Monday 8 April 2024

उष्माघातापासून विद्यार्थ्यांच्या बचावासाठी शाळा-महाविद्यालय प्रमुखांना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या सूचना

 


 जालना, दि. 8 (जिमाका) :-  जालना जिल्हयामध्ये गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढत आहे. तापमान 40 अंशच्या वर जात आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांचा उष्माघातापासून बचाव करण्यासाठी  जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्हयातील सर्व शाळा व महाविद्यालय प्रमुखांना परिपत्रकाव्दारे उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

परिपत्रकाव्दारे दिलेल्या सुचनेनुसार जिल्हयातील सर्व शाळा व महाविद्यालय प्रमुखांनी  शालेय परिपाठ सकाळी कमीत कमी वेळेत व राष्ट्रगीत / प्रतिज्ञा पूरेतो मर्यादीत ठेवावे. परिपाठ शक्यतो सावलीच्या ठिकाणी घेण्यात यावा.  शाळेची वेळ वर्गखोल्याचे योग्य नियोजन करुन सकाळच्या सत्रात मध्यान्हापूर्वी ठेवण्यात यावी. शालेय विद्यार्थ्यांचे मैदानी खेळ, खेळाच्या तासीका, पि.टी./ कवायत इ. उन्हाच्या कालावधीत आयोजीत करण्यात येवू नये.  शालेय विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या आवारात मुबलक प्रमाणात स्वच्छ पिण्याचे पाणी, पंखे, प्रथमोचाराची सुविधा शाळा व्यवस्थापनाने उपलब्ध करुन द्यावी. जे विद्यार्थी, स्कुलबस अथवा इतर वाहनांनी शाळेत ये-जा करतात त्यांच्या व त्यांच्या पालकांसाठी वाहन येईपर्यंत थांबण्यासाठी शाळेच्या आवारात शेड/सावलीची व्यवस्था करावी. वाढते तापमान लक्षात घेता शाळेच्या दर्शनी भागात/स्कुलबसमध्ये आपत्कालीन वैद्यकीय सुविधा बाबतचे क्रमांक ठळक अक्षरात प्रदर्शीत करावे. ज्या शाळांमध्ये विद्यार्थी स्कुलबस द्वारे ये-जा करतात अशा सर्व स्कुलबसमध्ये चालकासोबत एक मदतनीस ठेवण्यात यावा.  शालेय कालावधीदरम्यान उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता कोणताही विद्यार्थी, शिक्षक अथवा कर्मचारी यांना उष्माघाताचा त्रास होणार नाही यादृष्टीने सर्व आवश्यक उपाययोजना शाळा व्यवस्थापनाने कराव्यात.  याव्यतिरिक्त उष्णतेच्या लाटेच्या कालावधीत उष्माघातापासून विद्यार्थ्यांचा बचाव करण्यासाठी आवश्यक असतील अशा उपययोजना शाळा व्यवस्थापनाने कराव्यात.

-*-*-*-*-*-*-

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 बोलक्या बाहुल्याने केली सादरीकरणातून मतदारांची जनजागृती

 




 

जालना, दि. 8 (जिमाका) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. तरी निवडणूक कार्यक्रमातंर्गत बोलक्या बाहुल्याच्या माध्यमातून मतदार जनजागृतीपर कार्यक्रम परतूर येथील शिक्षक जय ढोले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरात सादर केला. बोलक्या बाहुल्याने मतदारांचे प्रतिनिधीत्व करत मनात उपस्थित होणाऱ्या शंका विचारुन समाधान करुन घेतले. ईव्हीएम विषयी माहिती, नोटा या नकारात्मक मतदानाविषयी  तसेच कुठल्याही अमिषाला बळी न पडता पारदर्शकपणे आपले बहुमुल्य मतदान करण्याविषयीची माहिती उपस्थितांना सादरीकरणातून देण्यात आली. कार्यक्रमाचा समारोपात बोलक्या बाहुल्याने ‘मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो’ या घोषणेने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. या कार्यक्रमास अधिकारी-कर्मचाऱ्यांसह नागरिकांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-

सोनदेव येथील फुड पॉयझनिंग नियंत्रणात

 


 


 

जालना, दि. 8 (जिमाका) :- प्राथमिक आरोग्य केंद्र शेवली अंतर्गत सोनदेव येथील हरिनाम सप्ताह व एकादशी निमित्त दि. 5 एप्रिल 2024 रोजी प्रसाद म्हणुन भगर खाल्ल्‌यामुळे उलट्या, मळमळीची लक्षणे 188 व्यक्तींमध्ये फुड पॉयझनिंग झाले असल्याचे प्राथमिकता दिसून आले. यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ. शाम राठोड व आरोग्य पथकाने 188 व्यक्तींवर तात्काळ औषधोपचार केले. सदरील व्यक्तींना सलाईन, ओ.आर.एस. व टॅब पीसीएमचा औषधोपचार देण्यात आला. सध्या सर्वांची प्रकृती चांगली आहे. तसेच दि. 6 एप्रिल 2024 रोजी जिल्हास्तरीय पथकाने भेट देऊन सविस्तर आढावा घेऊन मार्गदर्शन केले. या पथकामध्ये साथरोग वैद्यकिय अधिकारी डॉ.एन.जी.पवार, व आरोग्य विस्तार अधिकारी श्री. रसाळ यांचा समावेश होता.  सध्या परिस्थिती पुर्ण नियंत्रणात आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई नियंत्रण कक्ष स्थापन

 


जालना, दि. 8 (जिमाका) :- टंचाईशी निगडीत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 02482-223132 आणि 1077 असा आहे.

जालना जिल्हयात सन 2023-24 व 2024-25 अंतर्गत दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे जिल्हयातील जनतेकडून टंचाईशी निगडीत जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजबिलात 33.5 टक्के सूट, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या  गावात शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे आदी विषय प्रकरणी दूरध्वनीव्दारे किंवा प्रत्यक्ष प्राप्त होणाऱ्या तक्रारी / निवेदने यांचे निरसन टंचाई नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कक्षात अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी कळविले आहे.

***

उष्माघातापासून बचावासाठी काळजी घ्या..! काय करावे…! काय करु नये..! सूचनाचे करा पालन

 


जालना, दि. 8 (जिमाका) – सध्या उन्हाळा सुरु आहे.  तापमानात वाढ झाली आहे, अशा वातावरणात उष्णतेच्या लाटेमुळे आजारी पडल्यावर पुरेसे उपचार व काळजी न घेतल्यास  मृत्यू होण्याची शक्यता असते. उष्म वातावरणात होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी काय करावे आणि काय करु नये याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने खालीलप्रमाणे सूचना केल्या आहेत. त्याचे पालन करण्याचे  आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोहम वायाळ यांनी केले आहे.

काय करावे -- तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे. हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री/टोपी, बुट व चपलांचा वापर करण्यात यावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करण्यात यावा. अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादीमुळे उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. बाहेर कामकाज करीत असताना मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करण्यात यावा. गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी. रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणकरीता शेड उभारावेत. जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी.

काय करु नये--  लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये. दुपारी 12.00 ते 3.30 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावित. दुपारी 12.00 ते 3.30 या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे.  उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी.

                                                              -*-*-*-*-*-*-

Friday 5 April 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 परतूर, घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा

 





जालना, दि. 5 (जिमाका) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने परभणी लोकसभा मतदारसंघात समाविष्ट परतूर व घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक विषयक कामाकाजाचा आज निवडणूक निरीक्षक (सामान्य) कृष्णकुमार निराला, निवडणूक निरीक्षक (पोलीस) डॉ. विष्णुकांत आणि निवडणूक निरीक्षक (खर्च) अनुराग चंद्रा यांनी सविस्तर आढावा घेतला. भारत निवडणूक आयोगाने 17-परभणी लोकसभा मतदार संघासाठी सदर  निवडणूक निरीक्षकांची निवड केली आहे.

घनसावंगी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शशिकांत हदगल, उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे, दीपक पाटील आदींसह निवडणुकीशी संबंधित विविध कामकाजाचे नोडल अधिकारी उपस्थित होते.

निवडणूक निरीक्षक (सामान्य) कृष्णकुमार निराला म्हणाले की, निवडणूक भयमुक्त व सुरळीत वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करावे. कर्मचाऱ्यांना व्यवस्थितपणे प्रशिक्षण द्यावे.  निवडणुकीत सहभागी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवावा. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रभावीपणे जनजागृती करावी. मतदार व निवडणुक कामाकरीता नियुक्त कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सुविधा अवश्य द्याव्यात.

निवडणूक निरीक्षक (पोलीस) डॉ. विष्णुकांत यांनी निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस विभागाने दक्षता घ्यावी. विशेषत: सण-उत्सवाच्या काळात अधिक दक्ष राहावे. तर निवडणूक  निरीक्षक (खर्च) अनुराग चंद्रा  यांनी निवडणूकीशी संबंधित खर्चाचे अहवाल अद्यावत ठेवावेत. वेळेवर संबधित नोडल अधिकाऱ्यांकडून खर्च अहवाल प्राप्त करुन घ्यावेत, अशा सूचना केल्या.

प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सादरणीकरणाव्दारे परतूर व घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील मतदार संख्या, मतदान केंद्र व तेथे मतदारांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधा, दिव्यांग मतदारांसाठीच्या सुविधा, मनुष्यबळ, वाहन सुविधा, चेकपोस्ट, भरारी पथके, प्रतिबंधात्मक कार्यवाया, साहित्य व्यवस्थापन, स्वीप अंतर्गत मतदानाविषयी करण्यात आलेली जनजागृती याबाबत सविस्तर माहिती दिली. तर जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी  निवडणूक व सणाच्या अनुषंगाने करण्यात आलेले पोलीस बंदोबस्ताच्या नियोजनाबाबत माहिती दिली. तसेच अवैध कारवाया रोखण्यासाठी केलेल्या कारवाईची माहिती दिली. तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी स्वीप अंतर्गत मतदानाबाबत जनजागृतीसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

                                                                    -*-*-*-*-*-        

Saturday 23 March 2024

दुय्यम निबंधक कार्यालय आजपासून सुट्टीच्या दिवशीही राहणार सुरु


 

जालना, दि. 23 (जिमाका) :- दरवर्षी 1 एप्रिलला बाजार मुल्य दरतक्ते प्रसिध्द होत असल्याने मार्च महिन्यात सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोदंणीसाठी पक्षकारांची गर्दी असते. तसेच अर्थिक वर्ष 2023-2024 या वर्षाचा इष्टांक पुर्ण करण्याच्या दृष्ट्रीने महाराष्ट्र मुद्रांक शुल्कं (अभय योजना) या संबधीचे कामकाज करण्यासाठी व दस्त नोदंणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकांराची गर्दी वाढत आहे, त्यामुळे पक्षकांराच्या सोयीसाठी जालना जिल्ह्यातील मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय व सर्व दुय्यम निबंधक कार्यालये दि. 23 मार्च व 24 मार्च तसेच दि.29 मार्च ते 31 मार्च या शासकीय सुट्टीच्या दिवशी सुरु ठेवण्यात येणार आहेत, असे सह जिल्हा निबंधक वर्गं.1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे  कळविले आहे.

-*-*-*-*-