुळे बदल होऊन त्यांच्यात आत्मविश्वास बळावलेला दिसला. आपल्याला हक्काचे पैसे मिळाल्याचा आनंद या महिलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

-*-*-*-*-

Thursday, 15 August 2024

सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करणारा महसूल हा महत्त्वाचा विभाग -- पालकमंत्री अतुल सावे महसूल पंधरवडा सांगता समारोह संपन्न

 









जालना, दि. 15 (जिमाका) :- महसूल विभाग शासनाच्या विविध योजना, उपक्रम प्रभावीपणे राबविते. जालना महसूल प्रशासनाने मागील वर्षात व महसूल पंधरवडयात अतिशय उत्तम काम केले आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करणारा महसूल हा महत्त्वाचा विभाग आहे. महसूल पंधरवाड्यात शासनाचे विविध उपक्रम यशस्वीपण राबविल्याबद्दल अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.

महसूल पंधरवडा सांगता समारोह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात आज आयोजित करण्यात आला होतो. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, नम्रता चाटे, मनिषा दांडगे, सरिता सुत्रावे आदींसह महसूल विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सावे म्हणाले की, महसूल दिन दरवर्षी 1 ऑगस्टला साजरा केला जातो. यानिमित्ताने शासनाने सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाच्या माध्यमातून विविध सेवांचा लाभ मिळावा म्हणून या वर्षी महसूल पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला. या पंधरवाड्यात जालना महसूल विभागाने अतिशय छान काम केले. या काळात शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना जसे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना घराघरात पोहोचविल्या. अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले. सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वय व एकजुटीने काम केले. याबद्दल आपले अभिनंदन. तसेच अनेक आव्हानात्मक काम करत असताना महसूल विभागाला पोलीस प्रशासनाचीही नेहमीच चांगली साथ मिळते. याबद्दल पोलीस प्रशासनाचेही अभिनंदन. यापुढेही या विभागांनी उत्तम काम करत राहावे व जनतेला तत्परतेन चांगली सेवा द्यावी.

जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. या विभागामार्फत जनतेला अनेक सेवा दिल्या जातात. वर्षभरात या विभागाने शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना, उपक्रम यशस्वीपणे राबविले. महसूल पंधरवाड्यात जिल्ह्यात शिबीर व मोहिमेच्या माध्यमातून लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची जिल्हयात यशस्वीपण अंमलबजावणी करण्यात आली आहे. इतर योजनाही प्रभावीपणे राबविण्यात महसूल विभाग आघाडीवर आहे. वर्षभरात अनेक आव्हानांवरही यशस्वीपणे मात करण्यात आली. सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये चांगला समन्वय व कामाची प्रति सकारात्मक भाव असल्यामुळे कामे जलदगतीने करण्यात आली. भविष्यातही महसूल विभाग अधिकपणे चांगले काम करीत राहील.

            मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना म्हणाल्या की, सर्व विभागाशी समन्वयाने काम करणारा महसूल हा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामे केली जातात. इतर विभागांनाही सहकार्य करणारा हा महत्त्वपूर्ण विभाग आहे.

            प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी श्री. वायाळ यांनी महसूल पंधरवड्यात आणि  वर्षभरात महसूल विभागाने केलेली लोकोपयोगी कामांची माहिती दिली. जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटणारा महसूल हा प्रशासनाचा महत्त्वाचा विभाग आहे. शासनाच्या अनेक महत्त्वपूर्ण योजनांची या विभागाचे अधिकारी-कर्मचारी यशस्वीपणे अमंलबजवणी करतात, असे त्यांनी सांगितले.

            यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतंर्गत विविध विभागात नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात नियुक्तीपत्र देण्यात आले. तलाठी व कोतवाल पदभरतीत निवड झालेल्या कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात गौरव करण्यात आला. समृध्दी महामार्ग भूसंपादनपोटी संबंधित व्यक्तींना धनादेशाचे वाटप करण्यात आले.

***

 

Tuesday, 13 August 2024

भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

 



 

जालना, दि. 13 (जिमाका) :- भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री अतुल मोरेश्वर सावे यांच्या हस्ते गुरुवार, दि.15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. या प्रसंगी सर्वांनी राष्ट्रीय पोशाखात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

-*-*-*-*-

"मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण योजना” बँक खाते आधार सिडींग करण्याचे आवाहन

 


 

जालना, दि. 13 (जिमाका) - जालना जिल्ह्यातील "मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण" योजनेकरीता अर्ज केलेल्या सर्व लाभार्थीना जाहिर आवाहन करण्यात येते की, आपण अर्जात नमूद केलेले बँक खाते हे आधार सिडेड (Adhar Seeding) आहे की नाही, याची खात्री करुन घ्यावी. बँक खात्याला आधार सिडींग केलेले नसल्यास तात्काळ आपले खाते ज्या बँकेत आहे अशा बँकेत जाऊन आधार सिडींग करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

डिबीटीद्वारे थेट लाभ हस्तांतरणासाठी सदरची बाब अनिवार्य आहे. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची मुदत आहे. 31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज केला तरी सर्व पात्र लाभार्थीना जुलै -2024 पासून दरमहा 1500/- रुपये लाभ मिळणार आहे.

1 जुलै ते 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थीना 17 ऑगस्ट रोजी थेट डिबीटीद्वारे त्यांच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट असे दोन महिन्यांचा लाभ जमा होणार आहे. 1 ऑगस्ट ते 31ऑगस्ट दरम्यान प्राप्त अर्जाची छाननी होऊन सप्टेंबर 2024 अखेर पर्यंत पात्र लाभार्थीना योजनेचा लाभ देण्यात येईल.

-*-*-*-*-*-*-

"मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण योजना” त्रुटींची पुर्तता करुन अर्ज पुन्हा दाखल करण्याचे संबंधितांना आवाहन

 



 

जालना, दि. 13 (जिमाका) – मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजनेतंर्गत नारीशक्ती दूत या मोबाईल अॅपवरुन ज्यांनी स्वतःचे वा अन्य लाभार्थीचे अर्ज केले असतील अशा सर्व महिला, समूह संसाधन व्यक्ती, बचतगट अध्यक्ष,  बचतगट सचिव, गृहिणी, अंगणवाडी सेविका / मदतनीस, ग्रामसेवक, वॉर्ड अधिकारी, सेतू, बालवाडी सेविका, आशा सेविका, पर्यवेक्षिका (मुख्यसेविका), सीएमएम, मदतकक्ष प्रमुख यांना आवाहन करण्यात येते की, नारीशक्ती दूत अॅपमधील आपल्या प्रोफाईलला लॉगीन करून यापूर्वी केलेले अर्ज या टॅबवर क्लिक करून आपल्याद्वारे सबमिट केलेले संपूर्ण अर्जाची यादी पाहू शकता. त्यामुळे त्यामुळे पात्र (Approved)/अंशत: रद्द (Disapproved), प्रलंबित (Pending), रद्द (Rejected) असे शेरे आणि लाभार्थीचे नाव, मोबाईल नंबर सुध्दा आपल्याला पाहता येतील.

सर्व संबंधीतांनी अंशत: रद्द (Disapproved) असलेले सर्व लाभार्थीना संपर्क करून अंशतः अर्ज रद्द होण्याचे कारण  व्हियु रीजन (View Reason) हे टॅबवर बघून त्याप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करून एडिट फॉर्म (Edit Form) हे टॅबवर जाऊन यापूर्वी केलेल्या नोंदी चुकीच्या असतील तर त्या दुरुस्त करून फॉर्म सबमिट (Form Submit) करावा. यामध्ये फक्त फॉर्म एकदाच दुरुस्त (Edit) करता येईल, याची नोंद घ्यावी. दि. 13 ऑगस्ट 2024 पर्यंत जालना जिल्हयातील 12 हजार इतके अंशत: रद्द (Disapproved) केलेल अर्ज त्रुटींची पूर्तता करुन ऑनलाईन रीसबमिट करणे प्रलंबित आहेत. तरी सर्वांनी तातडीने योग्य त्या दुरुस्त्या करून अंशत: रद्द (Disapproved) अर्ज  रीसबमिट (Resubmit) करावे, जेणे करून त्यांची पडताळणी करून पात्र लाभार्थींना तातडीने लाभ देणे सोईचे होईल व कोणताही पात्र लाभार्थी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी संबंधितांना केले आहे.

-*-*-*-*-*-*-

 

Monday, 12 August 2024

महसूल पंधरवाडानिमित्त आपत्ती व्यवस्‍थापन मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न आपत्ती काळात दक्षता घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

 







 

            जालना, दि. 12 (जिमाका) :- महसूल विभागामार्फत महसूल दिनापासून महसूल पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने सर्व विभागप्रमुख तसेच कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज आपत्ती व्यवस्‍थापन मार्गदर्शन व रंगीत तालीम कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत तज्ञांनी मार्गदर्शन केले.           

कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उपजिल्हाधिकारी सरिता सुत्रावे, उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मनोज काजळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

             जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आपत्तीविषयक समस्यांवर कशा पध्दतीने मात करावी याबाबत रंगीत तालीम पार पडली. यावेळी स्वत: जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी तज्ञांकडून विविध उपकरणांची माहिती जाणून घेत उपस्थितांना आपत्ती काळात दक्षता घेण्याबाबत सूचना केली.

आपत्ती व्यवस्‍थापन मार्गदर्शन कार्यक्रमात मार्गदर्शकांनी जिल्ह्यात अचानक उदभवलेल्या पूर परिस्थितीत काय करावे, काय करु नये तसेच यात्रा व गर्दीच्या ठिकाणी घ्यावयाची काळजी घ्यावी याची माहिती दिली. तसेच आग लागू नये म्हणून काय करावे, आग लागल्यास काय करावे आणि आगीनंतर काय करावे याची माहिती दिली. पावसाळ्यात अचानक पडणाऱ्या विजा यावर प्रतिबंध, यामध्ये आकाशात विजा चमकत असल्यास विजेपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी घ्यावयाची दक्षता काय घ्यावी. तसेच विजा कोसळताना काय काय कारावे, काय करु नये यासह सर्पदंशावर उपचार या विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

आगीपासून बचाव करण्याबाबत मार्गदर्शन महापालिकेचे अग्नीशमन अधिकारी माधव पानपट्टे यांनी केले. दुसऱ्या सत्रात  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आगीपासून सुरक्षीततेसाठी  रंगीत तालीम आणि आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव साहित्याचे प्रदर्शनही भरवण्यात आले. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष 1077, रुग्णवाहिका 108/102,  पोलिस नियंत्रण कक्ष 100 आणि अग्निशामक दल 101 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.  

                                                                  -*-*-*-*-

मॅरेथॉन स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते गौरव

 


 

            जालना, दि. 12 (जिमाका) :- राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा प्रशासन व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत महा मॅरेथॉन -2024 एक धाव सुरक्षेची या 2 कि.मी. मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होवून प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचे मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि मेडल देवून गौरव केला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उपजिल्हाधिकारी श्रीमती सविता चौधर, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, उपजिल्हाधिकारी सरिता सुत्रावे, क्रीडा अधिकारी आरती चिल्लारे, क्रीडा संघटक पी.जे.चाँद, विज गाडेकर  यांची प्रमुख उपस्थिती होती.

मॅरेथॉन स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम नितीन दिलीप पवार तर द्वितीय आकाश रामेश्वर राठोड आणि तृतीय क्रमांक मोहित चरणसिंग मेहेर यांनी पटकाविला.  मॅरेथॉन स्पर्धेत मुलींमध्ये प्रथम गिता रामेश्वर राठोड तर द्वितीय अंजली दत्ता लघुखरे आणि तृतीय क्रमांक प्रिती समाधान शिंदे यांनी पटकाविला आहे.

-*-*-*-*-

Wednesday, 7 August 2024

महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधीन करणे श्रेणीवाद व नियंत्रण) अधिनियम-2021 च्या अंमलबजावणीसाठी 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ

 

 

जालना, दि. 7 (जिमाका) -- महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम (नियमाधीन करणे श्रेणीवाद व नियंत्रण) अधिनियम, 2021 अंतर्गत महाराष्ट्र शासनाने 31 डिसेंबर 2020 पुर्वीचे अनधिकृत भूखंड / अनधिकृत भुखंडावरील बांधकाम नियमाधीन करण्यास मान्यता दिलेली आहे. जालना जिल्हयातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत हद्दीअंतर्गत क्षेत्र वगळून उर्वरित ग्रामीण भागातील दि. 31 डिसेंबर 2020 पूर्वी अस्तित्वात असलेले अनधिकृत भुखंड / अनधिकृत भुखंडावरील बांधकाम नियमान्वित करण्यासाठी सहायक संचालक, नगर रचना, जालना यांच्याकडील नोंदणीकृत परवानाधारक आर्किटेक्ट इंजिनियर यांचेमार्फत प्रस्ताव दाखल करण्यासाठी दिनांक 30 जून, 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

 

या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जालना जिल्हयातील नागरीकांना आवाहन केले की, जालना जिल्हयातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत हद्दीअंतर्गत क्षेत्र वगळून उर्वरित ग्रामीण भागातील दिनांक 31 डिसेंबर 2020 पूर्वी अस्तित्वात असलेले अनधिकृत भूखंड / अनधिकृत भुखंडावरील बांधकाम नियमान्वित करण्यासाठी दि. 30 जून, 2025 पुर्वी विहीत कागदपत्रासह प्रस्ताव गुंठेवारी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे दाखल करावेत. तसेच उपरोक्त प्रमाणे मुदतीत प्रस्ताव दाखल केले नसल्यास अशी अनधिकृत विनापरवाना बांधकामे पाडणेची कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

-*-*-*-*-

विविध आपत्तीसंदर्भात जनजागृती मॅरेथॉन रॅलीस उर्त्स्फूत प्रतिसाद

 






जालना, दि. 7 (जिमाका)-- विविध आपत्ती संदर्भात जनजागृतीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने जालना शहरातून काढण्यात आलेल्या मॅरेथॉन रॅलीस खेळाडुंचा उर्त्स्फूत प्रतिसाद लाभला. या रॅलीत विविध शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसह राष्ट्रीय कॅडेट कोअर, राष्ट्रीय सेवा योजना, होमगार्ड व स्काऊट गाईडचे विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभाग घेतला.

आज सकाळी 7.00 वाजता जालना शहरातील मंठा चौफुली येथून मॅरेथॉन रॅलीस तहसीलदार छाया पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ झाला. यावेळी क्रीडा अधिकारी डॉ. रेखा परदेशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दिपक काजळकर उपस्थित होते. प्रारंभी सर्व सहभागी विद्यार्थी, खेळाडू यांची नोंदणी करण्यात आली.  सहभागी खेळाडुंना प्रमाणपत्र, टि-शर्ट व कॅप देण्यात आली होती.

 

या मॅरेथॉन स्पर्धेत मुलांमधून जेईएस महाविद्यालयाचा नितीन दिलीप पवार याने प्रथम, क्रीडा प्रबोधिनीचा आकाश रामेश्वर राठोड याने व्दितीय आणि पार्थ सैनिकी शाळेचा मोहित चरणसिंग मेहेर या विद्यार्थ्याने तृत्तीय क्रमांक मिळवला. तर मुलींमधून अंकुशराव टोपे महाविद्यालयाची गिता रामेश्वर राठोड प्रथम, जेईएस महाविद्यालयाची अंजली दत्ता लघुखरे  व्दितीय आणि अंकुशराव टोपे महाविद्यालयाची विद्यार्थीनी प्रिती समाधान शिंदे हिने तृत्तीय क्रमांक मिळवला. या सर्व विजेत्या खेळाडुंना दि. 12 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात येणार आहे.

-*-*-*-*-*-*-

दूध भेसळ रोखण्यासाठी तपासणी करण्याचे निर्देश

 


 

जालना, दि. 7 (जिमाका)—दुधातील भेसळ रोखण्यासाठी जिल्हयातील दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणारे सर्व परवानाधारक, वितरक, दुकान, स्टॉल इत्यादींना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तपासणीत भेसळ आढळल्यास कार्यवाई करण्याचे निर्देश जिल्हास्तरीय दूध भेसळ समितचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांनी दिले आहेत.

दुधातील भेसळीमुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त दर मिळत नाही. तसेच दुध भेसळीमुळे जनतेच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. राज्यातील जनतेला स्वच्छ व गुणवत्तापूर्ण दुधाचा पुरवठा होण्याच्या अनुषंगाने दूध व दुग्धजन्य पदार्थात होणारी भेसळ रोखण्यासाठी शासन निर्णयअन्वये शासनाने जिल्हास्तरावर समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हयाचे अपर जिल्हाधिकारी यांना घोषीत केले आहे. तसेच अपर पोलिस अधिक्षक जालना, सहाय्यक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन, जालना, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जालना, उपनियंत्रक वैद्यमापनशास्त्र, जालना हे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. समितीचे सदस्य सचिव म्हणून जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी हे काम पाहतात.

दूध भेसळ रोखण्याच्या अनुषंगाने जालना जिल्हयातील विविध दूध व दुग्धजन्य पदार्थ यांचे एकूण 44 नमुने घेण्यात येवुन तपासणीसाठी ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यापैकी 38 नमुने प्रमाणित आले असून 3 नमुने कमी दर्जाचे आले असल्याने दंडात्मक कारवाईसाठी वरीष्ठ कार्यालयात प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. उर्वरित 3 नमुन्याचे अहवाल प्रलंबित आहेत.

दरम्यान, दूध भेसळ रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या समितीच्या  बैठकीत दूध व दुग्धजन्य पदार्थांबाबत जिल्हयातील सर्व प्रकारच्या परवानाधारक/वितरक/दुकान/स्टॉल इत्यादी ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन भेसळीबाबत कार्यवाई करण्याचे  निर्देश समिती अध्यक्षांनी दिले आहेत.

-*-*-*-*-*-

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑगस्ट रोजी प्रतिबंधात्मक आदेश जारी

 


जालना, दि. 7 (जिमाका) -- महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024 दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी जालना शहरातील उपकेंद्रांवर सकाळी 10.00 ते 12.00 व दुपारी 3.00 ते 5.00 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात अशांतता निर्माण होऊन परीक्षा कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखणे कामी प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणुन भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागु करण्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी सोहम वायाळ यांनी जारी केले आहेत.

सदर परिक्षा जालना शहरातील     मत्सोदरी शिक्षण संस्थचे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय औरंगाबाद रोड, नागेवाडी,     मत्सोदरी शिक्षण संस्था अंकुशराव टोपे कॉलेज, मोतीबाग,     सीटीएमके गुजराती शाळा, सरोजनीदेवी रोड,   आर.जी. बागडीया आर्टस, एस.बी. लहाटीया कॉमर्स अँड आर.बी. बेझांजी सायन्स कॉलेज, (जे.ई.एस. कॉलेज), दुर्गामाता रोड,    श्री. सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, ऊन हॉल जवळ, जुना जालना येथे होणार आहे.

      जारी केलेल्या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे दृष्टीने भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) नुसार आदेश जारी केले आहेत. हा आदेश दि. 25 ऑगस्ट 2024 च्या सकाळी 8.30 वाजेपासून सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत अंमलात राहणार आहेत.

-*-*-*-*-*-*-